https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Makar Sanranti-2025

यावर्षीच्या संक्रांतीसंबंधात माहिती-

यावर्षी सूर्य मंगळवार दि. १४ जानेवारीला सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहे. म्हणून संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी १६.५५ पर्यन्त आहे.मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते?हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमधील सण हे हिंदू कॅलेंडर किंवा पंचांगानुसार साजरे केले जातात. आणि पंचांगातील तिथी या चंद्राच्या भ्रमणानुसार शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमा अन पुन्हा कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्या अशा मोजल्या जातात. आणि आपले मुख्य सण- जसे की पोळा-( श्रावण अमावस्या), रक्षाबंधन (श्रावण पौर्णिमा), गणेश चतुर्थी- (भाद्रपद शुक्ल चतुर्थी), देवी घटस्थापना ( आश्विन शुक्ल प्रतिपदा), दसरा (आश्विन शुक्ल दशमी), दिवाळी (आश्विन महिन्याची अमावस्या) इत्यादि सर्व सण हे चांद्र कालगणनेनुसार किंवा चांद्र महिन्यानुसार (Lunar calendar) ठरतात, जेंव्हा की आपण रोजच्या व्यवहारात वापरीत असलेले जानेवारी फेब्रुवारी हे कॅलेंडर ज्याला की ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात, ते सूर्यावर आधारित आहे (Solar calendar). ग्रेगोरियन कॅलेंडर हे इ. स. १५८२ मध्ये पोप ग्रेगोरी 11 यांनी जूलियन कॅलेंडर च्या ऐवजी सुरू केले जे सौर कॅलेंडर आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तुम्ही हिंदू पंचांग काढून पहा. पंचांगात सूर्याचा राशी बदल हा  इंग्रजी महिन्याप्रमाणे  दर महिन्याच्या साधारण 14 किंवा 15 तारखेच्या आसपास होतो असे दिसून येईल. म्हणजे सूर्य एका राशीत साधारण 30 दिवस राहतो. अर्थात, सूर्याच्या प्रवेशाचा किंवा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की सूर्य फिरत आहे, तो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, याला परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा वेळ लागतो.मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीपासून मकर राशीत संक्रमण करण्याचा दिवस. तसे सूर्याचे संक्रमण दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत होतच असते- म्हणजे तसे पाहिले तर दर महिन्यातच संक्रांत असते!. पण जेंव्हा सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ते झाले- मकर संक्रमण.  हे संक्रमण अनेक कारणांमुळे महत्त्वाचे मानले गेले, आणि त्यामुळे हे मकर संक्रांती म्हणून साजरे केले जाऊ लागले.  मकर म्हणजे कॉन्स्टेलशन ऑफ कॅप्रिकॉर्न (constellation of Capricorn). खगोलशास्त्रातील मकर राशी आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील मकर राशीमध्ये थोडा फरक आहे. संक्रांती म्हणजे संक्रमण, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे, हिंदू धर्मातील सुरुवातील उल्लेख केलेले इतर सण चंद्र कॅलेंडर वर आधारित असल्यामुळे, सूर्यावर आधारित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये त्यांच्या तारखा बदलत राहतात, पण मकर संक्रांत ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असल्याने, ती ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ठराविक तारखेला येते.  पण ग्रेगोरियन कॅलेंडर मध्येही ती लीप वर्षाला 15 तारखेला येते.पण काही शे वर्षांपूर्वी ती 14 तारखेलाच येत होती का? तर नाही.सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंकद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.उत्तरायण म्हणजे काय? ४०० वर्षांपूर्वी संक्रांत ९ जानेवारीला येत होती! भौगोलिक संदर्भदरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (स्वतःच्या आसाभोवती तिरक्या अंशाने फिरणे) (Axial precession) सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखाइंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०
  • इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
  • इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
  • इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
  • इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
  • सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
    • १३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
    • १५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
    • १४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
  • १६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
  • १७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
  • १८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
  • १९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
  • २० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
  • २१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
  • २२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
  • २३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)
असो. वरील तांत्रिक बाबी काहीही असल्या, तरी, आपल्या येथील सर्व सण हे निसर्गचक्राच्या कुठल्या ना कुठल्या महत्वाच्या घटनेसोबत जोडलेले असतात, हे नक्की.भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे या भारतातील सर्व सण हे कृषि संस्कृतीशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे. या दिवसांमध्ये शेतातील खरीपाचे धान्य घरी आलेले असते, आणि रबीच्या पेरणीची बहुतेक सर्व महत्वाची कामें उरकलेली असतात आणि शेतकऱ्याला थोडी सवड मिळालेली असते. निसर्ग यावेळी अत्यंत अनुकूल असतो, शेतात धान्य बहरात डोलत असते. तसेच निसर्गात उत्तरायणाची सुरुवात ही आनंददायक, प्रकाशाने आणि उत्साहाने भरलेली अशी असते. आणि अशा वेळी होणारा आनंद साजरा करण्यासाठी निमित्त म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणून शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात .rमहाराष्ट्रातील संक्रांती बद्दल-महाराष्ट्रात संक्रांत हा सण ३ दिवस साजरा केला जातो. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. भोगीच्या आणि संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करतात. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतात. सकाळी मुगाची खिचडीही करण्याची पद्धत आहे. यादिवशी सगळ्या भाज्यांची मिळून लेकुरवाळी भाजीही करतात. त्यात वाल, वांगे, गाजर, ओले हरभरे, ताजा वाटाणा, अजून जेवढ्या प्रकारच्या शेंगा उपलब्ध असतील त्याप्रमाणे त्या शेंगा, या सर्वांची तिळाचा कूट लावून भाजी करतात. वरील प्रमाणे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि अशी मिश्र भाजी ही या थंडीच्या ऋतुला अनुकूल उष्ण, स्निग्ध आणि पौष्टिक असते.सासरी गेलल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगीच्या  दुपारी जेवणाचा बेतही खास असतो. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार बेत असतो. संक्रांतीच्या दिवशी तीळगूळ घातलेली पोळी करतात. काही जण पुरणाची पोळी पण करतात. 
  • किंक्रांत
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलेआहारदृष्ट्या महत्त्वसंक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. हा दिवस, काही कारणांमुळे  दूर गेलेले नातेसंबंध, नातेसंबंधात निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठीही आहे. पुराणातील कथेनुसार भगवान सूर्यदेव या दिवशी आपला पुत्र शनि यास भेटतात. शनि हा मकर राशीचा स्वामी मानला गेला आहे.  सूर्य आणि शनि या पिता पुत्रांचे आपआपसात जमत नाही अशी आख्यायिका आहे. पण या दिवशी, सूर्यदेव शनीला भेटतात आणि परस्पर संबंध नीट करतात.अन्य माहितीमहाभारतात  भीष्म पितामह हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. उत्तरायणात प्राण त्याग केलेले योगी, उत्तम गतीला जातात, त्यांना पुनर्जन्माच्या चक्रात अडकावे लागत नाही, असे सांगितले आहे. (गीतेतील आठवा अध्याय पहावा).मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो). यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडयात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगूळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. त्याला वस्तू ‘लुटणे’ असे म्हणतात. त्यानिमित्ताने देण्याची सवय लागते, आणि महिलांच्या एकमेकींच्या सामूहिकरीत्या भेटीही होतात. महिलांचा हा सण अत्यंत आवडीचा असतो. नवीन लग्न झालेल्या मुळी  या दिवशी हौसेने काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते, हे कदाचित त्यामागचे कारण असावे.मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे..महाराष्ट्रात आपण तीळ गूळ घ्या, गोड बोला, असे म्हणून एकमेकांना तीळ आणि गूळ देऊन मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतो. या दिवशी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्यांना त्यांच्याविषयीचा आदर म्हणून पाया पडून त्यांचे आशिर्वाद घ्यायचे असतात आणि मोठ्यांनी लहानांना तीळ आणि गूळ देऊन त्यांचे तोंड गोड करायचे असते आणि त्यांना आशिर्वाद द्यायचा असतो. तसेच बरोबरीच्या लोकांनी एकमेकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा द्यायच्या असतात. आपण सर्व ही एकमेकांना शुभेच्छा देऊन हा मंगल सण साजरा करूयात- तीळगूळ घ्या- गोड गोड बोला! 

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading