गीता जयंती
आज दि. 11 डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती अशी मान्यता आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य आपल्याला नवीन सांगायला नको.
श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य अगाध आणि असीम आहे. हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयींमध्ये मानला जातो. मानवजातीच्या उद्धाराचे तीन राजमार्ग प्रस्थानत्रय या नांवाने सांगितले जातात.
त्यापैकी ‘उपनिषद्’ हा वैदिक मार्ग आहे. दुसरा ब्रह्मसूत्र हा दार्शनिक मार्ग आहे, आणि भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे (म्हणजे श्रुति आणि स्मृति यांना अनुसरणारा),असे म्हटले जाते.
उपनिषदांमध्ये ‘मंत्र’ आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये ‘सूत्रें’ आहेत आणि गीतेमध्ये ‘श्लोक’ आहेत. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंतांची ‘वाणी’ असल्यामुळे, ते मंत्रच आहेत. ह्या श्लोकांमध्ये अत्यंत गहन अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना ‘सूत्रें’ ही म्हटले जाते. उपनिषद् ‘अधिकारी’ मनुष्यांच्या उपयोगाचे आहे, ब्रह्मसूत्र ‘विद्वानांच्या’ उपयोगाचे आहे, परंतु भगवद्गीतेतील ज्ञान हे सर्वांच्या उपयोगाचे आहे.
भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे. साधक कोणत्याही देशाचा, भाषेचा, धर्माचा, विचाराचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधन सामग्री या ग्रंथात आहे.
कारण की, गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुति केलेली नाही, तर वास्तविक तत्त्वाचेच वर्णन केलेले आहे. वास्तविक तत्त्व तेच आहे, की जे परिवर्तनशील, प्रकृति आणि प्रकृतिजन्य पदार्थांपासून सर्वथैव अतीत, आणि संपूर्ण देश, काल, वस्तु, व्यक्ति, परिस्थिति, इत्यादींमध्ये नित्य, निरंतर एकरस आणि एकरूप राहणारे आहे. जो मनुष्य ज्या ठिकाणी आणि जसा आहे, त्या ठिकाणी आणि तसेच, वास्तविक तत्त्व पूर्ण विज्ञमान आहे. परंतु परिवर्तनशील असलेल्या वस्तु, व्यक्ति मध्ये ‘राग’ आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही. संपूर्णपणे रागद्वेषरहित झाल्यानंतर त्याचा स्वाभाविकच अनुभव येतो.
गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत, विस्तारपूर्वक समजावण्याबाबत एकेका साधनाचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही. आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत परमात्व तत्त्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्येही आपले कल्याण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहूनही परमात्त्व प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकविली आहे. त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकेल असा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही.
स्वामी रामसुखदासजी सांगतात- गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण, अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाव स्फुरण पावतात. याचे मनःपूर्वक पठण केल्यास परम शांती मिळते. ह्याचा एक विधी असा आहे की, प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासहित पाठ करावेत, नंतर एकांतात बसून गीतेच्या “यत्र योगेश्वर कृष्ण” या शेवटच्या श्लोकापासून “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तकावाचून उलटा पाठ केल्यास परम शांती मिळते. गीतेचा दररोज एक वेळा किंवा अनेक वेळा पूर्ण पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करताच तिचे निरसन होते. वास्तविक या ग्रंथाचे माहात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही.
आज गीताजयंतीच्या दिवशी, भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करून, गीतेतील जितके जमतील तितके अध्याय वाचल्यास नक्कीच हा दिवस सार्थकी लावल्यासारखे होईल.
मोक्षदा एकादशी
आजच्या या एकादशीला मोक्षदा एकादशीही म्हणतात. प्राचीन काळी वैखानस नांवाचा राजा गोकुळावर राज्य करीत होता. त्याला एकदा स्वप्नामध्ये त्याचे वडील मृत्यूनंतर अतिशय कष्ट भोगत असल्याचे दिसले. त्यावरून त्याने राजपुरोहिताचा सल्ला घेतला, राजपुरोहिताने त्याला पर्वत नांवाच्या ऋषींकडे पाठविले. त्यांनी त्यांच्या ज्ञानाने जाणून राजाला सांगितले की त्याचे वडील त्यांच्या काही पापाचरणाने नरकात कष्ट भोगत आहेत. त्यावर उपाय म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे, जिचे नांव मोक्षदा एकादशी आहे, तिचे व्रत करून तिचे पुण्य आपल्या वडिलांना द्यावे, जेणेकरून ते त्यांच्या पापातून मुक्त होतील. राजाने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मोक्षदा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य आपल्या वडिलांना दिल्यावर ते मुक्त झाले अशी कथा आहे. मोक्षदा एकादशीला आपल्या पितरांसाठी तर्पण करावे असे सांगितले आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु!!
Nice information
Thanks. Please also read our other article on goodworld.in
Gita Quiz- गीतेवर आधारित प्रश्नोत्तरें https://goodworld.in/gita-quiz/