https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

भक्तांच्या कथा-4 -महान भक्त- यमराज – Devotee- 4 Yamraj

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee- 4 Yamraj

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

महान भक्त- यमराज

 

Devotee-4 Yamraj

या आधीच्या लेखात आपण पाहिले की प्रमुख 12 भागवताचार्यांमध्ये यमराज हे स्वतः आहेत. त्यांना यमधर्मराज म्हटले जाते. म्हणजे जे धर्माचे पालन करतात. यमराज हे नित्य देव असून ते सूर्यपुत्र आहेत असे मानले जाते. ते देवशिल्पी विश्वकर्मा यांची पुत्री संज्ञा हिच्यापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. त्यांचे शरीर श्याम रंगाचे आहे आणि हातात यमदण्ड घेतलेला असतो. त्यांचे वाहन रेडा आहे. भगवान ब्रह्माच्या आदेशानुसार त्यांनी प्राण्यांच्या कर्मानुसार फळाचा निर्णय करण्यासारखे कठोर कार्य त्यांनी अंगिकारले आहे.

यमराज हे परम भक्त आहेत. श्रीमद् भागवतात आले आहे की, यमराज आपल्या दूतांना सांगतात-

“ज्यांची वाणी भगवंताच्या मंगलमय गुणांना आणि पवित्र नामाला वर्णन करत नाही, ज्यांचे चित्त भगवंतांच्या चरणकमळाचे चिंतन करत नाही, अशा, भगवान विष्णूच्या पावन कर्मांपासून पृथक राहणाऱ्या दुष्ट लोकांनाच तुम्ही इथे म्हणजे यमपुरीत आणीत जा. जे लोक भगवंताच्या कथा संकीर्तनामध्ये मग्न राहतात त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ नका. कारण की मी दुसऱ्या प्राण्यांना तर दण्ड देऊ शकतो, पण भगवंताच्या भक्तांना दण्ड देण्याची शक्ति माझ्यात नाही.”

कठोपनिषदा मध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आला आहे. नचिकेता हा वाजश्रव ऋषी किंवा  उद्दालक यांचा मुलगा होता. त्याच्या वडिलांनी एक यज्ञात, ज्याच्यात आपली सर्व संपत्ति दान करायची असते, अशा यज्ञात, त्यांच्याजवळील म्हाताऱ्या आणि भाकड गायी दान करतांना पाहिले. त्याला फार वाईट वाटले. त्याने आपल्या वडिलांना विचारले, “पिताजी, तुम्ही मला कोणाला दान करणार?” दोन तीन वेळेला हाच प्रश्न ऐकून त्याच्या वडिलांनी त्याला रागाने सांगितले, की जा, तुला यमाला दान दिले आहे. नचिकेता आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून यमलोकाला जायला निघाला. तिथे यमराज उपस्थित नसल्याने त्याला तीन दिवस त्यांची वाट पाहत थांबावे लागले. यमराज परत आल्यावर, आपल्यामुळे या ब्राह्मणकुमाराला वाट पहावी लागली याचे त्यांना दुःख झाले, आणि त्यांनी त्याचे आदरातिथ्य करून, झालेली विलंबाबद्दल त्याला 3 वर मागून घेण्यास सांगितले.

yam nachiketa

तेंव्हा, नचिकेताने, पहिल्या वराने आपल्या वडिलांसाठी शांतीची मागणी केली, दुसऱ्या वराने, यज्ञाविषयी माहिती विचारली, आणि तिसऱ्या वराने त्याने आत्म्याच्या स्वरूपाबद्दल विचारले. यमराजाने पहिले दोन वर तर दिले, पण तिसऱ्या वराबद्दल यमराजाने आधी नचिकेत्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इतर अनेक भौतिक सुखांचे वर देण्याची लालूच दाखविली. अशा प्रकारे यमराज त्याची परिक्षा पाहत होता. पण नचिकेता कुठल्याच प्रलोभनाला भुलला नाही, आणि आत्मज्ञान मिळण्यासाठी आग्रही राहिला. कारण नचिकेत्याला माहित होते की आत्मज्ञान देण्यासाठी यमराजासारखा दुसरा गुरू मिळणे नाही. तेंव्हा मग यमराजाने त्याला जे आत्मज्ञान दिले, ते कठोपनिषदा मध्ये वर्णन केले आहे.  

श्रीहरि!

संकलक- माधव भोपे

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading