https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-1 Sant Namdev Abhang-1

Sant Namdev Abhang-1

संत नामदेवांचे अभंग-1

आपल्या भारत देशाला संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि महाराष्ट्र हा त्यात अग्रेसर आहे. साधारण तेराव्या शतकापासूनच्या संत परंपरेचा आढावा घेतला, तर त्यात संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, सोयराबाई, जनाबाई, संत तुकाराम, संत दामाजीपंत, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, अशा कितीतरी संतांची नांवे सांगता येतील.

या सर्वांची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून होते. “ज्ञानदेवे रचिला पाया”.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

अवघ्या 21 वर्षे राहिलेल्या ज्ञानेश्वरांना सर्व संत “माऊली” म्हणतात, यातच त्यांचे अलौकिकपण दिसून येते. संत ज्ञानदेव हे इ. स. 1275 ते 1296 या काळात होऊन गेले.  

साधारण त्याच काळात, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी (ज्याला नंतर नरसी नामदेव म्हणू लागले) येथे इ. स. 1270 ते 1350 या कालावधीत संत नामदेव होऊन गेले.

वर दिलेल्या सर्व संतमंडळींनी भागवत धर्माचा, भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार आपआपल्या काळाच्या गरजेनुसार केला, आणि त्यांच्या रचना आज महाराष्ट्रातील घराघरात रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनल्या आहेत.

आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्रातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्या विविध रचनांचा, अभंगांचा अभ्यास केलेला होता. त्यांच्या जवळील लोकांनी त्यांना आग्रह करून त्यांच्याकडून त्यातील काही निवडक अभंग निवडून त्यावर त्यांच्या भाष्यासह पुस्तक रूपात प्रसिद्ध केले होते. 

वरील सर्व संतांचे साहित्य खूप मोठे आहे. आणि त्यांचे पूर्ण साहित्य ज्यांना वाचणे शक्य नाही, अशा जिज्ञासूंसाठी हे निवडक अभंग, या संतांच्या साहित्याची तोंडओळख करून घेण्यासाठी तर खूप उपयोगी आहेच. पण मला स्वतःला आयुष्यात कठीण प्रसंगात हे साहित्य दीपस्तंभा प्रमाणे उपयोगी  पडले आहे. संत आपल्या आयुष्यात किती प्रचंड कार्य करून जातात, की जे येणाऱ्या कित्येक पिढ्या, कित्येक शे वर्षे किती उपयोगी पडते, याची कल्पना फक्त तेच करू शकतील ज्यांना याचा अनुभव आलेला आहे. असो.

तर अशा या संत साहित्यातील संत नामदेव यांच्या काही रचना, येणाऱ्या काही दिवसांत, प्रस्तुत करण्याचा विचार आहे. आणि त्यांचा अर्थ, माझ्या अल्पबुद्धीला जसा लक्षात येतो, तसा काही ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की परमार्थ मार्गावरील साधकांना हा प्रयत्न रुचेल.

Sant Namdev Abhang-1 

संत नामदेवांचे सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.

या ठिकाणी, संत नामदेवांचे अभंग कुठल्या क्रमाने घेतलेले नाहीत, तर साधारण विषयवार घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कधी कधी माणसाला, आयुष्याचा विचार करतांना, त्याचा क्षणभंगुरपणा अत्यंत व्यथित करतो, आणि काही सुचेनासे होते. आपल्यासारख्या सामान्यांना तेवढ्यापुरते स्मशानवैराग्य येते, आणि काही वेळातच आपण पुन्हा रोजच्या व्यवहारात गुंतून जातो, आणि त्या क्षणभंगुरपणाला विसरून जातो. पण नामदेवांना हा क्षणभंगुरपणा आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. खालील अभंगात संत नामदेवांनी या क्षणभंगुरपणाचे अत्यंत वास्तव वर्णन केले आहे, आणि शाश्वत काय आहे, हे सांगितले आहे..

1

अंतकाळीं मी परदेशी | ऐसें जाणोनि मानसीं|

म्हणोनियां हृषीकेशी | शरण तुजसी मी आलों||

 नवमास गर्भवासी | कष्ट झाले मातेसी

ते निष्ठुर झाली कैसी | अंतीं दूर राहिली||

 जीवीं बापासी आवड मुखीं घालूनि करी कोड

जेव्हां लागली यमओढ तेव्हां दूर टाकिलें||

 मित्र आले गोत्रज आले ते हि स्मशानी परतले

शेवटी टाकोनियां गेले | मजलागीं स्मशानीं||

 ऐसा जाणोनि निर्धार | मग मज आला गहिंवर

तंव दाही दिशा अंधकार | मग मज कांहीं सुचे||

 ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं मनुष्यजन्म मागुता नाहीं

नामा म्हणे तुझे पायीं | ठाव देई विठोबा||

 पूर्ण आयुष्याचा हिशोब या अभंगात मांडला आहे. आणि कितीही जवळचे असले, तरी त्यांची साथ केवळ स्मशानभूमीपर्यंतच या विदारक सत्याला मांडले आहे. मग शेवटी काय बरोबर येते? तर आयुष्यभर केलेली भक्तीच शेवटी सोबत येते, असे सांगितले आहे.  

  1.  

चोरा ओढोनियां नेइजे जें शूळीं | चालतां पाउलीं मृत्यु जैसा

तैसी परी मज झाली नारायणा | दिवसेंदिवस उणा होत असे ||

 वृक्षाचिये मुळीं घालितां कुऱ्हाडी | वेंचे तैसी घडी आयुष्याची

नामा म्हणे हेंहि लहरीचें जळ | आटत सकळ भानुतेजें ||

 

आयुष्य पळा पळाने कमी होत आहे, याची जाणीव या ठिकाणी करून दिली आहे, आणि लहरींचे जळ जसे सूर्याच्या तेजाने आटते, तसे हे आयुष्य आटत जाते आहे हे सांगितले आहे.namdev payri

 

3

जंव हंस काया नव जाय सांडोनि | तंव घेई ठाकोनि रामनाम

अंतकाळवेळीं तुझें नव्हे कोण्ही | मी माझें म्हणऊनि भुललासी ||

 एकलें चि येणें एकलें चि जाणें | पहा दृढ ज्ञानें विचारोनि

पाप पुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती | येरें तीं राहती जेथींचीं तेथें

विष्णुदास नामा विनवितसे तुम्हां | झणीं परब्रह्मा विसरू नका ||

 

शेवटी फक्त आयुष्यभर केलेले पुण्य आणि पाप हेच सोबत येणार आहे त्यामुळे परब्रह्म परमात्म्याला विसरू नका, तोच तुम्हाला यातून तारेल, असे विनवून सांगितले आहे.

संत कबिरानेही एका अभंगात अशीच भावना व्यक्त केली आहे-

उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मैला

छुटेंगे महल अटारी, छूटेगी दुनियादारी
कुटुंब कबीला छुटे-छुटे, बचपन दिन संग खेला रे

जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला
ना जानू या किधर गिरेगा, लगे या पवन का रेला

जब होवे उमर पूरी, जब छूटेगा हुकुम हजूरी
जम के दूत बड़े मजबूत, जम से पड़ा झमेला

हर के कबीर गुण गावे, वह हर को परा पावे
गुरु की करनी गुरु जानेगा , चेला की करनी चेला

 4

 जाइजणा देह जाईल नेणसी | लौकिक मिरविसी लाजसी ना

माझें माझें माझें मानिसी निर्भांत | करिसी अपघात रात्रंदिवस ||

 सांग तूं कोणाचा आलासी कोठूनि | दृढ बुद्धि मनीं विचारी पां

विषयार्चेनि संगें भुशील झणें भोगिसी पतन रात्रंदिवस

नामा म्हणे एक ध्याई कमळापति | निजाचा सांगाती केशिराज ||

5

आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक | संपत्तीचें सुख विषय हा

हित तें आचरा हित तें विचारा | नामीं भाव धरा जाणतेनो ||

 संपत्तीच्या बळें एक झाले आंधळे वेढिले कळिकाळें स्मरण नाहीं

एक विद्यावंत जातीच्या अभिमानें | नेले तमोगुणें रसातळा

नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा | सोडवीं केशवा मायबापा ||

 6

प्रपंचडामोडी सरे कल्पकोडी | वासनेची बेडी पडली पायीं

सोडवण करा आलेंनो संसारा | शरण जा उदारा विठोबासी ||

 लटकी मायादेवी गर्भवासी गोंवी | नश्‍वर भोगवी नाना योनि

नामा म्हणे तुम्हीं विचारावें मनीं | सोयरा निर्वाणीं पांडुरंग ||

 7

अवघे सावधान होऊनि विचारा | सोडवण करा संसाराची

अवघा काळ वाचे म्हणा नारायण | वायां एक क्षण जाऊंनद्या ||

 अवघे मायामोहे गुंतलेती पाहा | अवघे सहज आहां ब्रह्मरूप

नामा म्हणे अवघे सुखाचे चि व्हाल | जरी मन ठेवाल विठ्ठलपायीं ||

 

 यापुढील काही लेखांत आपण संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहणार आहोत.

 

 

 माधव भोपे 

 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading