Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language
ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.
यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे.
गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.
प्रथम भक्त- श्री गणेश
Devotee-1 Shri Ganesh
श्री गणेश हे तर स्वतः च आद्य देव आहेत, मग त्यांचे नांव भक्तांमध्ये कसे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भगवंताची रूपें अनंत आहेत. पण या रूपांपैकी ५ रूपें ही मुख्यतः पूजली जातात-
१. भगवान नारायण- किंवा विष्णू, २. भगवान शिव, ३. भगवति महाशक्ति, ४. भगवान सूर्य, आणि ५. भगवान गणपति.
गणपति आद्य पूज्य असल्याच्या अनेक कथा वाचायला मिळतात, गणपति हे रुद्रगणांचे अधिपति आहेत, त्यामुळे त्यांची पूजा सर्वप्रथम केल्याने कार्य निर्विघ्न पार पडते, अशी श्रद्धा आहे. गणेशाला प्रथम पूजनाचा मान कशामुळे प्राप्त झाला, याबद्दलची कथा सर्वश्रुत आहे- जेंव्हा सृष्टीच्या आरंभी, देवतांमध्ये कोणाला प्रथम पूजनीय मानले जावे हा प्रश्न उपस्थित झाला, तेंव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सर्व प्रथम पूर्ण करून येईल, त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल.
त्यानंतर सर्व देव आपआपल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. त्यावेळी, गणेशाने, आपल्या आई वडिलांची, अर्थात, भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रदक्षिणा केली, कारण की, ‘माता साक्षात् क्षितेस्तनुः’ अर्थात, माता साक्षात पृथ्वीरूप आहे, आणि पिता हे प्रजापतिरूप आहेत. त्यामुळे श्रीगणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा अशा रीतीने सर्वांच्या आधी पूर्ण झाली आणि तेंव्हापासून श्री गणेशाला आद्य पूजेचा मान मिळाला. हीच कथा, श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या संदर्भात सुद्धा वेगळ्या प्रकारे येते.
पण या कथेचा आशय इतकाच, की अशा प्रकारे आपल्या माता पित्यांची श्रेष्ठता आणि माता पित्याच्या भक्तिचा आदर्श श्री गणेशाने स्थापित केला आणि दाखवून दिले, की केवळ शरीराच्या बळावर किंवा इतर लौकिक साधनांवर विश्वास ठेवून सिद्धी मिळू शकत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही धोका खाऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या माता पित्याच्या भक्तीचा आदर्श घालून देणाऱ्या श्री गणेशाला आरंभी वंदन!