Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language
भक्त- गोकर्ण
भक्त गोकर्ण
Bhakta Gokarna
पूर्वीच्या काळी दक्षिण भारतात तुंगभद्रा नदीच्या काठी एक सुंदर नगरी होती. तिथे आत्मदेव या नांवाचा एक सदाचारी, विद्वान आणि धनवान ब्राह्मण राहत होता. त्याला धुंधुली या नांवाची पत्नी होती, जी खूप भांडकुदळ होती. त्या दोघांना मूलबाळ नसल्याने ते दुःखी होते. मूल होण्यासाठी बरेच उपाय करूनही त्यांना मूल होत नव्हते. एके दिवशी आत्मदेव त्याच चिंतेत घराच्या बाहेर पडला, आणि वनात जाऊन एका तळ्याच्या काठी बसला. तिथे त्याला एका संन्याशाचे दर्शन झाले. त्याने त्या संन्याशाला आपले दुःख सांगितले. संन्याशाला त्याची दया आली. त्याने ध्यान लावून त्याचे प्रारब्ध जाणून घेतले, आणि त्याच्या नशिबात सात जन्मपर्यंत संततीचा योग नाही असे सांगितले. त्यामुळे त्याने संततीची इच्छा सोडून भगवंतात चित्त लावावे असे सांगितले. पण आत्मदेव म्हणाला, “महाराज, मला आपला उपदेश नकोय, मला संतती मिळवून द्या, अन्यथा मी इथेच देहत्याग करतो.” ब्राह्मणाचा हट्ट पाहून तो संन्याशी म्हणाला, “ असा हट्ट करणे योग्य नाही. विधात्याच्या इच्छेविरुद्ध तुला पुत्र प्राप्ति झाली तरी त्याचे सुख तुला मिळणार नाही. परंतु तरीही जर तुझा हट्टच असेल, तर तू हे फळ घेऊन जा, हे घरी जाऊन आपल्या बायकोला खाऊ घाल, तुला पुत्र होईल. पण लक्षात ठेव, तुझ्या पत्नीने पुत्र उत्पन्न होईपर्यंत व्रतस्थ, पवित्रतेने राहायला पाहिजे. सत्य बोलायला पाहिजे, दान केले पाहिजे, आणि फक्त एक वेळ जेवून राहायला पाहिजे. अशाने तुम्हाला होणारी संतती चांगली होईल.” असे सांगून संन्याशाने त्याला एक फळ दिले.
फळ घेऊन ब्राह्मण घरी आला आणि आपल्या पत्नीला ते फळ दिले. त्याची पत्नी धुंधुलीने विचार केला, की हे फळ खाल्ल्यावर मला इतक्या कडक नियमाने राहावे लागेल, आणि पुन्हा मूल झाल्यावर सुद्धा त्याला सांभाळण्याचे कष्ट करावे लागतील. त्यापेक्षा नकोच ते, वांझ राहणेच ठीक.” असा विचार करून तिने ते फळ आपल्या गाईला खायला घातले, आणि फळ आपण खाल्ल्याचे पतीला खोटेच सांगितले. इकडे त्याच वेळी, तिची लहान बहीण गर्भवती झाली होती. तिने तिच्याकडून कबूल करून घेतले, की तिला होणारे अपत्य ती धुंधुलीला देईल. योग्य वेळी तिच्या बहिणीला एक पुत्र झाला, जो तिने धुंधुलीला आणून दिला. सगळीकडे हे प्रसिद्ध करून दिले की धुंधुलीला मुलगा झाला. त्याचे नांव त्यांनी धुंधुकारी ठेवले.
तीन महिन्यांच्या नंतर त्या गाईची प्रसूती झाली, आणि तिने एका बालकाला जन्म दिला. त्याचे सर्व अवयव मनुष्याचे होते, फक्त कान गाईसारखे होते. त्यामुळे त्याचे नांव गोकर्ण ठेवले.
गोकर्ण अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि बुद्धिमान होता. तो लवकरच अत्यंत विद्वान आणि ज्ञानी झाला. इकडे धुंधुकारी मात्र दुश्चरित्र, आचारहीन क्रोधी, चोर, निर्दयी आणि वेश्यागामी निघाला. तो माता पित्याला अत्यंत दुःख देत असे आणि त्यांचे धन घेऊन वेश्येला नेऊन देत असे. आत्मदेव त्याच्या वर्तनाने दुःखी होऊन रडू लागला, त्यावेळी गोकर्णाने त्याला समजावले, आणि ज्ञानाचा उपदेश दिला. पुत्राच्या उपदेशाने आत्मदेव प्रभावित होऊन, घराच्या बाहेर पडला, आणि वनात जाऊन, श्रीहरीच्या भक्तिमध्ये त्याने देह त्याग केला.
पित्याच्या मृत्यूनंतर, धुंधुकारीने त्याचे सगळे धन नष्ट केले, आपल्या आईला खूप त्रास देऊ लागला, ज्यामुळे त्रस्त होऊन तिने विहिरीत जीव दिला. हे सर्व झाल्यावर गोकर्णसुद्धा घरातून तीर्थ यात्रेसाठी बाहेर पडला.
इकडे धुंधुकारी पाच वेश्यांना घेऊन त्याच घरात राहू लागला. एके दिवशी त्या वेश्यांनी त्याला निर्दयपणे मारून टाकले, आणि त्याचे शरीर खड्ड्यात पुरून टाकले. धुंधुकारी आपल्या दुष्ट कर्मांमुळे प्रेतयोनीला प्राप्त झाला. गोकर्णाने जेंव्हा त्याच्या मृत्यूचा समाचार ऐकला, तेंव्हा गयेला जाऊन त्याचे श्राद्ध केले, आणि ज्या ज्या तीर्थात गेला, तिथे पण त्याचे श्राद्ध केले.
गोकर्ण तीर्थयात्रा करून वापस आला, आणि घरी येऊन रात्री जेंव्हा झोपला, तेंव्हा, धुंधुकारी प्रेत योनीतच येऊन त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागला. गोकर्णाने त्याला विचारले की तू कोण आहेस, तेंव्हा धुंधुकारी जोरात रडू लागला, पण त्याला बोलता येईना. तेंव्हा गोकर्णाने त्याच्यावर मंत्रजल शिंपडले, तेंव्हा तो बोलू लागला, आणि त्याने दीनपणे आपला सगळा वृत्तान्त सांगितला आणि या भीषण यातनां मधून सुटण्याचा उपाय विचारला. त्यावर गोकर्ण म्हणला, “ तू सध्या जा. मी विचार करून यावर काही उपाय शोधतो.”
दुसऱ्या दिवशी गोकर्णाने अनेक विद्वान ब्राह्मणांशी याबाबत चर्चा केली. तेंव्हा सगळ्यांचे असे मत पडले, की या बाबतीत भगवान सूर्य नारायणांनाच विचारावे. गोकर्णाने त्याच वेळी आपल्या तपोबलाने आणि मंत्र बलाने भगवान सूर्य नारायणांची प्रार्थना केली, आणि त्यांना याबाबत उपाय विचारला. सूर्यनारायणाने संगितले, की याची मुक्ति फक्त भागवत पाठाने होऊ शकते. तू सात दिवसात श्रीमद्भागवत पाठ कर.
गोकर्ण भागवत पाठ करणार हे समजल्यावर आजूबाजूच्या गांवांमधील खूप लोक एकत्र झाले. गोकर्णाने जेंव्हा व्यास आसनावर विराजमान होऊन भागवतकथा सुरू केली, तेंव्हा धुंधुकारी त्या सभामंडपात आला आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागला. त्याने पाहिले की तिथे सात गाठींचा एक उंच असा बांबू (वेळू) आहे. तो धुंधुकारी वायूरूप असल्याने, त्या बांबूच्या एका छिद्रात जाऊन बसला.
संध्याकाळ झाल्यावर, पहिल्या दिवशीची कथा समाप्त झाल्यावर लोकांनी पाहिले की त्या बांबूची एक गाठ कडकड आवाज करीत तुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ आणि तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ तुटली. याप्रकारे सात दिवसांत त्या बांबूच्या सातही गाठी तुटून गेल्या आणि कथा समाप्त होता होता, धुंधुकारी प्रेतयोनीला त्यागून दिव्यरूपाला प्राप्त झाला. लोकांनी पाहिले- त्याच्या गळ्यात तुळशीची माला, मस्तकावर मुकुट, श्याम वर्ण, आणि पीतांबर नेसलेला आहे. तो गोकर्णासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “बंधू गोकर्ण, तू माझ्यावर दया केलीस आणि मला या प्रेतयोनीतून सोडविलेस. मी आता हे दिव्य रूप घेऊन भगवद्धामाला जातो आहे.” इतक्यात त्याला भगवान विष्णूचे पार्षद घ्यायला आले, आणि तो दिव्य विमानात बसून तिथून गेला.
श्रावण महिन्यात गोकर्णाने पुन्हा श्रीमद्भागवतकथा केली. कथा समाप्तीच्या दिवशी स्वतः भगवान विष्णू आपल्या पार्षदां सोबत तिथे प्रकट झाले, त्यांनी गोकर्णाला हृदयाशी लावून, आपले चतुर्भुज रूप प्रदान केले. पाहता पाहता, मंडपात उपस्थित असलेले श्रोतेगणही विष्णूरूप होऊन गेले, आणि सर्वजण योगीदुर्लभ विष्णू लोकाला गेले. अशा प्रकारे महान भक्त गोकर्णाने आपल्याबरोबर त्या पूर्ण गावाचा उद्धार केला.
संकलन- माधव भोपे
ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.
यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे.
गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.