How to celebrate Kojagari Pornima
Kojagari Poornima- कोजागरी पौर्णिमा
यावर्षी कोजागरी पोर्णिमा केंव्हा आहे- आणि ज्येष्ठ अपत्याला केंव्हा ओवाळायचे
कोजागरी पोर्णिमा
रास पोर्णिमा
कौमुदी महोत्सव
नवान्न पौर्णिमा
कोजागरी पोर्णिमेचे आयुर्वेदात महत्व
आयुर्वेदाप्रमाणे कोजागरी पोर्णिमा कशी साजरी करावी
नवरात्र आणि दसरा झाल्यानंतर आपल्या संस्कृतीत साजरा केला जाणारा एक अतिशय आनंदमय उत्सव म्हणजे कोजागरी पोर्णिमा. यावर्षी पंचांगात पोर्णिमा दोन दिवस दाखविली आहे, त्यामुळे काही लोकांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. पण याचे निराकरण दातेंच्या आणि अन्य पंचांगातच दिलेले आहे. यावर्षी पोर्णिमा तिथी दि. १६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी लागते आहे, आणि दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी संपते आहे. कोजागरीचा उत्सव हा रात्री साजरा करीत असल्यामुळे, आज म्हणजे दि. १६ ऑक्टोबर बुधवारीच रात्री हा उत्सव साजरा करण्याचा आहे. पण कोजागरी पोर्णिमेला ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याचा कार्यक्रम (ज्येष्ठापत्य निरंजन) मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजे दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी करायचा आहे.
आपण यापूर्वीच्या “नवदुर्गांची उपासना ” या लेखात बघितल्याप्रमाणे, हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. तसेच कोजागरी पोर्णिमेला धार्मिक आणि पौराणिक संदर्भही जोडले गेले आहेत. आज इथे आपण त्या सर्वांची माहिती करून घेणार आहोत.
पौराणिक संदर्भ
पुराणात असा उल्लेख आहे. की ह्या दिवशी आकाशात देवी लक्ष्मी, देवांचा खजिनदार कुबेर आणि देवराज इंद्र फेरफटका मारण्यास निघतात. आणि कोण जागा आहे हे पाहण्यासाठी “कोजागर्ति कोजागर्ति” असा आवाज देतात. जे जागे असतात त्यांच्यावर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा होते. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीची खाष्ट बहीण फेरा मारते. तिला आक्काबाई म्हणतात. जे जागे नसतात, निद्रिस्त असतात त्याना ती शाप देते. त्याना दारिद्र्य येते. म्हणुनच एखादा मनुष्य चोहोकडून संकटात आला की त्याच्यावर आकाबाईचा फेरा आला असे म्हटले जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी रात्री, साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागरी पोर्णिमा असे म्हणतात- कोजागिरी हा त्याचा अपभ्रंश आहे. ‘कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.
ऐतिहासिक संदर्भ-
शिवाजी महाराज
इतिहासकार सभासदांच्या बखरीत असा उल्लेख आढ़ळतो की अफजलखान वध करून जेव्हा शिवाजी महाराज परत आले त्यावेळी महाराणी सईबाईसाहेब निवऱ् तल्या होत्या. त्या आठवणीने राजे बेचैन होऊन रात्री आपल्या वाड्याच्या सौंधावर येरझाऱ्या घालित होते. इतक्यात त्याना “कोजागर्ति”असा आवाज ऐकू आला. त्याचक्षणी अष्टावधानी राजांनी उत्तर दिले “अहम जाग्रति “! असे म्हणतात की त्याचवेळी आई भवानीने राजाना दर्शन देवून आशिर्वाद दिला.
रास पोर्णिमा (Raas Poornima/ Ras Pornima)
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. त्यामुळे या पोर्णिमेला ‘रास पोर्णिमा’ असेही म्हणतात. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.
कौमुदी महोत्सव (Kaumudi Mahotsav)
कौमुदी महोत्सव हा प्राचीन भारतात साजरा केला जाणारा सण होता. कौमुदीच्या दिवशी (म्हणजे कार्तिक महिन्याची पौर्णिमा) हा सण साजरा केला जात असे.
विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम आणि आनंद वाढावा यासाठी कौमुदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असे. कौमुदी महोत्सव हा भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. या सणाच्या काळात झाडांमध्ये अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलेही बहरतात. शेतात पिकांचे वेगवेगळे रंग दिसतात. हळुवार पणे वाहणारा थंड गार वारा आणि बहरलेले चांदणे प्रत्येकाचे मन वेधून घेतात.
धार्मिक महत्त्व
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची, कुबेराची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राचीही पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांचे या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
नवान्न पौर्णिमा (Navanna Poornima)
कृषि संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा
(Ayurvedic importance of Kojagari Purnima)
आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा म्हणजे ऋतूचक्रातील बदलाचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी म्हणून केलेली उपाययोजना असे म्हणता येईल.
आश्विन महिना हा म्हणजे ऋतू चक्रानुसार शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यामधील संधिकाल! या महिन्यात पाऊस कमी होत होत थांबतो आणि मग दिवसा कडक ऊन पडायला सुरुवात होते.याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. पावसाळ्यातील कुंद, दमट हवामान, गारवा,नवीन पाणी आणि त्या काळात घेतला जाणारा आहार यामुळे शरीरात पित्त दोष वाढलेला आणि साठलेला असतो. हाच साठलेला पित्त दोष शरदात कडक ऊन पडू लागले की अजून वाढतो, आणि पित्ताचे विविध विकार निर्माण करतो. हा त्रास होऊ नये म्हणून पित्त शामक पदार्थ आहारात वाढवायला हवे. गोड, मधुर चवीचे व शीतल ,थंड पदार्थ पित्त कमी करतात व त्याला नियंत्रणात ठेवायला मदत करतात. फक्त थंड पदार्थ जे वापरायचे ते नैसर्गिकरित्या थंड हवेत,कृत्रिम पद्धतीने गार केलेली शीतपेये ,आईस्क्रीम वगैरे नकोत! आयुर्वेदानुसार दूध हे उत्तम पित्त शामक आहे. पित्ताच्या चिकित्से मध्ये विरेचन ही येते. आणि दूध हे विरेचनाचे सुद्धा काम करते.
आयुर्वेदानुसार, या दिवशी सकाळी दूध आटवून ठेवावं व संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर मोकळ्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीत दूध थंड व्हायला ठेवावं. दुधाच्या भांड्यावर पातळ कॉटन किंवा मलमलचं कापड झाकून ठेवावं म्हणजे धूळ वगैरे पडत नाही. हे दूध तयार करताना खरं म्हणजे नुसती खडीसाखर आणि वेलचीपूड घालणं अपेक्षित आहे- आणि फार झाले तर अजून त्यात थोडेसे जायफळ आणि केशर घातले तर अजून चांगली चव येऊ शकते. हल्ली मात्र दूध अगदी घट्ट रबडी प्रमाणे आटवून ,मलईदार बनवून शिवाय त्यात भरपूर सुका मेवा टाकला जातो. आटीव दूध आधीच पचायला जड होतं त्यात सुका मेवा घातल्याने ते अजूनच जड होतं. त्यात सोबत भेळ, चिवडा, समोसे, कचोरी, काय वाट्टेल ते- चवीच्या नावाखाली, खाल्ले जाते. अशावेळी या सर्व गोष्टींबरोबर दूध हे पचनावर फारच ताण देणारं ठरतं. त्यामुळे खालील काळजी घेतली, तर दुधाचा खरा फायदा होईल.
•दूध खूप घट्ट आटवू नये तसेच खूप बदाम काजू, चारोळी वगैरे खूप जास्त टाकू नये. अगदी चवीपुरते खूप थोड्या प्रमाणात घालायला हरकत नाही.
•ज्यांचा कोठा मुळातच हलका आहे अशा व्यक्तींनी दूध बेतानेच प्यावे.
अशा प्रकारे कोजागरी पोर्णिमा साजरी केली तर तिचा खरा आनंद घेता येईल.
आपणा सर्वांना कोजागरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
माधव भोपे