Sant Namdev Abhang-7
संत नामदेवांचे अभंग-7
यापूर्वीच्या सहाव्या भागात संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांतून सांगितलेली संताची महति आपण पाहिली.
संत हे सर्वसामान्य जनांसाठी, अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगत असतात. जशी माऊली आपल्या लेकरांना जेवू घालतांना त्यांच्या तोंडात मावतील असेच छोटे छोटे, चिमणे घास करून भरवते, आणि जे काही दूध भाकरी किंवा भात वगैरे असेल, ते अगदी बारीक कुस्करून त्या मुलाला सुपाच्य करून देते, तद्वतच संत हे सर्वसामान्य जनांना वेदांतातील अवघड ज्ञान, सोपे करून सांगत असतात.
खालील अभंग हा ‘खेळिया’ म्हणून ओळखला जातो. त्याच्यात उपनिषदांतील ‘एकोहं बहुस्यामि’ असे परब्रह्माच्या ठिकाणी झालेले स्फुरण, आणि त्यासाठी ‘अरुप’ असलेले ते, नांव रूपाला आले, आणि कसा खेळ करू लागले, याचे मनोरंजक वर्णन आहे. ‘स्वतःच स्वतःला व्यायले’ ही कल्पना किती सार्थ आहे!
आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते बारा वर्ष लपाले रे.. यातून शुकदेवांची गोष्ट सांगितली आहे. शुकदेव हे पोपटाच्या स्वरूपात भगवान शिवांच्या कोपापासून वाचण्यासाठी त्रिभुवनात फिरत शेवटी महर्षि व्यासांच्या आश्रमात आले आणि त्यांच्या पत्नीच्या मुखात प्रवेश करून लपून बसले. महर्षि व्यासांनी त्यांना शिवाच्या कोपापासून वाचविले, आणि शुकदेव व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शिरले. बाहेरच्या जगात मायेचा संपर्क येईल म्हणून ते १२ वर्ष बाहेरच आले नाही. शेवटी महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून ते बारा वर्षांनी भीत भीत बाहेर आले, तेंव्हा त्यांची अवस्था बारा वर्षाची बालकाची होती. जन्मल्याबरोबर ते नग्न अवस्थेतच, जंगलाच्या दिशेने पळाले, अशी कथा आहे.
चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण- चार मुखें असलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांच्याबद्दलही विनोदाने ‘ कुचाळी करुनी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे’ असे वर्णन केले आहे! अशाच मिस्किल शैलीत हनुमानाचे आणि श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. आणि शेवटी हा सर्व एक खेळ आहे हे सत्य सांगितले आहे.
नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे
अरूप होतें तें रूपासी आलें । जीव–शिव नांव पावलें रे
आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे
ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें | जाणूनि खेळ खेळें रे
ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले | ते बारा वर्षे लपालें रे
कांपत कांपत बाहेरी आलें | तें नागवें चि पळुनी गेलें रे
चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण | तो खेळियांमाजीं आगळा रे
कुचाली करूने पोरें भांडवी | आपण राहे वेगळा रे
खेळ खेळे परी डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहणा रे
खेळियांमाजीं हनुम्या शाहणा | न पडे काम–व्यसनीं रे
काम चि नाहीं तेथें क्रोध चि कैंचा | तेथें कैचे भांडण रे
रामा गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणें रे
यादवांचा पोर एक गोप्या भला | तो बहुत चि खेळ खेळला रे
लहान थोर अवघीं मारिलीं | खेळ चि मोडूनि गेला रे
ऐसे खेळिये कोट्यानुकोटी | गणित नाहीं त्यासी रे
विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देहीं शोधूनि रे
खालील अभंगात, अद्वैत अनुभव आल्यानंतर सुख दुःखाची कोण पर्वा करते, सापाने त्वचा (कात) टाकली आणि बिळात गेला की मग बाहेर राहिलेल्या त्या निर्जीव त्वचेला कोण सांभाळते, अशी अनेक उदाहरणें देऊन, अद्वैत अनुभव सोपा करून सांगितला आहे.
सुखदुःखें दोन्ही आम्हांसी सारिखीं | प्रतीति पारखी मना आली
अंतर्बाह्य एक ब्रह्म चि कोंदलें | दुजेपण गेलें निपटूनि
त्वचा टाकूनियां सर्प गेला बिळीं | मग ते सांभाळी कोण सांगा
ओघ सांडूनिया गंगा सिंधू ठाये | विसरली धाये खळाळाची
नामा म्हणे रात्र जैसी कां पाहिठी | धारणा ते झाली तैसें आम्हां
ब्रम्हानंदाची प्राप्ती झाल्यानंतर इतर गोष्टींची कोण पर्वा करते- याची अजून काही उदाहरणे देतात
निद्रिस्ताचे सेजे साप कां उर्वशी । पाहों विषयासी तैसे आम्ही
ऐसी कृपा केली माझ्या केशिराजें । प्रतीतीचें भोजें एकसरा
शेण आणि सोनें भासतें समान | रत्न का पाषाण एकरूप
पाया लागो स्वर्ग वरी पडों वाघ | आत्मस्थिती–भंग कदा नोहे
नामा म्हणे कोणी निंदा अथवा वंदा । झालों ब्रह्मानंदाकार आम्ही
संत मंडळींचे उपकार मानतांना, आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा असे म्हणून पुढील अभंगात संतांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं | ही संतमंडळी सुखी असो
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकांसी
नामा म्हणे तयां असावें कल्याण | ज्यां मुखीं निधान पांडुरंग
नंतर महाभारतातील एक कथा सांगून, ब्रह्मनिष्ठ वैराग्यशील पुरुषाचे महत्त्व सांगतात.
पत्रावळी काढी वैकुंठनायक | धांवूनियां शुक आला तेथें
दाटी पाहुनी द्वारीं मानसीं विचारी | जावया भीतरी काय काज
वाहे हा प्रसाद स्वहस्तें अनंत | वेंचोनियां शीत घाली मुखीं
घंटानाद वाजे लक्ष–द्विज–पंकिति | अक्षयीं वाजती वेळोवेळां
ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव । पुसे धर्मराव देवाजीसी
सांगतसे खूण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला येथें
तेथूनि उठले धर्म नारायण | बाहेरी येऊन पाहताती
शुकाचिये मिषें व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश
धरूनियां करीं नेला तो भीतरीं | नामा म्हणे करी पूजा त्याची
खालील एका अभंगात ज्ञानेश्वरीबद्दल सुप्रसिद्ध ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हा चरण आला आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे समकालीन होते. पण त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच संजीवन समाधी घेतली. त्यांचे वर्णन करतांना ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली’ असे म्हणून, ज्ञानेश्वरीचे महत्त्व वर्णन करतांना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी असे सांगतात. आणि हे अगदी खरेच आहे. ज्ञानेश्वरी हा युगानुयुगांत एखादाच होणारा असा ग्रंथ आहे. आणि तो नुसताच ‘वाचण्याचा’ नाही, तर ‘अनुभवण्याचा’ आहे, हे ज्ञानेश्वरीचे जाणकार चांगलेच जाणतात.
त्यापुढे जाऊन, नामदेव महाराज आपल्या गुरूंचे-विसोबा खेचरांचे ऋण व्यक्त करतांना म्हणतात- डोळियाचा डोळा उघडला ज्याने- अशा सद्गुरूंचे पाय मी विसंबणार नाही.
ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्ली प्रगट केली
अध्यात्म–विद्येचें दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला
छप्पन्नभाषेचा केलासे गौरव | भवार्णवीं नाव उभारली
श्रवणाचे मिषें बैसावें येऊनि | साम्राज्य–भुवनीं सुखी नांदे
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी
सद्गुरूसारिखा सोइरा जिवलग | तोडिला उद्वेग संसारींचा
काय उतराई होऊं कवण्या गुणें । जन्मा नाहीं येणें ऐसें केलें
माझें सुख मज दाखविले डोळां | दिधली प्रेमकळा नाममुद्रा
डोळियाचा डोळा उघडिला जेणें । लेवविले लेणें आनंदाचे
नामा म्हणे निकी सांपडली सोय | न विसंबे पाय खेचराचे
पुढील भागात संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहूयात.
माधव भोपे