Sant Namdev Abhang-10
संत नामदेवांचे अभंग-10
रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला आणि खूप दिवस झाले, मी साधना करीत आहे पण अजून मला ईश्वर प्राप्ती होत नाही असे सांगू लागला. रामकृष्ण त्याला जवळच्या नदीत घेऊन गेले. त्यांनी त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. तो साधक श्वास घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रामकृष्णांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि बाहेर येऊन म्हणू लागला, “हे काय? माझा जीव घेणार होतात की काय आज? मी तुमच्याकडे ईश्वर प्राप्ती करून घ्यायसाठी आलो आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघलात! रामकृष्ण म्हणाले, “मी जेंव्हा तुला पाण्याखाली दाबून धरले होते, तेंव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची वाटली?”
“कशाची म्हणून काय विचारता? श्वास घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता! मला सगळ्यात जास्त आवश्यकता तेंव्हा श्वास घेण्याची वाटत होती!”
तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “इतकी तीव्रतेने जेंव्हा तुला ईश्वरप्राप्तीची आवश्यकता वाटेल, ईश्वरा शिवाय एक क्षण ही राहणे जेंव्हा तुला अशक्य होईल, तेंव्हा, तत्क्षणीच तुला ईश्वर प्राप्ती होईल!”
सर्व संतांची आपल्याला हीच अवस्था दिसते. म्हणूनच त्यांना ईश्वरप्राप्ती झालेली असते. “चुकलिया माये, बाळ हुरूहुरू पाहे”.. “जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी” अशा अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपली तळमळ व्यक्त करतात.
संत नामदेवही आपली साधक अवस्थेतील तळमळ खालील अभंगांतून व्यक्त करतात-
जननिये जिवलगे ये वो पांडुरंगे । शिणलों भेटी दे गे एक वेळां
त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे | येऊनियां राहें हृदयामाजीं
वासनेच्या संगें शिणले माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी
नाहीं तुझी सेवा केली मनोधर्मे । संसार–संभ्रमें भ्रांत सदा
नाहीं तुझें नाम गाइले आवडी | वाळली कुर्वंडी त्रिविध तापें
नामा म्हणे आई धांवें लवलाहीं । बुडतों चिंताडोहीं काढीं मज
साधकाला जेंव्हा आपले अपराध कळून येतात, अनेक प्रयत्नांनीही विषय, वासना आटोक्यात येत नाही हे जेंव्हा कळते, तेंव्हा अनन्य भावाने आपल्या जननीचा धावा करणे हेच त्याला सुचते.
तुमची आमची अशी अवस्था असते की आपल्यासारखे चांगले आपणच अशी आपली पक्की धारणा असते. आपले दोष आपल्याला कधीच दिसून येत नाहीत. मग त्यांच्याबद्दल वाईट वाटणे तर दूरच. पण संतांची अवस्था अशी नसते. त्यांना आपण म्हणजे अपराधांची राशी आहो असे वाटत असते-
काय गुणदोष माझे विचारिसी | आहें मी तों राशी अपराधांची
अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत | अखंड दुश्चित आचरलों
स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति| पुससी विरक्ति कोठोनियां
तूं चि माझा गुरु तूं चि तारी स्वामी | सकळ–अंतर्यामी गाऊं तुज
नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण | नको करूं शीण पांडुरंगा
देवाच्या नांवाचा महिमा तर कळला आहे, पण मुखी नांव मात्र येत नाही. अमृत साक्षात समोर दिसत असूनही ते घेण्याची इच्छा होत नाही.
पण संतांनी या अभंगांतून, स्वतःच्या मिषाने खरे तर तुमच्या आमच्यासारख्या संसारी जीवांची अवस्था वर्णन केली आहे, असे जाणवते.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam
अमृताहुनी गोड नाम तुझें देवा | मन माझें केशवा कां बा नेघे
सांग पंढरीराया काय करूं यासी | कां रूप ध्यानासी न ये तुझें
कीर्तनीं बैसतां निद्रें नागविले | मन माझें गुंतले विषयसुखा
हरिदास गर्जती हरिनाम–कीर्ति | न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे
___________________________________
बालकामध्ये कोणती विशेषता असते? कोणतेही संकट आले, की त्याला फक्त आईचा धावा करणे, आईच्या कुशीत लपणे, हेच माहिती असते.
अग्नीमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु
तैसा धांवें माझिया काजा | अंकिला मी दास तुझा
वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरिणी
नामा म्हणे मेघा जैसा | विनवितो चातक तैसा
तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजीं प्रेम पान्हा पांडुरंगे
तूं माझी गाउली मी तुझें वासरूं | नको पान्हा चोरूं पांडुरंगे
तूं माझी हरिणी मी तुझें पाडस | तोडी भव–पाश पांडुरंगे
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज | चारा घालीं मज पांडुरंगे
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ | मागें पुढें उभा सांभाळिसी
वरील अभंगात ‘माऊली-तान्हा’, ‘गाऊली-वासरू’, ‘हरिणी-पाडस’, ‘पक्षिणी-अंडज’ अशा कितीतरी उपमा देऊन नामदेव महाराज आपले आणि पांडुरंगाचे बालक आणि मातेचे नाते वर्णन करतात.
___________________________________
तसेच खालील अभंगातील शब्दरचना किती गोड आहे- ‘भुकाळु, कृपाळु, सांभाळु’ अशा शब्दांनी त्यातील कोमल भाव नेमका व्यक्त होतो.
येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारीं भवव्यथे पांडुरंगे
मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु । करी माझा सांभाळु पांडुरंगे
मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्त तूं अन्न | मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगे
मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगे
मी धन–लोभी शुद्ध तूं पूर्ण कनक–कुंभ | मी मगर तूं अंभ पांडुरंगे
मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तू बोध । मी शुष्क नदी तूं ओघ पांडुरंगे
मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक | मी प्रजा तूं पाळक पांडुरंगे
मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी । मी अपत्य तूं जननी पांडुरंगे
मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय | मी आडळ तूं साह्य पांडुरंगे
शीघ्र येई वो श्रीरंगे भक्तमानस–रंगे | प्रेम–पान्हा दे गे नामदेवा
_____________________________________
खालील गीत तर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण बऱ्याचदा ऐकतो.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Pakshini_Prabhati_Chariyasi
पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये | पिलू वाट पाहे उपवासी
तैसें माझें मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चिंतीतसे
तान्हें वत्स घरीं बांधलेसें देवा । तया हृदयीं धांवा माउलीचा
नामा म्हणे केशवा तूं माझा सोइरा | झणीं मज अव्हेरा अनाथनाथा
_____________________________________
जे काही मागायचे ते केशवा जवळच मागायचे- आणि मागायचे ते काय- विषय भोग नाही, तर त्याचीच अनन्य भक्ति- खालील अभंगसुद्धा ‘मंगला नाथ’ यांच्या आवाजात आपण भक्ति गीतांच्या कार्यक्रमात बऱ्याचदा ऐकतो.
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | न करीं अव्हेरा पांडुरंगा
अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां
नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | न करीं अव्हेरा पांडुरंगा
अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां
नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी
साधनेच्या उत्तरावस्थे मध्ये साधकाची देवाशी एवढी जवळीक होते, की मग तो म्हणतो, “आम्ही भक्तांनीच तुझा महिमा वाढविला आहे- नाही तर तुला कोण विचारतो!”
देवा आम्हीं तुज दिलें थोरपण | मानीं हें वचन सत्य माझें
पतित अमंगळ तुज झालों साह्य | विचारून पाहें खरेंखोटें
रोग व्याधि पीडा जनांसी नसतां | कोण पाचारितां वैद्यालागीं
कल्पनेचें भूत झडपी या संसारीं | माने पंचाक्षरी पाचारितां
_____________________________
आम्हीं शरणागतीं केलासी सरता | येऱ्हवीं अनंता कोण जाणे
वेदशास्त्रपुराणीं उबगोनि सांडिलासी | तो आम्हीं धरिलासी हृदयकमळीं
चतुरां शिरोमणि अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्हीं
सहस्र नामीं झालासी संपन्न । तरी हें हि भूषण आमुचें चि
येऱ्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि
होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी । लक्ष्मी तेथें करी चरणसेवा
ते हि तंव जाण आमुची जननी । तूं तियेवांचोनि शोभसी कैसा
तुज नाहीं नाम रूप जाति कुळ | अनादिचें मूळ म्हणती तूज
आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल | ऐसा प्रगट बोठ जगामाजीं
ऐसे आमुचेनि भोगिसी थोरीव | आमुचा जीवभाव तुझे ठायीं
नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता | तरी या बोला उचिता प्रेम देई
मी तुझा दास म्हणवतो आणि तरी जर माझ्यात प्रेमभाव नसेल तर त्यात तुलाच कमीपणा आहे असे देवाला बजावायला संत कमी करीत नाहीत!
तुझा विष्णुदास म्हणताती जगीं | नाहीं माझे अंगीं प्रेमभावो
तेणें थोर लाज वाटे पंढरीराया | ये माझ्या हृदया एक वेळां
द्वैताद्वैतभाव आहे माझे ठायीं | अनुभव नाहीं स्वरूपाचा
नामा म्हणे माझा उजळ करीं माथा | भेटी देउनी संतां निरवीं मज
आणि मग नामदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात-
घे रे घे रे नाम्या दिलें माझें प्रेम | घोकी माझें नाम सर्वकाळ
शिरावरी हात ठेवीतसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनी
भक्तिसुख देवें दिले नामयातें | नामा परमामृतें तृप्त झाला
नामा म्हणे देवा झालों मी पावन | माझें तुजविण कोण आहे
आणि मग समर्थाच्या दासाला साक्षात काळाचीही भीती नाही-
आम्ही विठोबाचे दूत | यमा आणूं शरणागत
मुखीं नाम हातीं टाळी । महापाप करूं होळी
एवढा प्रताप नामाचा | रीघ नव्हे कळिकाळाचा
ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत
आणि मग देहाची आठवण सुद्धा राहत नाही- फक्त मुखात केशवाचे मंगल नाम राहावे हीच इच्छा राहते.
देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो
चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा
वदनीं तुझें मंगळ नाम | हृदयीं अखंडित प्रेम
नामा म्हणे केशिराजा | केला नेम चालवी माझा
_____________________________________
साधनेच्या उच्च अवस्थेत, उन्मनी अवस्थेत आपल्या आराध्य दैवताचे चिंतन करता करता द्वैत मावळते- योग्यांना ध्यानाच्या अवस्थेत येणारा अनुभव- तो अनाहत ध्वनि- भक्तांना भक्तीच्या उच्च अवस्थेत अनायासेच अनुभवायला येतो. हे केवळ कवित्व नाही- हा साक्षात अनुभव शब्दरूपांनी प्रकटला आहे.
देहमंदिराभीतरीं । शेजे सूतले श्रीहरि
निद्रा–उन्मनीचे भरीं । तें म्यां स्वप्न देखिले
ध्यानीं पहुडला सांवळा | जवळीं नारी बारा सोळा
विंजणें वारिती सकळा | सोहं–शब्द जागरणीं
धिं धिं तुरे वाजती | अनुहात–ध्वनि गर्जती
तेथें निद्रा ना सुषुप्ति | चंद्र सूर्य मावळले
मना पवना नाहीं भेद । तया ठायीं हा गोविंद
तेथें खुंटला अनुवाद | वेद–श्रुति आटल्या
म्हणे विष्णुदास नामा | जन्ममरण नाहीं आम्हां
कृपा केली मेघश्यामा | संतसंगें तारिलों
खालील अभंगही अद्वैताच्या उच्च अनुभवाचे वर्णन करणारा आहे- “आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे”, “पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे| प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |”
चेईला म्हणजे ‘जागा झाला, भानावर आला’
चेइला तो जाण रे सद्गुरुवचनीं निर्धारे
विपरीत मानवा विसर पडला कंठीं जया परिहार रे |
आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे
चंद्रसूर्य जेणें प्रकाशे तो मी कैसा पाहूं रे |
अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे
चेइला तेणें ओळखिला येरांसी अगम्य भाई रे |
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे
प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |
काष्ठी पावक उपजला तो हि तया सम रे
नामा म्हणे केशिराजा चेइल्या आम्हां तुम्ही रे |
संत नामदेव यांच्या विपुल अभंग भांडारातील काही मोजके अभंग आपण या १० भागांत पाहिले. संत मंडळी ही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रभूमी मध्ये जन्म मिळाला हे खरोखर आपले भाग्य आहे.
यापुढे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांच्या अभंगांबद्दल लिहिण्याचा विचार आहे.
माधव भोपे