https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Sant Tukaram abhang-4 

संत तुकारामांचे अभंग-4 

महाराष्ट्रात 16 व्या आणि 17 व्या शतकात होऊन गेलेले थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत 3 भागांमध्ये आपण तुकाराम महाराजांचे कांही अभंग पाहिले. संत हे स्वभावतः क्षमाशील असतात. तुकाराम महाराजांची आणि मंबाजीची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण संतांचे भांडण देवाशी असते. तसे अभंग बुडविल्यानंतर त्यांनी देवाशी भांडण मांडले होते, आणि नंतर अभंग वर आल्यावर त्यांना, देवाला विनाकारण त्रास दिल्याबद्दल पश्चात्तापही झाला होता. अशाच एका अभंगात, तुकाराम महाराज विठ्ठलाचा मायाळूपणा वर्णन करतांना, आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागतात. या अभंगातील शब्दरचना ही किती गोड आहे-

 

तूं माउलीहून मायाळ । चंद्राहूनि शीतळ

पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।

देऊं कशाची उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा

ओंवाळूनि नामा । तुझ्यावरूनि टाकिलों ।

तुवां केलें रे अमृता । गोड त्याही तूं परता

पांचां तत्त्वांचा जनिता । सकळ सत्तानायक ।

कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणीं ठेवितों माथा

तुका म्हणे पंढरिनाथा । क्षमा करीं अपराध ।

 

__________________________________

 

अशाच दुसऱ्या एका अभंगात आपल्याला अवगुणी, अन्यायी असे संबोधून ते विठ्ठलाचा धावा करतात. विठ्ठलाला ‘विठ्ठले’ म्हणून माऊलीरूप समजून हाक मारण्याची पद्धतही किती गोड आहे!

 

मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई

आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठले ।

पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर

राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ।

अनेक बुद्धीचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग

धरू जातां संग । तंव तो होतो बाधक ।

तुका म्हणे आतां । अवघी तोडीं माझी चिंता

येऊनि पंढरिनाथा । वास करीं हृदयीं ।

 

_____________________

विठ्ठलाच्या भेटीसाठी काकुळतीला येऊन केलेले अनेक अभंग वाचतांना आणि म्हणतांना तर डोळ्यात पाणी येते.

 

कन्या सासुऱ्यासी  जाये । मागे परतोनि पाहे

तेसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा

चुकलिया माये । बाळ हुरूहुरू पाहे

जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी

 

 

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची

भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलोची

तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा

 

 

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळां

तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी

कां बा मोकलिलें कोणा निरविलें । कठिण कैसें झालें हृदय तुझें

तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा

 

__________________

 

ते विठ्ठलालाच, तुझे ध्यान कसे करू हे तूच सांग असे काकुळतीला येऊन विचारतात.

 

कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी

कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणू कैसा तुज

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चिती । कैसी स्थिती मती दावीं मज

तुका म्हणे जेसें दास केलें देवा । तेसें हें अनुभवा आणीं मज

 

_______________

 

आपल्यासारखी संसारी माणसें, देवाला, धन, धान्य, समृद्धि, कीर्ती, आणि काय काय मागतात. पण तुकाराम महाराजांचे मागणे अगदी माफक होते. माझा देह कुठेही असो, आणि कसल्याही अवस्थेत असो, पण चित्त मात्र तुझ्या पायी राहू दे, हेच त्यांचे मागणे होते. आणि देह अवसानी- म्हणजे देह सोडायची वेळ येईल तेंव्हा फक्त कफ-वात-पित्त हे दूर सारून ठेव, जेणे करून की मला तुझे नांव घेता येईल.  

 

आतां केशीराजा हेंचि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असां द्यावें

कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं

तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी

 

 

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहाचा विसर पाडी मज

तरीच हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें

ठाव देई चित्ता राखें पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित

आस भय चिंता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा

मागणें तें एक हेंचि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध

 

______________________

 

तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, लोक त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले, आणि तुकाराम महाराजांचे नांवही होऊ लागले. पण ते या कीर्तीने अस्वस्थ होत आणि पुन्हा विठ्ठलाची करुणा भाकून यापासून वाचव म्हणून साकडे घालत.

 

 

नव्हें दास खरा । परि हा झालासे डांगोरा

यासी काय करू आतां । तूं हें सकळ जाणता

नाहीं पुण्य गाठीं । जें हें वेचूं कोणासाठी

तुका म्हणे कां उपाधि । वाढविली कृपानिधि

 

दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यात  न पडे

आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया

मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा

तुका म्हणे देवा । माझे सोडवणें धांवा

 

नावडे जें चित्ता । तेंचि होसी पुरविता

कां रे पुरविलो पाठी । माझी केली जीवें साठीं

न करावा संग । वाटे दुरवावें जग

सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात

जन धन तन । वाटे लेखावें वमन

तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा

 

 

तुकाराम महाराजांचे खूप अभंग खूप प्रसिद्ध आहेत. आपण इथे त्यातील काही कमी प्रसिद्ध असे अभंग पाहत आहोत. या वाटचालीत पुढील भागात आपण अजून काही अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

माधव भोपे


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “संत तुकारामांचे अभंग-4 Sant Tukaram abhang-4”

Post your comments here