https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Devotee-2 Shri Mahadev-भक्तांच्या कथा-2 -भगवान शिव

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee-2 Shri Mahadev

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

भगवान शिव

 

Devotee-2 Shri Mahadev

याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली. भक्तांच्या मालिकेत आपण भगवान शिव यांची कथा जाणून घेऊयात. पुन्हा तोच प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो, की भगवान शिव हे तर साक्षात देवाधिदेव- महादेव आहेत. मग त्यांचे नांव भक्तांच्या यादीत कसे? जगद्गुरु आद्य श्रीशंकराचार्य यांनी देव पंचायतनची जी कल्पना रुजवली, त्यातील पाच देव म्हणजे- श्री विष्णू, भगवान शंकर, श्रीदेवी आदिशक्ति, श्री गणेश आणि सूर्य भगवान. मग या पंचयातनपैकी असलेले भगवान शंकर हे कोणाचे भक्त?

भगवान शंकर आणि भगवान नारायण हे सदा अभिन्न आहेत. परंतु भक्तांच्या आवडीप्रमाणे एकच सच्चिदानानंदघन परमात्मा दोन स्वरूपांमध्ये स्थित आहे. आणि दोघेही एकमेकांची भक्ति करतात, असे वर्णन ठिकठिकाणी आले आहे.

भगवान नारायण (विष्णू), आणि त्यांचे अवतार- श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे परम शैव आहेत.   भगवान विष्णूंनी श्री शंकराच्या पूजेमध्ये सहस्र कमलदल अर्पण करण्याचा संकल्प केला, आणि जेंव्हा त्यात एक कमल कमी पडू लागले, त्यावेळी आपले कमलरूप नेत्र काढून त्या ठिकाणी अर्पण केले. तोच श्री विष्णूंचा शिवाप्रति असलेला भक्तिभाव किंवा भक्तीचा उद्रेक हा सुदर्शन चक्र बनून श्री विष्णूंना  प्राप्त झाला जो की श्री विष्णू विश्वाच्या कल्याणार्थ आणि भक्तांच्या संरक्षणार्थ नेहमी वापरतात. याचे फार बहारदार वर्णन श्री पुष्पदंत गंधर्वाने रचलेल्या शिव महिम्न स्तोत्रात आलेले आहे.vishnu lotus to shiva

हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः।
यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः।
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्।।
शिव महिम्न स्तोत्र १९।।

तर श्रीरामाने, रावणाशी युद्ध करण्याच्या आधी, दक्षिणेमध्ये श्री    रामेश्वर लिंगाची स्थापना केली. श्री कृष्णाने शंकराची आराधना करून कार्तिक स्वामीला, महाराणी जंबूवती चा मुलगा सांबच्या रूपात प्राप्त केले.rameshwaram-1

त्याचप्रमाणे भगवान शिव हे परम वैष्णव आहेत. ते निरंतर राम नामाचा जप करतात. आणि त्यांच्या मुक्तिधाम काशीपुरी मध्ये देहत्याग करणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कानात ‘राम’ या तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मुक्ति प्रदान करतात.

पुराणात अशी एक कथा येते की श्री विष्णूंचे शत कोटी मंत्र आहेत, किंवा श्री राम चरित्र हे शत कोटी श्लोकांचे आहे- एकदा देव दानव आणि राक्षस यांच्यामध्ये हे वाटून घेण्याविषयी वाद झाला, आणि ते सगळे भगवान शिवांकडे गेले. तेंव्हा शिवाने, त्या शंभर कोटी श्लोकांचे सारखे वाटे करून तिघांना दिले.  प्रत्येकाच्या वाट्याला 33 कोटी, 33 लाख, 33 हजार, 333 श्लोक आले. एक श्लोक उरला. हा एक श्लोक अनुष्टुप छन्दात होता, ज्याच्यात 32 अक्षरें असतात. भगवान शिवाने तिघांना 10-10 अक्षरें वाटून दिली. उरली दोन अक्षरें- ती दोन अक्षरें होती- ‘रा’ आणि ‘म’. शिवांनी सांगितले- ही दोन अक्षरें मात्र मी कोणालाही देणार नाही- त्यांना मी माझ्या कंठात ठेवीन- कारण ते माझे आराध्य दैवत आहे.

एकदा देव आणि असुर मिळून समुद्र मंथन करीत होते. त्यावेळी सगळयात पहिल्यांदा समुद्रातून अतिशय जहाल असे हलाहल विष वर आले. ते विष सर्व लोकांमध्ये पसरू लागले. तेंव्हा देव आणि दानव भगवान शंकरांना शरण गेले आणि विश्वाचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी श्री रामाचे नांव घेऊन ते हलाहल विष हातावर घेऊन, प्राशन केले. परंतु ते तोंडात असतांना त्यांना लक्षात आले की हे विष जर पोटात गेले, तर आपल्या पोटात असणाऱ्या विश्वाला, सर्व सृष्टीला हे मारक ठरेल. तेंवह त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. तेंव्हापासून त्यांचे नीलकंठ हे नांव प्रसिद्ध झाले.halahal vish

श्री विष्णूसहस्र नामाच्या शेवटी जी फलश्रुति आहे, त्यात आले आहे की, पार्वतीने शंकरांना विचारले, की या सहस्र नामांना जर थोडक्यात घ्यायचे असेल तर काय करायला पाहिजे?

पार्वत्युवाच —
केनोपायेन लघुना विष्णोर्नामसहस्रकम् ।
पठ्यते पण्डितैर्नित्यं श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो ॥ २६॥

त्यावर शंकरांनी पार्वतीला सांगितले-

ईश्वरउवाच—
श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ २७॥
श्रीरामनाम वरानन ॐ नम इति ।

हे पार्वती, श्रीराम हे एक नाम हे सहस्र नामांच्या बरोबर आहे. त्यामुळे एक राम नाम घेतले तर ते विष्णूंच्या सहस्र नामांच्या बरोबर आहे.

भगवान श्रीकृष्ण जेंव्हा गोकुळात अवतार घेते झाले, त्यावेळी त्यांचे मोहक बालरूप पाहण्यासाठी सर्व देव लालायित झाले. भगवान शिव हे तर त्यांचे परम भक्त होते. श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्यासाठी ते जोग्याच्या वेशात गोकुळामध्ये दाखल झाले, आणि यशोदेच्या दारावर जाऊन भिक्षा मागू लागले. यशोदा जेंव्हा त्यांना भिक्षा द्यायला दारावर आली, तेंव्हा त्यांनी धन किंवा धान्यरूपी भिक्षा नको असून, तुझ्या पोटी आलेल्या दिव्य बालकाचे दर्शन हीच भिक्षा दे असे यशोदेला विनवून, त्यांनी श्रीकृष्णाच्या बालरुपाचे दर्शन घेतले होते अशी कथा आहे.bhagvan shiv visits gokul

अशा प्रकारे, भगवान शिव हे भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार- श्री राम आणि श्रीकृष्ण यांचे परम भक्त आहेत.

भक्तांच्या मालिकेत श्री गणेशापासून सुरुवात करून, आज आपण भगवान शंकरांची भक्ति पाहिली. यानंतर आपण ‘ब्रह्मदेव’ यांची कथा पाहणार आहोत.

त्यानंतरच्या लेखांत आपण अनुक्रमे खालील भक्तांची चरित्रे पाहणार आहोत.

  • देवर्षि नारद
  • महर्षि व्यासदेव
  • शुकदेव
  • भक्त ध्रुव
  • भीष्म
  • भक्त प्रल्हाद
  • हनुमान
  • शंकराचार्य
  • संत ज्ञानेश्वर
  • संत एकनाथ
  • संत सूरदास
  • गोस्वामी तुलसीदासजी
  • महान भक्त मीराबाई
  • संत नामदेव
  • संत तुकाराम
  • दक्षिणेतील अनेक संत

संतांची, भक्तांची ही यादी खूप मोठी आहे. संतांची आणि भक्तांची चरित्रें वाचून अनयासेच सत्संग होतो.

तेंव्हा, या मालिकेत यातील जास्तीत जास्त भक्तांची चरित्रे देण्याचा प्रयत्न राहील.

श्रीहरि!

संकलन-माधव भोपे 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading