https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-7 Sant Tukaram abhang-7

या आधी आपण ७ जानेवारी पासून ते २१ जानेवारी पर्यंत संत नामदेवांच्या अभंगांची माहिती १० लेखांमधून घेतली,  त्यानंतर दि. २३ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत संत तुकारामांच्या अभंगां ची माहिती ६ लेखांमधून घेतली. 

मध्यंतरी काही दिवस या उपक्रमात खंड पडला. माझा दूसरा ब्लॉग goodworld.in यावरही या काळात A glimpse of Vedas या नांवाने काही माहिती लिहिली आहे. त्यातही या काळात खंड पडला. 

पण आता वरील विषयांवरचे लिखाण पुन्हा सुरू करीत आहे. संत तुकारामांच्या अभंगांबद्दल चर्चा करणाऱ्या लेखमालिकेतील हा ७ वा लेख असेल. यात अर्थात, संतांचे अभंग जशास तसे दिले आहेत, पण त्यांच्याविषयी आपल्याला वाटणाऱ्या भावना थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न अगदीच तोकडा आहे, पण कोणत्याही निमित्ताने का होईना, संतांची आणि ईश्वराची आठवण होणे हे महत्त्वाचे. या विषयात रस असणाऱ्या भाविकांना हा प्रयत्न आवडेल असे वाटते. 

Sant Tukaram abhang-7 

संत तुकारामांचे अभंग-7 

संत तुकारामांचे अभंग आपण गेल्या ६ लेखांमधून पाहत आहोत. मागील लेखात काही करुणापर अभंग आणि काही स्फुट अभंग आपण पाहिले. मी यू ट्यूब वर पू. डॉ. सुषमाताई वाटवे यांची प्रवचने ऐकत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. त्या म्हणतात की भक्तिला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, आनंदरूप आहे.. आणि आपणही ईश्वराचेच स्वरूप आहोत किंवा अंश आहोत. पण नुसते हे ज्ञान होऊन काय कामाचे? आपल्याला याची प्रचिती- प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, त्या ईश्वराकडेच करुणा भाकावी लागेल.

मनुष्य जसा जसा अध्यात्माकडे वळतो, तसे तसे त्याला आपल्यातले अवगुण प्रकर्षाने जाणवायला लागतात. तो पर्यंत कुठल्याही माणसाला आपल्यात काही अवगुण आहेत याची साधी शंका सुद्धा येत नाही. उलट आपल्यातल्या अवगुणांनाच आपले वैशिष्ट्य आणि आपले गुण समजून आपण तोऱ्यात असतो. पण जेंव्हा मनुष्य अध्यात्माकडे वळतो, तेंव्हा त्याची अवस्था कशी होते, ते खालील अभंगात तुकाराम महाराज वर्णन करतात-

माझे मज कळों येती अवगुण काय करूं मन अनावर

आतां आड उभा राहें नारायणा दयासिंधुपणा साच करीं

आणि जेंव्हा हे अवगुण लक्षात येतात- आणि आपल्याच्याने ते आटोक्यात येत नाहीत, त्यावेळी त्या दयासिंधू कडे करुणा भाकल्यावाचून पर्याय राहत नाही- “आता आड उभा राहे नारायणा.”

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मला खूप मदत केली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।।

अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचे बळ आपल्याकडे असतेच असे नाही. कित्येक वेळा काय बोलावे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलण्यात तितके हुशार किंवा हजरजबाबी नसतो. पण अशा वेळी, बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केली देवा ।। आपण जे काही बरळतो, त्याला तो नीट करून घेतो. आपल्या प्रत्येक हालचालीत, तो आपल्याला अगदी लहान मुलाला जशी त्याची माऊली हाताला धरून चालविते, तसे चालवितो. लहान मूल जसे जेंव्हा त्याला आईचा आधार असतो, तेंव्हा कशालाही घाबरत नाही, त्याप्रमाणे चालो वाटे आम्ही तुझाचि आधार चालीविसी भार सवे माझा ।।

आणि जेंव्हा असा आईचा आधार असतो, तेंव्हा कोणी आपले शत्रू वाटतच नाहीत- जसे लहान मुलाला शत्रू- मित्र अशी काही भावना नसते- त्याप्रमाणे देवाचा आधार घेतल्यानंतर- अवघे जन मज झाले लोकपाळ सोइरे सकळ प्राणसखे. अवघे जन हे सोयरे- सखे वाटू लागतात.

आणि मग संसारातील अडचणी या अडचणी वाटतच नाहीत- सगळा खेळ वाटू लागतो- तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

हा अभंग खरेच त्या पातळीवर जाऊन अनुभवायचाच विषय आहे- जेंव्हा तो अनुभव येतो- तेंव्हा अंगावर सर्रकन काटा येतो.

जोपर्यंत विठू माऊलीची भेट होत नाही, तोपर्यंत साधकाची अवस्था कशी होते हे खालील अभंगातून वर्णन केले आहे-

पडियेलों वनीं थोर चिंतवनीं । उशीर कां आझूनि लावियेला

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे

आपल्या स्वभावातील अवगुण जसे जसे दिसू लागतात तसे तसे संत म्हणतात- “भागलो मी आता माझिया स्वभावे”

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें कृपा करोनि देवें आश्‍वासीजे

देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें अंगें हीं दातारें निववावीं

अमृताची दृष्टी घाळूनियां वरी शीतळ हा करीं जीव माझा

घेई उचलूनि पुसें तहानभूक पुसीं माझें मुख पीतांबरें

बुझावोनि माझी धरीं हनुवटी ओवाळुनी दिठी करुनी सांडीं

तुका म्हणे बापा अहो विश्‍वंभरा आतां कृपा करा ऐसी कांहीं

 

खालील एक अभंगही माझ्या खूप आवडीचा आहे. जेंव्हा कोणी तत्त्वज्ञानाचा खूप कीस पाडू लागते, तेंव्हा म्हणावेसे वाटते-

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड घेतां वाटे गोड नाम तुझें

नेणतें लेकरू आवडीचे तान्हे बोलतों वचनें आवडीनें

भक्ति नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं घातला विठाई भार तुज

तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि नाहीं माझे मनीं दुजा भाव

 

खरंच देवावर सर्व भार घालून राहणे- ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्यात क्षणोक्षणी आणि घडी घडीला येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर याच्या सारखा दुसरा उपाय नाही. आजकालच्या मॉडर्न सायन्सप्रमाणे सुद्धा relaxed राहणे हा सर्व प्रकारच्या टेन्शन वर उत्तम उपाय आहे.

अशा प्रकारे अनेक करुणापर अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी, काही शल्यें असतात, तो मनात राहतात, आणि ती आपण कोणापाशीही शेअर करू शकत नाही. जसे लहान मूल आपल्या आई पाशी सगळ्या गोष्टी शेअर करते, तसे मोठेपणी-

जाऊं देवाचिया गांवां देव देईल विसांवा

देवा सांगों सुखदुःख देव निवारील भूक

घालूं देवासीच भार देव सुखाचा सागर

राहों जवळी देवापाशीं आतां जडोनि पायांसीं

तुका म्हणे आम्ही बाळें या देवाचीं लडिवाळें

वरील अभंग हा उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात अगदी आर्तपणे गायला आहे. तो अभंग आपण आठवणीतील गाणी या वेबसाइट वर  खालील लिंकवर ऐकू शकतो. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Jau_Devachiya_Gava

तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल लिहितांना कोणताही अभंग सोडावासा वाटत नाही, इतके सर्व अभंग छान आहेत. आपण येत्या काही लेखांमधून आणखी काही अभंगांचा आस्वाद घेणार आहोत.

 आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading