Proper Diet
आहार शुद्धि
मनुष्याचा जो स्वभाव बनतो, त्यात अनेक कारणें असतात. त्यात आहार हेही एक कारण असते. ‘ जैसा खावे अन्न, वैसा बने मन.’ आहार जितका सात्त्विक असेल तितकी वृत्ति सात्त्विक बनते.
सात्त्विक, राजस आणि तामस आहार म्हणजे काय, हे जर समजून घ्यायचे असेल, तर गीतेमध्ये याबद्दल थोडक्यात पण फार सटीक वर्णन केले आहे. गीतेच्या १७ व्या अध्यायात (श्रद्धात्रय विभाग योग) श्लोक ८ ते १० मध्ये भगवंताने सांगितले आहे-
आयु:सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धना: |
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया: || 8||
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिन: |
आहारा राजसस्येष्टा दु:खशोकामयप्रदा: || 9||
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् |
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् || 10||
सात्त्विक मनुष्यामध्ये विवेक जागृत असतो, त्यामुळे तो आहाराच्या चव किंवा रूप रस गंध यापेक्षा, त्याच्या परिणामाकडे आधी लक्ष देतो. त्यामुळे सात्त्विक आहाराचे वर्णन करतांना भगवंतानेही प्रथम त्याचा परिणाम काय होतो हे वर्णन केले आहे- अर्थात- सात्त्विक आहार हा आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, आणि सुख, संतोष वाढविणारा असतो- आणि नंतर त्याचे वर्णन केले आहे- तो रसपूर्ण, स्निग्ध, स्थिर राहणारा आणि हृदयाला बळ देणारा असतो.
राजस मनुष्यामध्ये भोज्य पदार्थांबद्दल ‘राग’ (मराठीतील ‘राग-म्हणजे क्रोध- तो नव्हे, तर राग म्हणजे आसक्ति) असतो- म्हणून त्याची दृष्टी सर्वप्रथम भोज्य पदार्थाच्या बाह्य रूप, रस, गंध आणि चव याकडे जाते, उदा.- तिखट तर्रीदार मिसळ, कांद्याचे भजे, खमंग साबुदाणा वडा- इत्यादि यांची चव इत्यादि यांना प्रथम प्राधान्य राहते. अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आनंद घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेणे अशी त्याची दृढ समजूत असते. ‘ये नही खाया तो तूने क्या हासिल किया जिंदगीमें’ अशी वाक्यें आपण सर्रास ऐकतो किंवा वाचतोच. तर भगवंताने राजस आहाराचे वर्णन करतांना आधी त्याची चव, स्पर्श इत्यादींचे वर्णन केले आहे- कटु- (संस्कृत मध्ये कटु म्हणजे तिखट), आम्ल- म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट(उदा. वेगवेगळ्या प्रकारची लोणची), अत्युष्ण- म्हणजे अतिशय गरम गरम, तीक्ष्ण- म्हणजे जिभेला झोंबणारे, रुक्ष (उदा. चिवडा, भेळ इत्यादि) आणि विदाहिनः म्हणजे दाह उत्पन्नकरणारे- झणझणीत-अशा प्रकारचा आहार हा राजस व्यक्तिला प्रिय असतो-
आणि या आहाराचे वर्णन करून झाल्यावर मग त्याचे परिणाम वर्णन केले आहेत, जशी राजस स्वभावाची व्यक्ति आधी असा जिभेला पाणी आणणारा आहार दिसताच त्यावर तुटून पडते, आणि नंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात, त्याचे परिणाम म्हणजे- दु:खशोकामयप्रदा: असा आहार खातांना जरी प्रिय लागला, तरी त्याचा परिणाम हा भविष्यात- दुःख, शोक आणि ‘आमय’ म्हणजे रोग यामध्ये होतो.
तामस मनुष्यामध्ये मोह म्हणजे मूढता असते. त्यामुळे तो मोहपूर्वक भोजन करतो. म्हणून तामस आहाराच्या वर्णनात केवळ तामस पदार्थांचे वर्णन आले आहे, परिणामाचे वर्णन आले नाही-
यात-यामम् – याम या संस्कृत शब्दाचा अर्थ तीन तासांचा अवधि असा होतो. यात-यामम् म्हणजे जे अन्न शिजवून तीन तासांच्या वर अवधि उलटून गेलेला आहे. आपण सकाळचे करून ठेवलेले पदार्थ संध्याकाळी खातो, किंवा रात्रीचे पदार्थ सकाळी फोडणी देऊन वगैरे खातो-(अन्न वाया कसे घालवायचे(?) या सदराखाली) ते सर्व या श्रेणीत मोडतात. (याबद्दल नंतर कधी सविस्तर लिहिले जाईल)
गत-रसम् – स्वादरहित, पूति – दुर्गंधयुक्त, पर्युषितम् – म्हणजे शिळे, एक रात्र उलटून गेलेले, खराब झालेले, उच्छिष्टम् – दुसऱ्यांचे उष्टे, अमेध्यम् म्हणजे अशुद्ध, अपवित्र- (आपण हॉटेल मध्ये अत्यंत चवीने खात असलेले अन्न यातील कुठल्या कुठल्या प्रकारात मोडते हे आपले आपण तपासून पहावे)
अशा प्रकारे गीतेमध्ये भगवंतांनी तीन प्रकारच्या आहाराचे वर्णन केले आहे.
याशिवाय भगवंताने अनेक ठिकाणी आहारा संबंधी उल्लेख केला आहे
अध्याय 4-
अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति |
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ||4- 30||
इथे नियत म्हणजे मोजका आहार असे वर्णन केले आहे.
अध्याय 6
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत: |
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन || 16||
जे लोक खूप जास्त किंवा खूप कमी खातात, खूप झोपतात किंवा झोपतच नाही अथवा कमी झोपतात त्यांना ‘योग’ साध्य होऊ शकत नाही.[ या श्लोकाचे अनेक प्रकारचे अर्थ लोक लावू शकतात आणि आपल्या वागण्याचे समर्थन करू शकतात- पण तो एक वेगळाच विषय आहे].
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥17॥
जे लोक योग्य तेवढाच आहार घेतात- ना कमी ना जास्त, योग्य तितकेच झोपतात- थोडक्यात म्हणजे मर्यादेत सगळ्या गोष्टी करतात त्यांना विनासायास योग साध्य होऊ शकतो.
आता वरील विवेचनावरून अजून कितीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात- स्वामी रामसुखदासजींनी त्यांच्या गीता दर्पण या पुस्तकात अतिशय समर्पकपणे अशा प्रश्नांची उत्तरें दिली आहेत. खाली आपण अशा काही शंकांची चर्चा करणार आहोत.
आहार शुद्धि-2
याआधी आपण मनुष्याचा स्वभाव बनण्यास ‘आहार’ हे एक मुख्य कारण असल्याचे पाहिले, आणि गीतेमध्ये आहाराबद्दल काय सांगितले आहे ते थोडक्यात पाहिले, तसेच सात्त्विक, राजस आणि तामस आहार यांची थोडक्यात माहिती घेतली.
पण सात्त्विक आहार पण प्रमाणाबाहेर घेतल्यास काय होते? गीतेमध्ये सगळ्याच गोष्टींबद्दल मध्यम मार्गाचे समर्थन केले आहे- ना अति कमी, ना अति जास्त. सात्त्विक मनुष्याने सुद्धा सात्त्विक आहार, काही कारणामुळे-जसे की त्याच्या चवीबद्दल त्याच्या मनात तात्पुरता का होईना, पण मोह निर्माण झाला, आणि ते अधिक मात्रेत घेतले, तर तो राजस आहार होईल, ज्याचा परिणाम रोगामध्ये होईल. आणि अधिक लोभात येऊन त्याने तेच सात्त्विक भोजन अत्यधिक प्रमाणात सेवन केले, तर तोच आहार तामस होईल, ज्याचा परिणाम निद्रा आणि आळस यांच्यात होईल. याउलट राजस मनुष्याने राजस भोजनही कमी प्रमाणात घेतले तर त्याचा परिणाम राजस (रोग, दुःख इ.) न होता सात्त्विक भोजनाप्रमाणे होईल. हीच गोष्ट तामस आहारालाही लागू होईल.
आहाराचे पदार्थ सात्विक असूनही जर ते न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचे नसतील, निषिद्ध मार्गाने मिळविलेल्या पैशांचे असतील, तर असा आहार, सात्त्विक असूनही काही ना काही राजसी किंवा तामसी वृत्ति निर्माण करेल. त्यामुळे आहार सात्त्विक असावा, सच्च्या कमाईचा असावा, पवित्रतापूर्वक बनवलेला असावा, आणि भगवंताला अर्पण करून, शांतिपूर्वक थोड्या प्रमाणात ग्रहण करावा, जेणेकरून त्याचा अतिशय चांगला परिणाम होईल.
राजस आहार न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचा असला, तरी, अशा आहाराचा शरीरावर तात्काळ होणारा जो परिणाम आहे, रोग उत्पत्ति इ . तो तर होईलच, पण हा आहार न्याययुक्त आणि सच्च्या कमाईचा असल्याने असा परिणाम जास्त वेळ टिकणार नाही आणि राजस वृत्ति जास्त वेळ राहणार नाही.
तसेच तामस भोजन सच्च्या कमाईचे असले तरी, तामस वृत्ति, जसे की आळस, निद्रा इत्यादि तर होतीलच. पण ते कमी प्रमाणात होईल.
कोणत्याही वर्ण, आश्रम, संप्रदायाचा मनुष्य असला, तरी तो जर परमार्थ मार्गात लागला असेल, साधन करीत असेल, तर त्याची रुचि स्वाभाविक रित्याच सात्विक आहारात राहील, राजस किंवा तामस आहारात राहणार नाही.
प्रश्न: आयुर्वेद आणि धर्मशास्त्रात विरोध का आहे? जसे की आयुर्वेदात अरिष्ट, आसव, मदिरा, मांस इत्यादींची योजना औषध रूपात केलेली आढळते, जेंव्हा की धर्मशास्त्र याचा निषेध करते, असे का?
उत्तर: शास्त्रें चार प्रकारची आहेत- नीतिशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, धर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र. नीतिशास्त्रामध्ये धन, संपत्ति, वैभव इत्यादि प्राप्त करण्या विषयी माहिती आलेली आहे. नीतिशास्त्रात कूटनीतिचे ही वर्णन येते, ज्यामध्ये दुसऱ्यांशी छल कपट करण्याचे मार्गही सांगितले आहेत, जे की ग्राह्य नाहीत. आयुर्वेदशास्त्रामध्ये शरीराची मुख्यता आहे, त्यामुळे त्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात, ज्यामुळे शरीर ठीक राहील. या गोष्टी काही वेळेस पडतात. धर्मशास्त्रामध्ये सुखभोगाची मुख्यता आहे, त्यामुळे त्याच्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात, ज्यामुळे इहलोक आणि परलोक दोनहीमध्ये सुख मिळेल. मोक्षशास्त्रात जिवाच्या कल्याणाची मुख्यता आहे, त्यामुळे, त्याच्यात मुख्यत्वे करून त्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्यामुळे जीवाचे कल्याण होईल. धर्मशास्त्राच्या विरुद्ध मोक्षशास्त्रात धर्मशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी येत नाहीत. त्याच्यात सकाम भावाचे वर्णन येते, पण त्याचे महत्त्व नाही सांगितले, उलट त्याची निंदाच केलेली आहे. कारण की साधकात जोपर्यंत सकाम भाव राहतो, तो पर्यन्त परमात्मप्राप्तिमध्ये उशीर लागतो.
आयुर्वेद आणि धर्मशास्त्र, दोन्ही प्रकृतीच्या राज्यातील आहेत.
लोकांमध्ये साधारण अशी भावना बनलेली दिसते की औषध रूपात मांस इ. अशुद्ध पदार्थ खाण्यात काही दोष नाही. पण असे तेच लोक असतात, ज्यांच्यात केवळ शरीर ठीक ठेवणे, सुख आराम मिळविणे, हाच मुख्य उद्देश असतो.
प्रश्न: शरीर राहील तर मनुष्य साधन भजन करेल- त्यामुळे अभक्ष्य भक्षण केल्याने शरीर नीट राहत असेल तर त्यात काय हरकत आहे?
उत्तर: अभक्ष्य भक्षण केल्याने शरीर कायम राहील, मृत्यू टळेल असे नाही. आयुष्य बाकी असेल तर शरीर राहील. शरीराचे राहणे किंवा न राहणे ही प्रारब्धाच्या अधीन आहे. अभक्ष्य भक्षणाने मृत्यू टळू शकत नाही, केवळ शरीर थोडे पुष्ट होऊ शकते.
मनुष्य साधन भजन करण्याचा केवळ बहाणा बनवतो, खरे तर शरीरात मोह आसक्ती असल्याने तो अशुद्ध गोष्टींचे सेवन करतो.
वरील विवेचन ही स्वामी रामसुखदासजी यांच्या गीता दर्पण नांवाच्या पुस्तकावर आधारित आहे.
माधव भोपे