Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी हे मुख्य करून भगवान विष्णूचे व्रत आहे.
आज अनंत चतुर्दशी. सर्वसाधारणपणे आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस हेच जास्त माहिती आहे. पण सार्वजनिक रित्या गणपती बसवण्याची पद्धत ही लोकमान्य टिळक यांच्या काळात म्हणजे अलीकडेच सुरू झालेली. गणपती चतुर्थीला बसवतात, आणि १० दिवसांच्या वास्तव्यानंतर चतुर्दशीला विसर्जन करतात अशी प्रथा सुरू झाली. पण काही जणांचे गणपती दीड दिवसांचेही असतात, तर काहींचे ५ दिवसांचे, काहींचे ७ दिवसांचे इत्यादि. पण अनंत चतुर्दशी चे महत्त्व पुरातन काळापासून वेगळ्याच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे अनंताचे व्रत.
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात 14 गाठी मारल्या जातात. हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व
अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.
अनंत चतुर्दशीची कथा
प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंडिण्य ऋषीशीही झाला. सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंडिण्याला दिले. कौंडिण्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला. त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंडिण्याकडे आली. कौंडिण्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंडिण्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौंडिण्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिण्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंडिण्याला उद्देशून म्हणाले. हे कौंडिण्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंडिण्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.
या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच चौदा गाठींचा धागा बांधला जातो, जो भगवान विष्णूच्या १४ जगांचे प्रतीक मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनंतच्या १४ गाठी १४ जगांचे प्रतीक मानले जातात. चौदा भुवने – सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात.
सात स्वर्ग लोक
भूलोक, भुवर लोक, स्वर्लोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक
सात पाताळ लोक
अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पाताळ
आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे विष्णू चे नाव आहे. अनंत हे एका महानागाचेही नाव आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. दर्भपासून अनंतरूपी नाग बनवला जातो. आणि त्याची पूजा केली जाते.
१४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य
ह्या व्रतामध्ये पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करतात.
हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते नेहमीसाठी पाळतात.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही. असो. त्यानिमित्ताने या अनंताच्या व्रताची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा प्रपंच. गणेश विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा! (खरं तर गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा हा शब्दप्रयोग किंवा वाक्यप्रयोग कितपत योग्य आहे हे माहिती नाही.) गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!
संकलक- माधव भोपे