https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-2 Sant Namdev Abhang-2

Sant Namdev Abhang-2

संत नामदेवांचे अभंग-2

 

संत नामदेवाची भजनें म्हणजे अगदी थोड्या शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहेत. मागील लेखात आपण नामदेवांची, आयुष्याच्या क्षणभंगुरपणाबद्दलची काही भजनें पाहिली. त्याचप्रमाणे  संसारात पडल्यावर माणूस, स्वतःचे आणि मुला बाळांचे पोट भरता भरता, कसा केविलवाणा होऊन जातो, पण त्याला त्याचे भान नसते, हे सांगणारे काही त्यांचे अभंग आहेत.

विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा | करितसे कल्पना नानाविध

कुटुंबपाईक म्हणवी हरीचा दास मागे ग्रासोग्रास दारोदारी

पोटालागीं करी नाना विटंबना | संतोषवी मना दुर्जनांच्या

वैराग्याची वार्ता कैंची दैवहता | नुपजे सर्वथा प्रेमभावो

नामा म्हणे ऐसे तारी एक्या गुणें | अजा आरोहण गजस्कंधीं

goat on the shoulder of elephant

विषयांनी बांधलेला माणूस केविलवाणा दिसतो, सतत नानाविध कल्पना- असे झाले तर-तसे झाले तर- अशा कल्पना करून करून चिंता करत राहतो. ‘मागे ग्रासोग्रास दारोदारी’ हे या स्वरूपात नाही, तरी वेगळ्या स्वरूपात आपण आजही पाहतोच. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कशा कशा दुर्जनांची चाकरी करावी लागते, त्यांना खुश ठेवावे लागते. अशा माणसाला वैराग्य कुठून येणार- तो ‘दैव-हत’- दैवापुढे हतबल झालेला असा- जो माणूस आहे, त्याच्या हृदयात देवाविषयी प्रेम भाव कसा उपजेल?

पण असे जरी असले, तरी एक मार्ग आहे- “अजा आरोहण गजस्कंधीं” या ठिकाणी एक छान उपमा दिली आहे- बोकड जंगलातून जात असतांना- त्याला नाना प्रकारच्या हिंस्त्र श्वापदांपासून भय असते- पण कसेही करून जर त्याने हत्तीशी मैत्री करून घेतली- तर तो त्याच्या खांद्यावर बसून मजेत जंगल पार करू शकतो- समर्थाचा आश्रय घेतल्यास संकटांना घाबरण्याचे कारण उरत नाही- मग सर्व शक्तिमान परमेश्वराचा आश्रय घेतला- तर संसाररूपी जंगल विनासायास, सुरक्षितपणे पार करता येते.

अजून एका अभंगात, वीतभर पोटासाठी काय काय करावे लागते, याचे अगदी वास्तव वर्णन केले आहे- मला यात अजून एक सुचवावेसे वाटते- आजकाल नुसते पोट भरणे एवढे अवघड राहिले नाही- पण या ठिकाणी आपण रसना- जिभेची चटक- किंवा वासना- विविध भोग भोगण्याची अदम्य इच्छा- या गोष्टी जर घातल्या, तर खालील अभंग अगदी तंतोतंत आजच्या काळाला लागू पडतो-

वीतभर पोट लागलेंसे पाठी | साधूसंगें गोष्टी सांगूं देई

पोट माझी माता पोट माझा पिता | पोटानें ही चिता लाविलीसे

पोट माझा बंधु पोट माझी बहीण | पोटानें हें दैन्य मांडियेले

विष्णुदास नामा पोटाकडे पाहे | अजूनि किती ठाय हिंडवीसी

त्यानंतरच्या एका अभंगात, पापा पासून वाचण्याचा अगदी सोपा मार्ग संत नामदेव सांगतात-

परदारा परधन परनिंदा परपीडन | सांडोनि भजन हरीचें करा

सर्वांभूती कृपा संतांची संगति | मग नाहीं पुनरावृत्ति जन्ममरण

नामा म्हणे नलगे साधन आणिक | दिधली मज भाक पांडुरंगे

खरंच- आपल्या आजूबाजूला पाहिले, तर सर्व प्रकारची दुष्कृत्यें या चार प्रकारात मोडतात- परदारा, परधन, परनिंदा आणि परपीडन. या चार गोष्टी सोडून, हरीचे भजन जर केले, आणि सगळ्यांबद्दल कृपाभाव ठेवला, आणि संत- सज्जनांची संगत धरली- तर यापेक्षा वेगळे साधन काय लागणार- अशा माणसाला जन्ममरण आणि  पुनरावृत्तिपासून सुटका मिळेल, यात काही संशय नाही- आज इतरांबद्दल द्वेष, असूया, या गोष्टींमुळे मनुष्य नाना प्रकारच्या मानसिक आणि मनो कायिक रोगांना बळी पडत असलेला आपण बघतो- तो सगळ्यांबद्दल कृपाभाव जर ठेवला, तर अशा रोगांपासून दूर राहू शकेल. या तीनच ओळींमध्ये संत नामदेवांनी आधुनिक जगात सुद्धा कसे राहावे याचा आदर्शच घालून दिला आहे असे दिसते.

आणि मग आजकालच्या जगात नुसतेच भक्त असण्याचे ढोंग करणारे- महात्मा असण्याचे ढोंग करणारे असे लोक कसे बोकाळले आहेत, त्याबद्दलचे काही अभंग आजच्या स्थितीलाही तंतोतंत लागू पडतात-

मुखीं नाम हातीं टाळी दया नुपजे कोणे काळीं

काय करावें तें गाणें | धिग धिग लाजिरवाणें

हरिदास म्हणोनि हालवी मान | कवडीसाठीं घेई प्राण

हरिदासाचे पायीं लोळे | केशीं धरोनि कापी गळे

नामा म्हणे अवघे चोर | एक हरिनाम थोर

पोटीं अहंतेसी ठावो | जिंव्हे सकळ शास्त्रांचा सरावो

भजन चालिले उफराटें। कोण जाणे खरें खोटें

सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा

सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा

मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा

नामा म्हणे अवघें खोटें | एक हरिनाम गोमटे

 वरील अभंगात तर सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा, असे सांगून अशा दांभिक लोकांचे वर्णन केले आहे- सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा, मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा या ओळींमधून नामदेव किती सुधारक विचाराचे होते, हे दिसून येते.

 ज्ञानदेवांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसांनी अल्लाउद्दीन खिलजीचें महाराष्ट्रावर आक्रमण झालें. तत्पूर्वी महाराष्ट्र मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्‍त होता. पण नामदेव महाराज ऐंशी वर्षं जगले. म्हणजे ज्ञानदेवानंतर नामदेव जवळ जवळ पन्नास वर्षे राहिले.  त्यांनी  पाहिलें की सगळीकडे इस्लामचा प्रचार चालला आहे.  काही इस्लामचे राजे तर आले आणि गेले.  काही टॅक्स घेऊन परत गेले, परंतु सूफी तत्त्वज्ञानी भारतात फिरत होते ते महाराष्ट्रांतहि होते आणि परमात्मा एक आहे असें सांगत होते. नामदेवाने विचार केला की हा जो हल्ला आहे तो कसा परतवता येईल? त्यातला चांगला अंश ग्रहण केल्याशिवाय होणार नाही. इस्लाम म्हणतो, परमेश्वर एक आहे. पण हिंदूंमध्ये काय चालतें ? कुणी गणपतीची पूजा करतात, कुणी कुणाची, कुणी कुणाची. आणि जो तो आपली उपासना श्रेष्ठ मानून चालला आहे. फकीर सांगत होते, अल्लाह एक आहे, मानव एक आहे. त्यातले गुण घेतले पाहिजेत, म्हणजे तो हल्ला परतवता येईल. नामदेवाने विचार केला, आपणसुद्धा एकच ईश्‍वर मानतो. परमेश्‍वराचें एकत्व तर आपणहि मानतो. आपण दहा ईश्‍वर काही मानत नाही. हिंदूंचे मत वेदामध्ये एका वाक्यात आलें आहे, एकं सत्विप्रा बहुधा वदन्तिसत्य एक आहे, पण विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नामांनी बोलावतात. हिंदू धर्मातहि परमेश्‍वराचें एकत्व मानले आहे. पण तें लोपल्यासारखें होते. आम्ही नाना देवतांच्या मागे लागल्यामुळे या देवतेचा उपासक त्या देवतेच्या दर्शनालासुद्धा जाणार नाही, इतकी तयारी होती. म्हणून नामदेवाने विचार केला की एकत्वाचें प्रतिपादन केले पाहिजे. म्हणून जिथे जिथे इस्लामचा प्रचार होता तिथे तिथे यात्रा करीत नामदेव महाराज पोहोचले. इस्लामचा प्रचार सगळ्यात जास्त पंजाबात होता, म्हणून नामदेव महाराज तेथे गेले आणि  वीस वर्ष राहिले! तिथे त्यांनी पाहिलें की, प्रत्येक गांवात एक फकीर फिरत आहे आणि ईश्‍वर एक आहे असें समजावून सांगत आहे. नामदेवाने विचार केला ही एकता तर आपल्याहि धर्मात आहे, पण ती सांगितल्याशिवाय कशी कळणार? त्यांनी  एक भजन केलें आहे. त्यात एका बाजूने हिंदूला टोला हाणला

व दुसऱ्या बाजूने मुसलमानांना.

हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीति

नामे सोई सेविआ जह देहुरा मसीति

 हिंदू देवळातील देवाला पूजतात, तर मुसलमान मस्जीदीला पवित्र मानतात- पण दोघांनीही हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सोई सेविआ जह देहुरा मसीति त्याचे सेवन करा-त्याची आस धरा-जो न देवळात राहतो, न मस्जीदीत. हिंदु देवळाची पूजा करतात आणि देवाला विसरले; मुसलमान मशिदीची पूजा करतात, मशिदीतच परमेश्‍वर आहे असें मानतात. म्हणजे तुम्हीसुद्धा मूर्तिपूजक आहात. म्हणून दोन्हीची पूजा सोडा आणि अंतर्यामी जो भगवान्‌ आहे त्याच्याकडे वळा, असें सांगत सांगत नामदेव महाराज  फिरले.  त्याचा परिणाम असा झाला की इस्लामची जी लाट आली होती ती थोपविली गेली. नानक महाराज आले, त्यांनी तेंच सांगितलें.

असो. हे थोडे विषयांतर झाले. पण आजकालच्या जगात, दंभ- ढोंग यांचीच कशी चलती झाली आहे, हे सांगणारे आणखी काही अभंग आहेत-

काय करूनि तीर्थाटणें | मन भरिलें अवगुणें

काय करावें तें तप | चित्तीं नाहीं अनुताप

मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें

नामा म्हणे सर्व सोपें पाप जाय अनुतापें

 बापरे! मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें किती स्पष्ट बोलतात नामदेव महाराज- मनात नुसता पापाचा संकल्प जरी केला तर तीर्थाच्या बापानेही ती पापें जायची नाहीत!

आणखी एक अभंग- मीच भक्त आहे- मीच मुक्त आहे अशी शेखी मिरविणाऱ्या पापी आणि दुराचारी लोकांची पोलखोल केली आहे-

देहाचें ममत्व नाहीं जों तुटले | विषयीं विटलें मन नाहीं

तंव नित्यसुख कैसेनि आंतुडे | नेणती बापुडे प्रेमसुख

मी चि एक भक्‍त मी चि एक मुक्‍त | म्हणवी पतित दुराचारी

नामा म्हणे तुझे कृपेविण देवा | केंवीं जोडे ठेवा विश्रांतीचा

तसेच एका अभंगात- हट्टाने कठिण योग साधना करणाऱ्या साधकांना सुद्धा सावध केले आहे- भुजंग हा नुसता पवन म्हणजे वाऱ्याचा आहार करून राहतो, अशी वदंता आहे- पण म्हणून तो काही योगेश्वर होत नाही. निरनिराळ्या योग साधनांनीt काया पालटेल- पण मन शुद्ध झाले नाही तर त्याचा काही उपयोग नाही असे सांगितले आहे.

 भुजंग विखार पवनाचा आहार | परी योगेश्‍वर म्हणूं नये

पवनाच्या अभ्यासें काया पालटी | परी तो वैकुंठीं सरता नव्हे

मन हें दर्पण करोनि निर्मळ | पाहें पां केवळ आत्मा स्वयें

तुझा तूं केवळ तुजमाजीं पाहीं | नामा म्हणे ध्याई केशिराजु

 आपल्या संत परंपरेमध्ये अशी अनेक रत्नें आहेत. अशा या अमूल्य ठेव्याची ओळख आपण येत्या काही लेखांत करून घेणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांची भजने-1 

 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading