https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2

मागील लेखावरून पुढे चालू 

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते मध्येही ७०० श्लोक आहेत.) हे ७०० श्लोक म्हणजे मार्कंडेय पुराणामधील अध्याय ८१ ते ९३ आहेत. आपल्याकडे १८ पुराणे आहेत. भागवत पुराण, विष्णू पुराण, नारदीय पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, भविष्य पुराण, अग्नि पुराण, ब्रम्ह्वैवर्त पुराण, ब्रम्हानंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण आणि स्कंद पुराण या १८ पुराणांपैकी १६ वे हे  मार्कंडेय पुराण आहे.

देवी कवच ही मार्कंडेय पुराणाचाच भाग आहे. आणि ग्रंथ वाचकाच्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करण्याचे काम करते.

श्री दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमध्ये खालील प्रमाणे वर्णन आहे.

अध्याय

श्लोक

वर्णन

१०४

मधुकैटभ वध

६९

महिषासुर सेना वध

४४

महिषासुर वध

४२

देवतांकडून देवीची स्तुती

१२९

देवतांकडून देवीची स्तुती आणि चण्ड मुण्ड देवीला शुम्भ निशुम्भा चा निरोप

२४

धूम्रलोचन वध

२७

चण्ड मुण्ड वध

8

६३

रक्तबीज वध

४१

निशुम्भ वध

१०

३२

शुम्भ वध

११

५५

देवी स्तुति- वरदान

१२

४१

पाठ माहात्म्य

१३

२९

सुरथ आणि वैश्याला इच्छित वर प्राप्ति

एकूण

७००

 

आता आपण देवी कवचा च्या पुढील काही श्लोकांचा अर्थ पाहू.

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।

विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः॥6॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।

नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि॥7॥

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥8॥

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना॥9॥

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया॥10॥

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता॥11॥

श्लोक ६-७:  जो मनुष्य अग्नीत जळत असेल, रणभूमी मध्ये शत्रूंनी घेरला गेला असेल, विषम संकटामध्ये सापडला असेल, आणि अशा प्रकारे भयाने आतुर होऊन देवीला शरण आला असेल, त्याचे काहीही अशुभ (अमंगल) होत नाही; युद्धाच्या संकटामध्येही त्याच्यावर कोणतीही विपत्ति येत नाही, त्याला शोक, दुःख आणि भय प्राप्त होत नाही.

वरील विपत्तींना वाच्यार्थाने न घेता, लक्ष्यार्थाने घ्यावे. कारण वरील प्रकारच्या विपत्ति आजकालच्या कालात येणे दुर्मिळ असले, तरी, तत्सम प्रसंग मात्र मनुष्याच्या आयुष्यात नित्यच येत असतात.

श्लोक ८: ज्यांनी भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केले आहे, त्यांचा नक्कीच अभ्युदय (वृद्धिः) होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिन्तन करतात, त्यांचे तू निःसंदेह रक्षण करतेस.

 आता खालील ९ ते ११ या श्लोकांमध्ये योगशक्तीने संपन्न देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे.

प्रेतसंस्था तु चामुण्डा:  सप्तशतीच्या ७व्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे.

 सहाव्या अध्यायात शुम्भ निशुम्भाने पाठविलेल्या धूम्रलोचन राक्षसाचा देवीने वध केल्यानंतर, शुम्भ निशुम्भ यांनी, चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांना देवीचे केस धरून ओढत आणण्याची आज्ञा केली.

 सातव्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड देवीला ओढत न्यायला आले असतांना, क्रोधाने देवीचे तोंड काळे ठिक्कर पडले, आणि तिच्या शरीरातून विक्राळ असे कालीरूप प्रकट झाले. त्या कालीने इतर राक्षसांसोबत, चण्ड आणि मुण्ड यांचा वध केला.

 त्यावर कल्याणमयी देवीने, चण्ड आणि मुण्ड यांना मारणारी, म्हणून तिचे नांव चामुण्डा असे ठेवले. प्रेत हे तिचे आसन समजले जाते.

वाराही, ही सप्त मातृकांमधील असून, विष्णूच्या वराह अवताराची शक्ति समजली जाते. तिचे वाहन महिष आहे. सप्त मातृका म्हणजे; चामुण्डा, वाराही, इंद्राणी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ब्राम्ही.

सप्तशतीच्या ८ व्या अध्यायात, रक्तबीज वधाच्या समयी, निरनिराळ्या मातृकांनी, म्हणजेच देवांच्या शक्तिरुपांनी राक्षसांचा वध केला, त्यातही वाराहीचा उल्लेख आहे. वाराही ही देवता वाम मार्गाच्या (तंत्र मार्गाच्या) साधकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

 कार्तिकेयाची  (ज्यांचे दुसरे नांव ‘कुमार’ आहे) शक्ति कौमारी , जी की शिखिवाहना, म्हणजे मोरावर आरूढ आहे. कार्तिकेयाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. कार्तिकेय(शंकराचा पुत्र) हा दक्षिणेमध्ये मुरुगन, किंवा, सुब्रम्हण्यम या नावाने प्रसिध्द आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः॥12॥

अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न आहेत, आणि नाना प्रकारच्या आभूषणांनी युक्त आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित आहेत.

श्लोक १३ ते ४३:

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः।

शंख चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम्‌॥13॥

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च।

कुन्तायुधं त्रिशूलं च शांर्गमायुधमुत्तमम्‌॥14॥

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै॥15॥

या सर्व देवी क्रोधाने भरलेल्या आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी रथावर बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, शक्ति, हल, मुसळ, खेटक (म्हणजे ढाल), तोमर (म्हणजे सर्पाकृती मुख असलेला बाण), परशु, पाश, कुन्त या नावाचे आयुध (कुन्त म्हणजे English मध्ये ज्याला spear म्हणता येईल, म्हणजे भाला किंवा तत्सदृश शस्त्र), त्रिशूल, शारङ्ग नावाचे धनुष्य इत्यादि शस्त्रें धारण केली आहेत. ही शस्त्रें त्यांनी दैत्यांचे देह नाश करण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी धारण केली आहेत

आता कवचाचा प्रारंभ करण्याआधी प्रार्थना केली जाते:

नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे।

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि॥16॥

महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम आणि महान उत्साहाने भरलेल्या देवी, तू भयाचा नाश करणारी आहेस, तुला नमस्कार असो.

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

तुझ्याकडे बघणेही कठीण आहे.(दुष्प्रेक्ष्य). हे शत्रूंचे भय वाढविणाऱ्या देवी, तू माझे रक्षण कर.

क्रमशः

 

माधव भोपे 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading