Sant Namdev Abhang-6
संत नामदेवांचे अभंग-6
तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले थोर संत नामदेव यांच्या अभंगांविषयी आपण चर्चा करीत आहोत. यापूर्वीच्या चौथ्या आणि पाचव्या भागात भगवंताच्या नामाचे महत्त्व आणि नामाचे सामर्थ्य याबाबत नामदेवांचे अभंग आपण पाहिले.
नामाची गोडी लागायला, सत् संगत- आणि संतांची संगत पाहिजे. संतांचा महिमा सांगणारी काही भजने आपण पाहूयात.
संतपायीं माया धरितां सद्भावें । तेणें भेटे देव आपोआप
म्हणूनि संतां अखंड भजावें | तेणें भेटे देव आपोआप
साधूपाशीं देव कामधंदा करी | पीतांबर धरी वरी छाया
नामा म्हणे देव इच्छी संतसंग | आम्हां जिवलग जन्मोजन्मी
ज्ञानेविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि
तरी तें चि ज्ञान जाणायालागूनि | संतां वोळगोनि वश्य कीजे
प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला | पाहिजे साक्षिला सद्गुरु तो
नामा म्हणे सेवा घडावी संतांची | व्हावी कृपा त्यांची तें चि ज्ञान
संतांची महति सांगतांना नामदेव महाराज म्हणतात- ‘साधूपाशी देव कामधंदा करी’- आणि अनेक संतांच्या गोष्टींमधून आपल्याला हे दिसते- देव जनाबाईला जात्यावर धान्य दळू लागले, काम करू लागले, संत कबीराचे शेले विणू लागले, चोखोबासोबत गुरे ओढू लागले अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. संतांनी आपला भार पूर्ण देवावर घातलेला असतो. त्यामुळे मग त्यांची पूर्ण जबाबदारी तो घेतो.
परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे
कीटकी ध्यातां भृंग झाली तो चि वर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे
अग्नीस मिळें तें न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगे
नामा म्हणे केशवा मज देई संतसंग । आणिक कांहीं तुज न मागें बापा
जसे परिसाचे स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण होते, तसेच सामान्य जनांना संतांच्या संगतीने नारायणाची भेट होते, म्हणून नामदेव महाराज म्हणतात हे देवा- मला फक्त संत संगत दे- आणखी काहीही नको.
कडू वृंदावन साखरें घोळिलें | तरी काय गेलें कडूपण
तैसा तो अधम करी तीर्थाटण | नोहे त्याचें मन निर्मळत्व
बचनाग–रवा दुग्धी शिजविला | तरी काय गेला त्याचा गुण
नामा म्हणे संतसज्जन–संगती | ऐशास हि गति काळांतरीं
कडू वृंदावन नांवाचे फळ असते, जे आयुर्वेदात काही रोगांसाठी औषधीच्या रूपात वापरतात. ते खूप कडू असते. साखरेत घोळले तरी त्याचे कडूपण जात नाही. अधम माणसाने तीर्थाटन केले तरी त्याचे मन निर्मळ होत नाही. बचनाग- हेही एक प्रकारचे विष आहे-ते दुधात शिजविले तरी त्याचा विषारी गुण काही जात नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, इतके कडू, किंवा अधम असले तरी, अशा लोकांचीही बुद्धि संतांच्या संगतीने पालटू शकते, आणि कालांतराने त्यांनाही योग्य गती मिळू शकते.
धिग धिग तो ग्राम धिग धिग तो आश्रम | संतसमागम नाहीं जेथें
धिग धिग ते संपत्ति धिग धिग ते संतति | भजन सर्वांभूती नाहीं जेथें
धिग तो आचार धिग तो विचार । वाचें सर्वेश्वर नाहीं जेथें
धिग तें गाणें धिग तें पढणें | विठ्ठठनाम–नाणें नाहीं जेथें
नामा म्हणे धिग धिग त्यांचें जिणें | एका नारायणेंवांचूनियां
नामदेव महाराज म्हणतात, तो गांव, तो आश्रम काय कामाचा जिथे संत समागम नाही. त्याचा धिक्कार असो. अशी संपत्ति आणि अशी संतती यांचा पण धिक्कार असो.
मंत्र तंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परी राम प्रत्यक्ष न करी कोणी
प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय । आणिकांची काय चाड मज
सर्वकर्मी राम भेटविती मातें । जीवेंभावें त्यांतें ओवाळीन
नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला | सोयरा भेटला अंतरींचा
संतांचें लक्षण- संत कसा ओळखावा याबद्दलही नामदेव महाराज सांगतात
संतांचें लक्षण ओळखावया खूण । दिसती उदासीन देहभावा
सतत अंतरीं प्रेमाचा जिह्याळा | वाचे वसे चाळा रामकृष्ण
तुझ्या ध्यानीं ज्यांचें सदा भरलें मन | विश्व तूं चि म्हणून भजती भावें
ऐसे नित्यानंदें बोधें जें निवाठे | ते जीवावेगळे न करीं नाम्या
आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या आवाजात अगदी समर्थपणे गायलेला आपण ऐकतो-
वैष्णवाघरीं सर्वकाळ | सदा झणझणती टाळ
कण्याभाकरीचें खाणें । गांठी रामनाम–नाणें
बैसावयासी कांबळा | द्वारीं तुळसी रंगमाळा
नामा म्हणे नेणती कांहीं । चित्त अखंड विठ्ठलपायीं
अजून संतांचे लक्षण सांगतांना नामदेव महाराज सांगतात- सगळ्या गोष्टीत सम राहतो- तो खरा संत –
जैसा वृक्ष नेणें मान–अपमान | तैसे ते सज्जन वर्तताती
येऊनियां पूजा प्राणी जे करिती | त्याचें सुख चित्तीं तया नाहीं
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती | तया न म्हणती छेदूं नका
निंदास्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी | जीवा शिवा गांठी पडुनी जाय
आणि मग भक्तांनी सुद्धा हेच गुण अंगी बाणवावेत- लोकांच्या निंदेने व्यथित होऊ नये-
निंदील हे जन सुखे निंदूं द्यावें । सज्जनीं स्वभावें क्षोभूं नये
निदास्तुति ज्यासी समान पैं झाली | त्याची स्थिति आली समाधीसी
शत्रु मित्र ज्यासी सम समानत्वें । तो चि पैं देवातें आवडला
माती आणि सोनें भासे ज्या समान | तो एक निधान योगिराज
नामा म्हणे ऐसे भक्त जे असती | तेणें पावन होती ठोक तिन्ही
संत नामदेवांचे अभंग खूप आहेत. त्यातील काही निवडक अभंग आपण पाहत आहोत. आचार्य विनोबा भावे यांनी हे निवडक अभंग अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले होते, त्या आधारावर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. यापुढील भागात अजून काही अभंग पाहणार आहोत.
माधव भोपे
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.