Sant Tukaram abhang-6
संत तुकारामांचे अभंग-6
थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत ५ लेखांमधून आपण ढोबळपणे विविध विषयांनुसार तुकाराम महाराजांचे अभंग पाहिले. तुकाराम महाराजांचे अभंग इतके आहेत, आणि इतके हृदयस्पर्शी आहेत की कोणता अभंग घ्यावा आणि कोणता सोडावा हे ठरवणे फार अवघड आहे.
आज त्यांचे अजून काही करुणापरक अभंग आपण पाहूत.
खालील अभंगांत तुकाराम महाराजांनी तुमची आमची स्थितीच अगदी यथार्थ वर्णन केली आहे असे वाटते. आपल्याला जप तप ही साधनें जमत नाहीत, ‘न सांडवे अन्न-‘ उपास तापास पण करवत नाहीत, वनात जाता येत नाही, काही पाठांतर करावे म्हटले तर तेही होत नाही. कसलीच योग्यता नाही- आणि आयुष्य तर थोडे आहे. काय करावे? हे आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे. पंढरी राया-तुझ्यावीण सगळा शीण वाटतो. मला फक्त एकच येते- सगळी लाज सोडून तुला शरण येणे आणि तुझी करुणा भाकणे- असे सगळे भाव खालील काही अभंगांत व्यक्त होतात-
जपतपादि साधनें । मज चितवेना मनें
करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें
तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं
न संडवे अन्न । मज न सेववे वन
म्हणऊनि नारायणा । कींव भाकितों करुणा
नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर
तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें
येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया
तुजविण शीण वाटे क्षीण झाली काया
यातिहीन मतिहीन कर्म हीन माझें
सर्व लज्जा सांडोनियां शरण आलों तुज
दीनानाथ दीनबंधु नाम तुज साजे
पतितपावन नाम ऐसी ब्रीदाबळी गाजे
विटेवरी उभा नीट कटावरी कर
तुका म्हणे हेंचि आम्हां ध्यान निरंतर
_______________________
आणि मागणे काय? तर एकच मागणे आहे- माझे प्रपंचातील चित्त ओसरावे आणि तुझ्या पायी लागावे –
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो
ऐसें करीं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा
पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता
लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा
पतित पतित । परि मी त्रिवाचा पतित
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि
अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों
______________________
माझ्या मनात दुर्बुद्धि कधीही न् येवो
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा
आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं
उपजला भावो । तुझे कृपें सिद्धी जावो
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं यापरता
____________________________
सुरुवातील हरिनाम घेतांना मन त्यामध्ये लागत नाही- पण हरकत नाही- मुखात नाम आले की ते नाम आपले काम बरोबर करेल आणि हळू हळू मनातही उतरेल.
नसे तरी मनीं नसो । परी वाचे तरी वसो
देह पडो या चिंतनीं । विठ्ठलनामसंकीर्तनीं
दंभस्फीति भलत्या भावें । मज हरिजन म्हणवावे
तुका म्हणे काळांतरीं । मज सांभाळील हरी
________________________
सुरुवातीला आपल्या इंद्रियांना बळजबरीने वळण लावावे लागते. पण आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, की एकदा इंद्रियांना वळण पडले- देवाच्या सुखाची गोडी लागली, की मग ती अशी लुब्धावतात की मग तिथून हलण्याचे नांव घेत नाहीत-
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासूनियां
पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जागृतीं स्वपनीं पांडुरंग
पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी
_______________________
आपल्यापैकी काही जण गुरू नाही म्हणून स्वस्थ बसतात. पण तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे माझ्यावर असे प्रेम आहे की देव स्वतःच गुरू होतो- माझ्या मागे पुढे उभा राहून सांभाळतो- आणि तुकाराम महाराज म्हणतात- विश्वास नसेल तर पुराणात पाहा- असे कितीतरी पुरावे सापडतील.
खालील अभंग मी खुलताबाद येथे असतांना माझ्या रूम वर (तेंव्हा बॅचलर होतो) रात्री पडल्या पडल्या, कुठल्या तरी देवळात, रात्री भजनी मंडळातील गायक तल्लीन होऊन गात असतांना कानावर आला आणि तो तसाच हृदयावर कोरला गेला. पूर्वी आपल्याकडे दर गुरुवारी, एकादशीला, किंवा पर्वाला कोणाच्या तरी घरी किंवा मंदिरात लोक एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भजने म्हणत, रामकृष्ण हरि कीर्तन करत. मला आठवते, मी मॅट्रिकला असतांना माझे वडीलही भजनी मंडळात जाऊन या भजनात सामील होत. मी कधी कधी त्यांच्या सोबत जात असे. आता अशी भजनें दुर्मिळ झाली आहेत.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु
पढियें देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी
आणि संसार करतांना देवाची आठवण कशी करावी, असा कोणाला प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर ही महाराजांनी देऊन ठेवले आहे-
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी
अशाच अर्थाचा एक अभंग आपण नामदेव महाराजांचाही पाहिला होता.
दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें
धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें
नामा म्हणे असावें भलतियां व्यापारी | लक्ष सर्वेश्वरीं ठेवूनियां
___________________________
खालील एक अभंगही मला खूप आवडतो. अगदी प्रॅक्टिकल आणि matter of fact असा हा अभंग आहे. शेवटी ‘औट’ म्हणजे साडेतीन हात तुझी जागा आहे. कशाला तृष्णा आणि हांव वाढवतोस- एक राम विसरला तर सगळे श्रमच आहेत.
एक शेर अन्ना चाड । येर वाउगी बडबड
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं
औट हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा
तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम
_________________
खालील एक अभंग फारच गमतीशीर आहे. जेंव्हा दोन स्वार्थी लोक एकमेकांना भेटतात, तेंव्हा ते स्वतःच्या स्वार्था साठी दुसऱ्याला कसे ठकवायचा प्रयत्न करतात याचे फारच विनोदी उदाहरण दिले आहे.
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला
अंतीं मरसी तें न चुके । मजही मारितोसी भुके
येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें झाला
देह तों जाणार । घडेल हा परउपकार
येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि
गांठी पडली ठका ठका । त्याचें वर्म जाणें तुका
एकदा एक वाघ कोल्ह्याला उपदेश करतो की तुझे शरीर तू मला सुखाने खाऊ दे कारण शेवटी हा देह पडणारच आहे, अंत हा कोणाला चुकणार नाही, त्यामुळे निदान माझा तरी भुकेने चाललेला जीव वाचव, त्याने तुझ्या पदरी पुण्यच पडेल.
हे ऐकून कोल्हा म्हणतो हे तू बरे केलेस, स्वतःच्या तोंडानेच काय बरोबर आणि काय चूक याचा निवाडा केला. देह सगळ्यांचाच पडतो त्यामुळे मला सोडून देऊन आणि भुकेने जात असेलेले स्वतःचे प्राण त्यागून तूच का हे पुण्य स्वतःच्या पदरी पडून घेत नाहीस? जेव्हा एका ठकाची दुसऱ्या ठकाशी गाठ पडते तेव्हा ते एकमेकांना असेच स्वार्थी सल्ले देतात, त्यामूळे अशा स्वार्थी लोकांच्या स्वार्थी उपदेशांचे वर्म मला आता कळून चुकले आहे.
यावरूनच ‘गाठ पडली ठका ठका’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
यापुढील लेखात आपण तुकाराम महाराजांचे आणखी काही प्रत्ययकारी अभंग पाहणार आहोत.
आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.
माधव भोपे