https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Sant Tukaram abhang-2

संत तुकारामांचे अभंग-2

संत तुकारामांचे अभंग आपण बघत आहोत. लौकिक अर्थाने संत तुकारामांचे जीवन हे कष्टाने भरलेले होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय जो सावकारीचा होता, तो त्यांनी आपली ऋणकोंची कर्जें माफ करून संपवून टाकला होता. संसारात त्यांचे चित्त लागत नव्हते. त्यात दुष्काळ पडला. बायको मुलांना खायला घालायची पण पंचाईत. संसारात मन लागत नव्हते आणि ईश्वरप्राप्ती अजून झाली नव्हती, अशा विमनस्क अवस्थेत, आपल्या आराध्य दैवताला- पंढरीच्या पांडुरंगाला आळवणे एवढेच त्यांना सुचत होते

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ

मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ

तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ

भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ।

आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा

शरण मी आलों तुज निवारूनियां पापा

अंजन लेववूनी करीं मारग सोपा

जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ।

होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार

जात होतों जनामागें तो हि सांडिला आधार

हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार

फिरली माझीं मज कोणी न देती आधार ।

जोंबरी चळण गा तोंवरी म्हणती माझा

मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा

इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा

कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ।

गुंतलो या संवसारें केसा झालोंसें अंध

मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध

स्वहित न दिसेचि केला आपुला वध

लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ।

लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेंसा

सांडिली वाट मग झालों निराळा कैसा

पाहातों वास तुझी थोर करूनी आशा

तुका म्हणे वैद्यरजा पंढरीच्या निवासा ।

यातील इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा या ओळी विशेषतः ज्यांचे वय झाले आहे, एक एक अवयव साथ सोडत आहेत, त्यांच्या मनाला भिडतील अशा आहेत- “इंद्रियें मावळली” ही शब्दरचना किती प्रभावी आहे! आणि “आला बागुल आजा”- लहानपणी आई ज्या बागुलबुवाची भीती दाखवायची तो आता वृद्धपणी दिसू लागला- आणि कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा तरुणपणी निरोगी आणि देखणा असणारा देह म्हातारपणी किती वेगळा आणि कुरूप दिसू लागला! तरुणपणी संसारात गुंतल्याने, मी आणि माझे या माया, तृष्णेच्या जाळ्यात गुंतल्याने देवाकडे चित्त लागले नाही- स्वहित साधण्याची आठवण राहिली नाही- म्हणून आता पंढरीच्या  वैद्याचा धावा करीत आहे.

वरील अभंगातील वर्णन हे आपल्यासारख्या संसारी माणसाचे वर्णन करण्यासाठी केले असावे. कारण तुकाराम महाराज तर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.


जेंव्हा पांडुरंगाची कृपा झाली, त्याने आपली भक्ति दिली, तेंव्हा भक्तिरसात न्हाऊन त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

विठोबाचीं वेडी आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवूं गोविंदा

सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचें कवतुक


आहा आहा रे भाई ।

खालील काही अभंग -आहा आहा रे भाई । असे म्हणून खूप मोलाचा उपदेश केला आहे-

आहा आहा रे भाई ।

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ।

पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ।

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ।

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर

पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ।

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ।

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी

पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी

केशवदास नटतसे ।

वरील अभंगात विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी पंथाची तत्वें सांगितली आहेत- अभिमान जिंका, देवाच्या भक्तिमध्ये लज्जा आणि मान ठेवू नका, पर नारीला माऊलीसमान माना, परधनाची आशा धरू नका ( ह्या दोन तत्वांची आज समाजाला किती आवश्यकता आहे!), सोमवार आणि एकादशी व्रत करा, (वारकऱ्यांची ही ओळख आहे).


यापुढील एक रचना अगदी रोखठोकपणे समजातील अप प्रवृत्तींवर प्रहार करणारी आहे-

आहा आहा रे भाई ।

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वायां बाहेरी

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा

विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां

गांवींचिया देवा नाही दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना

सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना

खाचेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं

तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावे

 बाईलेचा दास- पितरांस उदास- जन्मदात्या आई वडिलांच्या उपकारांची जाणीव न ठेवणे- हे प्रत्येक पिढीत वाढत चालले आहे. ‘दान’ देण्याची दानत कोणामध्ये राहिली नाही- प्रत्येकजण फक्त घेण्याचेच बघतो..

 ________________

या उलट यापुढील रचनेत, जे लोक देवाला आळवतात, माता पित्यांची सेवा करतात, इतरांचे सुख दुःख जाणतात अशा परोपकारी जनांना मनापासून नमन करतात-

आहा आहा रे भाई ।

नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे

नमो तयां जाणे आणिकांचें सुखदु:ख । राखे तहान भूक तया नमो

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी

तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे


यापुढील रचनेत गंगा, पिंपळ, तुळशी, रुद्राक्ष इत्यादि पवित्र वस्तूंचे महत्व सांगतात.

आहा आहा रे भाई ।

 गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ

तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ।

गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्‍वरू

झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न म्हणावी ।

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी

तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ।

तुकाराम महाराज, आपले चरित्र काही अभंगांमधून अगदी वास्तव रीतीने वर्णन करतात, असे काही अभंग आपण पुढील भागात पाहणार आहोत.

 

माधव भोपे

 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading