https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-4 Sant Namdev Abhang-4

Sant Namdev Abhang-4

संत नामदेवांचे अभंग-4

 

मागील लेखात आपण ‘देह अभिमान’ म्हणजे ‘मी देह आहे’ या समजुतीमुळे काय काय दुःख सहन करावे लागते, याचे वर्णन संत नामदेवांनी केलेले पाहिले. नंतर आपल्या मनाला, विषय भोगांपासून दूर राहून, देवाच्या स्मरणात राहण्याविषयी परोपरीने समजावले त्याचे अभंग आहेत.

आता पुढील काही अभंग हे ‘नामाच्या गोडी विषयी आहेत.

नामाची गोडी सांगतांना संत नामदेवांनी काही खूप बहारदार उदाहरणे दिली आहेत. त्यावरून, एखादी गोष्ट समजावून सांगतांना, उपमांचा वापर केल्यावर ती गोष्ट कशी आपल्या मनावर पटकन ठसते, याचाही अनुभव येईल.

गोक्षीर लाविले आंधळियामुखीं | तेथील पारखी जिंव्हा जाणे

तैसें देवा तुझें नाम निरंतर | जिंव्हेसी पाझर अमृताचे

सोलूनियां केळें साखरें घोळिलें | आंधारी खादलें तरी गोड

जाणोनियां नामा करी विनवणी | अमृताची खाणी नाम तुझें

 

नाम कळत किंवा नकळत जरी घेतले, तरी त्याचा फायदा व्हायचा तो होतोच, त्याची गोडी येतेच, हे सांगतांना नामदेव महाराज सांगतात- गाईचे दूध आंधळ्या माणसाला जरी प्यायला दिले, तों ते पाहू शकत नसला, तरी त्याच्या जिभेला त्या दुधाची चव बरोबर कळते. दिसत नाही म्हणून त्याचे काही अडत नाही. तसे देवा, तुझ्या नामाची महति माहीत नसतांना जरी नांव घेतले, तरी तुझे नांव अमृतरूपी असल्याने, जिंव्हेला जणू अमृताचा पाझर फुटतो.

केळे सोलून, त्यात साखर घालून, अंधारात जरी खाल्ले, तरी ते गोडच लागते. तसे देवाचे नांव हे जाणता, अजाणता कसेही घेतले, तरी त्याची गोडी अनुभवास येतेच.

नाम तें चि रूप रूप तें चि नाम नामरूप भिन्न नाहीं नाहीं

आकारला देव नामरूपा आला म्हणोनि स्थापिले नाम वेदी

नामापरता मंत्र नाहीं हो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन

नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ भक्‍त भले

 

नाम आणि रूप हे भिन्न नाहीतच मुळी. देव हा ‘नाम’ रूपाने आकारास आला आहे. नामापरता दुसरा कोणता मंत्र नाही.

मंत्राचा पैं मंत्र हरि हा उच्चार लगे तो विचार करणें कांहीं

सुफळ नाम गाढें वाचेसीं उच्चारू | केशव हा चि करूं सर्वांभूती

नाहीं त्यासी पतन नव्हेचि बंधन | नित्य हें चि स्नान रामनामें

नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालूं नका

 

आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही नामाचा उच्चार सुरू करा, जास्त काही विचार करण्याची गरज नाही. आणखीन जास्त पसारा वाढवायची गरज नाही.

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

पहा विचारूनि अनुभव मनीं | नका आडरानीं झणीं भरू

नामावांचूनियां तरलों जे म्हणती | ते आधीं बुडती भवाब्धींत

नामा म्हणे नाम ओकाराचें मूळ | ब्रह्म तें केवळ रामनाम

विठ्ठल विठ्ठल म्हणा उघडा मंत्र जाणा | कळिकाळ आंकणा होईल तुम्हां

वेदांचें हें सार शास्त्रांचे गहृर | तें जाणा अक्षर विठ्ठलनाम

करावें खंडण अखंड उच्चारण | देश काळ वर्तमान नाहीं येथें

जीवींचें निजगूज मुक्‍तीचें तें बीज | नामा म्हणे मज सांपडलें

काळ वेळ नसे नामसंकीर्तनीं उंच नीच योनि हें हि नसे

धरा नाम कंठीं सदा सर्वकाळ | मग तो गोपाळ सांभाळील

कृपाळु कोंवळा सुखाचा सागर | करील उद्धार भाविकांसी

नामा म्हणे फार सोपें हें साधन | वाचे नाम घेणें इतुकें चि

 

पढावे वेद, नको शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा

नव्हे ब्रह्मज्ञान, होय वैराग्य | साधा भक्तिभाग्य संतसंगें

येर क्रियाकर्म करितां हो कळी– | माजीं कोण बळी तरले सांगा

नामा म्हणे गूज सांगितलें संतीं यापरती विश्रांति आणिक नाहीं

 

केशव म्हणतां क्ले जाती परते | त्याहूनि सरतें आणिक नाहीं

वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी | उदंड वाचेसीं हरि म्हण

पहा याहूनियां आन नाहीं दुसरें | भीष्में युधिष्ठिर उपदेशिला

नामा म्हणे धरीं केशवीं विश्‍वास | तरसी गर्भवास नामें एके

साराचें हि सार भक्‍तीचें भांडार | नाम निरंतर गातां वाचे

कासया करावें आणिक साधन नामाविण क्षण जाऊं नेदी

दया शांति क्षमा हें चि पैं भूषण नामसंकीर्तन अहर्निशी

नामा म्हणे जप अखंड नामाचा | काळ हा सुखाचा सदोदित

भवसिंधूचा पार तरावयालागीं साधन लियुगीं आणिक नाहीं

अहर्निशीं नाम जपा श्रीरामाचे जें सकळ धर्माचिं मुकुटमणि

चले वर्णाश्रम धर्मआचरण | घडे व्रत दान तप कोणा

नव्हे तीर्थाटन पुराणश्रवण | नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध

नामा म्हणे नाम राघोबाचें गातां | ब्रह्मसायुज्यता घर रिघे

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे | नामापासीं असे भक्ति मुक्ति

नामाऐसें सोपें नाहीं त्रिभुवनी नाम संजीवनी साधकांसी

यज्ञदानतपें नामें आलीं हाता | नामें सर्व सत्ता प्राप्त होय

नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं | नाहीं त्याचे तुकीं दुजा कोणी

कलियुगात यज्ञ, तप, निरनिराळी व्रतें हे सर्व करण्याची मनुष्याची क्षमता राहणार नाही, म्हणून सर्व संतांनी ‘नामाचा’ आश्रय घ्यायला सांगितले आहे. ‘नानक नाम जहाज है’- संसार रूपी, निरनिराळ्या संकटांनी भरलेला भवसागर तरून जाण्यास नाम हे ‘जहाज आहे- या जहाजात बसून, सुरक्षितपणे, आरामात पैलतीराला पोंचता येते, असे गुरु नानक सांगून गेले आहेत. कोणत्याही संताची वाणी पाहिली, तरी त्यात हर प्रकारे नामाचे महत्त्व सांगितले आहे.

नामदेवांच्या तर नांवातच ‘नाम’ आहे. नामदेव हे केवळ ‘नाम’ घेण्यासाठीच जन्माला आले. त्यामुळे, नाम माहात्म्य सांगतांना नामदेवांच्या वाणीला अधिकच बहर येतो यात काही नवल नाही.

पुढील लेखात आपण नामाच्या सामर्थ्याबद्दल नामदेवांचे काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading