https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-2 Sant Tukaram abhang-2

vithal rukmini

Sant Tukaram abhang-2

संत तुकारामांचे अभंग-2

संत तुकारामांचे अभंग आपण बघत आहोत. लौकिक अर्थाने संत तुकारामांचे जीवन हे कष्टाने भरलेले होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय जो सावकारीचा होता, तो त्यांनी आपली ऋणकोंची कर्जें माफ करून संपवून टाकला होता. संसारात त्यांचे चित्त लागत नव्हते. त्यात दुष्काळ पडला. बायको मुलांना खायला घालायची पण पंचाईत. संसारात मन लागत नव्हते आणि ईश्वरप्राप्ती अजून झाली नव्हती, अशा विमनस्क अवस्थेत, आपल्या आराध्य दैवताला- पंढरीच्या पांडुरंगाला आळवणे एवढेच त्यांना सुचत होते

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ

मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ

तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ

भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ।

आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा

शरण मी आलों तुज निवारूनियां पापा

अंजन लेववूनी करीं मारग सोपा

जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ।

होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार

जात होतों जनामागें तो हि सांडिला आधार

हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार

फिरली माझीं मज कोणी न देती आधार ।

जोंबरी चळण गा तोंवरी म्हणती माझा

मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा

इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा

कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ।

गुंतलो या संवसारें केसा झालोंसें अंध

मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध

स्वहित न दिसेचि केला आपुला वध

लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ।

लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेंसा

सांडिली वाट मग झालों निराळा कैसा

पाहातों वास तुझी थोर करूनी आशा

तुका म्हणे वैद्यरजा पंढरीच्या निवासा ।

यातील इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा या ओळी विशेषतः ज्यांचे वय झाले आहे, एक एक अवयव साथ सोडत आहेत, त्यांच्या मनाला भिडतील अशा आहेत- “इंद्रियें मावळली” ही शब्दरचना किती प्रभावी आहे! आणि “आला बागुल आजा”- लहानपणी आई ज्या बागुलबुवाची भीती दाखवायची तो आता वृद्धपणी दिसू लागला- आणि कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा तरुणपणी निरोगी आणि देखणा असणारा देह म्हातारपणी किती वेगळा आणि कुरूप दिसू लागला! तरुणपणी संसारात गुंतल्याने, मी आणि माझे या माया, तृष्णेच्या जाळ्यात गुंतल्याने देवाकडे चित्त लागले नाही- स्वहित साधण्याची आठवण राहिली नाही- म्हणून आता पंढरीच्या  वैद्याचा धावा करीत आहे.

वरील अभंगातील वर्णन हे आपल्यासारख्या संसारी माणसाचे वर्णन करण्यासाठी केले असावे. कारण तुकाराम महाराज तर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.


जेंव्हा पांडुरंगाची कृपा झाली, त्याने आपली भक्ति दिली, तेंव्हा भक्तिरसात न्हाऊन त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

विठोबाचीं वेडी आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवूं गोविंदा

सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचें कवतुक


आहा आहा रे भाई ।

खालील काही अभंग -आहा आहा रे भाई । असे म्हणून खूप मोलाचा उपदेश केला आहे-

आहा आहा रे भाई ।

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ।

पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ।

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ।

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर

पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ।

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ।

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी

पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी

केशवदास नटतसे ।

वरील अभंगात विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी पंथाची तत्वें सांगितली आहेत- अभिमान जिंका, देवाच्या भक्तिमध्ये लज्जा आणि मान ठेवू नका, पर नारीला माऊलीसमान माना, परधनाची आशा धरू नका ( ह्या दोन तत्वांची आज समाजाला किती आवश्यकता आहे!), सोमवार आणि एकादशी व्रत करा, (वारकऱ्यांची ही ओळख आहे).


यापुढील एक रचना अगदी रोखठोकपणे समजातील अप प्रवृत्तींवर प्रहार करणारी आहे-

आहा आहा रे भाई ।

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वायां बाहेरी

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा

विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां

गांवींचिया देवा नाही दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना

सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना

खाचेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं

तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावे

 बाईलेचा दास- पितरांस उदास- जन्मदात्या आई वडिलांच्या उपकारांची जाणीव न ठेवणे- हे प्रत्येक पिढीत वाढत चालले आहे. ‘दान’ देण्याची दानत कोणामध्ये राहिली नाही- प्रत्येकजण फक्त घेण्याचेच बघतो..

 ________________

या उलट यापुढील रचनेत, जे लोक देवाला आळवतात, माता पित्यांची सेवा करतात, इतरांचे सुख दुःख जाणतात अशा परोपकारी जनांना मनापासून नमन करतात-

आहा आहा रे भाई ।

नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे

नमो तयां जाणे आणिकांचें सुखदु:ख । राखे तहान भूक तया नमो

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी

तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे


यापुढील रचनेत गंगा, पिंपळ, तुळशी, रुद्राक्ष इत्यादि पवित्र वस्तूंचे महत्व सांगतात.

आहा आहा रे भाई ।

 गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ

तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ।

गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्‍वरू

झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न म्हणावी ।

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी

तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ।

तुकाराम महाराज, आपले चरित्र काही अभंगांमधून अगदी वास्तव रीतीने वर्णन करतात, असे काही अभंग आपण पुढील भागात पाहणार आहोत.

 

माधव भोपे

 

संत तुकारामांचे अभंग-1 Sant Tukaram abhang-1

tukaram-3

Sant Tukaram abhang-1

संत तुकारामांचे अभंग-1

महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांबद्दल माहिती करून घेतांना, सुरुवातीच्या १० भागांमध्ये आपण १३ व्या शतकातील संत नामदेव यांच्या अभंग संपदेतील काही अभंगांची माहिती घेतली.

येत्या काही भागांमध्ये आपण १६ व्या आणि १७ व्या शतकातील, थोर संत कवि तुकाराम महाराज यांच्या रसाळ अभंगांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि रचना इथल्या प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर यांच्या रक्तातच भिनले आहेत असे म्हटले तरी चालेल, इतके ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहेत. वारकऱ्यांच्या तोंडात तर संत तुकारामांचे अभंग सतत असतात, कीर्तनकारांच्या कीर्तनातही संत तुकारामांच्या अभंगांशिवाय पान हलत नाही. आणि घरोघरी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकाराम यांचे हरिपाठाचे अभंग हे नित्य म्हटल्या जाणाऱ्यापैकी आहेत.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची

संत तुकारामांच्या अभंगांची शब्दरचना अत्यंत प्रभावकारी आणि प्रत्ययकारी आहे. त्यांचे अभंग हे त्यांच्या अनुभवातून आपोआप उमटलेले शब्द आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक रचना ही सरळ मनाला भिडते.

संत नामदेवांचे राहिलेले कार्य त्यांनी आपल्याकडून करून घेतले आहे, अशी तुकाराम महाराजांची धारणा होती.

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन करणारे  कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले,  व तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”

भागवत धर्माचा, वारकरी पंथाच्या इमारतीचा पाया ज्ञानदेवांनी रचला, आणि संत तुकाराम हे त्या इमारतीचे कळस झाले, असे संत बहिणाबाई म्हणून गेली आहे.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

 

संत तुकारामांच्या काळी, महाराष्ट्रात मोगल आणि इतर आक्रमकांचा धुमाकूळ सुरू होता. प्रजेला कोणी वाली उरले नव्हते. लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. अशा वेळी, जनजागृती करण्याचे आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे कामही संत तुकारामांनी केले. त्याच वेळी छत्रपति शिवाजी महाराजांचा उदय झाला. संत तुकारामांची आणि शिवाजी महाराजांची भेट प्रसिद्ध आहे.

 

संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहतांना आपण सुरूवातीला त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले काही अत्यंत प्रसिद्ध अभंग पाहणार आहोत.

 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

 

 

अत्यंत कमी शब्दात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणणारा हा अभंग हा वारकऱ्यांच्या, कीर्तनकारांच्या अत्यंत आवडीचा आहे.


 

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळही

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं

आपल्या विठ्ठलाचे सौंदर्य वर्णन करतांना तुकाराम महाराज त्याला ‘राजस सुकुमार- मदनाचा पुतळा-‘ अशी उपमा देतात. त्याच्यासमोर चंद्र आणि सूर्य यांचे तेज लोप पावते. ‘कासे सोनसळा- कंबरेला सोनेरी पितांबर आणि- पांघरे पाटोळा (पाटोळा म्हणजे पांघरायचे वस्त्र) असा हा घननीळ- मेघासारखा निळा रंग असलेला माझा विठ्ठल पाहण्यासाठी मला धीर निघत नाही.- याठिकाणी तुकाराम महाराज स्वतःला गोपीच्या स्वरूपात पाहतात- आणि म्हणतात- सकळही तुम्ही व्हा गे एकसवा- तुम्ही सगळ्या एका बाजूला व्हा- आणि मला माझ्या घन नीळाला पाहू द्या.

 

खेळिया

 

मागे संत नामदेवांचे अभंग पाहतांना आपण नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव-शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

या अभंगात संत नामदेवांनी संसार हा खेळ समजून कसा खेळायचा ते सांगितले आहे ते पाहिले होते आणि त्यात त्यांनी सहजरित्या अद्वैत सिद्धांत सांगितला होता.

संत तुकाराम सुद्धा त्यांच्या पर्यन्त होऊन गेलेल्या संतांची महति सांगतांना, हा खेळ त्याच्या नियमानुसार जो खेळेल तोच ‘उतरेल’ असे सांगतात. सगळीकडे एकत्व पाहिल्यास तुझ्यावर ‘डाव’ येणार नाही. द्वैतबुद्धि ठेवली, तर फसगत होईल. त्रिगुणांच्या फेऱ्यात सापडला तर दुःखी होशील, पण ‘या चौघांची’ म्हणजे चार वेदांची आज्ञा पाळशील तर दुःखी होणार नाहीस असे सांगतात.

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोघांची तरी धरीं सोई रे

 

खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयांची घाई रे ।

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे

 

या खेळात गुंतायचे नाही- निराळेच राहायचे- खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा- नामदेव या शिंप्याच्या पोराने विठ्ठल ‘बसवंत’ केला- तो खेळात नाही अडकला.

 

आपुल्या संवगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे

एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ।

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे

कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे

सकळिकां मिळोनी एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे ।

रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे

पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे

ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी । तो ही खेळिया निवडिला रे ।

ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे

जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे

एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ।

 

ब्राह्मणाचा पोर- म्हणजे एकनाथ- याने आपले गुरू -जनार्दन यांना ‘बसवंत’ केले- आदर्श मानले आणि गुरूंच्या उपदेशामुळे, ते स्वतःच ‘बसवंत’ झाले.

आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे

तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे

एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ।

 


 

आणि खालील अभंगात- भीमातीरि विठ्ठलाच्या आनंदात नाचणाऱ्या वैष्णवांच्या आनंद सोहळ्याचे अप्रतिम वर्णन केले आहे. हा अभंग स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतानी अजूनच विलोभनीय केला आहे-

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे

क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे

कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।

लुब्धली नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां रे

पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।

वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती रे

निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

वरील ओळी ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो- मातले हे वैष्णव वीर रे! काय शब्दरचना आहे!

संत तुकारामांचे ‘तुकाराम गाथा’ या स्वरूपात जवळ जवळ ४५८३ अभंग आहेत. सगळ्या अभंगांचा अभ्यास करायचा म्हटले तर अक्खा जन्म सुद्धा कमी पडेल. आपण येत्या काही लेखांत, आचार्य विनोबा भावे यांनी निवडलेले काही अभंग आणि इतर काही अभंग पाहणार आहोत.

 

 

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-10 Sant Namdev Abhang-10

sant namdev

Sant Namdev Abhang-10

संत नामदेवांचे अभंग-10

रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला आणि खूप दिवस झाले, मी साधना करीत आहे पण अजून मला ईश्वर प्राप्ती होत नाही असे सांगू लागला. रामकृष्ण त्याला जवळच्या नदीत घेऊन गेले. त्यांनी त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. तो साधक श्वास घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रामकृष्णांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि बाहेर येऊन म्हणू लागला, “हे काय? माझा जीव घेणार होतात की काय आज? मी तुमच्याकडे ईश्वर प्राप्ती करून घ्यायसाठी आलो आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघलात! रामकृष्ण म्हणाले, “मी जेंव्हा तुला पाण्याखाली दाबून धरले होते, तेंव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची वाटली?”

“कशाची म्हणून काय विचारता? श्वास घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता! मला सगळ्यात जास्त आवश्यकता तेंव्हा श्वास घेण्याची वाटत होती!”

तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “इतकी तीव्रतेने जेंव्हा तुला ईश्वरप्राप्तीची आवश्यकता वाटेल, ईश्वरा शिवाय एक क्षण ही राहणे जेंव्हा तुला अशक्य होईल, तेंव्हा, तत्क्षणीच तुला ईश्वर प्राप्ती होईल!”

सर्व संतांची आपल्याला हीच अवस्था दिसते. म्हणूनच त्यांना ईश्वरप्राप्ती झालेली असते. “चुकलिया माये, बाळ हुरूहुरू पाहे”.. “जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी” अशा अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपली तळमळ व्यक्त करतात.

संत नामदेवही आपली साधक अवस्थेतील तळमळ खालील अभंगांतून व्यक्त करतात-

जननिये जिवलगे ये वो पांडुरंगे शिणलों भेटी दे गे एक वेळां

त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे | येऊनियां राहें हृदयामाजीं

वासनेच्या संगें शिणले माझें चित्त विषयाचे आघात पडती वरी

नाहीं तुझी सेवा केली मनोधर्मे   संसारसंभ्रमें भ्रांत सदा

नाहीं तुझें नाम गाइले आवडी | वाळली कुर्वंडी त्रिविध तापें

नामा म्हणे आई धांवें लवलाहीं बुडतों चिंताडोहीं काढीं मज

साधकाला जेंव्हा आपले अपराध कळून येतात, अनेक प्रयत्नांनीही विषय, वासना आटोक्यात येत नाही हे जेंव्हा कळते, तेंव्हा अनन्य भावाने आपल्या जननीचा धावा करणे हेच त्याला सुचते.

तुमची आमची अशी अवस्था असते की आपल्यासारखे चांगले आपणच अशी आपली पक्की धारणा असते. आपले दोष आपल्याला कधीच दिसून येत नाहीत. मग त्यांच्याबद्दल वाईट वाटणे तर दूरच. पण संतांची अवस्था अशी नसते. त्यांना आपण म्हणजे अपराधांची राशी आहो असे वाटत असते-

काय गुणदोष माझे विचारिसी | आहें मी तों राशी अपराधांची

अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत | अखंड दुश्‍चित आचरलों

स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति| पुससी विरक्ति कोठोनियां

तूं चि माझा गुरु तूं चि तारी स्वामी | सकळअंतर्यामी गाऊं तुज

नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण | नको करूं शीण पांडुरंगा

देवाच्या नांवाचा महिमा तर कळला आहे, पण मुखी नांव मात्र येत नाही. अमृत साक्षात समोर दिसत असूनही ते घेण्याची इच्छा होत नाही.

पण संतांनी या अभंगांतून, स्वतःच्या मिषाने खरे तर तुमच्या आमच्यासारख्या संसारी जीवांची अवस्था वर्णन केली आहे, असे जाणवते.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा | मन माझें केशवा कां बा नेघे

सांग पंढरीराया काय करूं यासी | कां रूप ध्यानासी ये तुझें

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविले | मन माझें गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामकीर्ति | ये माझ्या चित्तीं नामा म्हणे

___________________________________

बालकामध्ये कोणती विशेषता असते? कोणतेही संकट आले, की त्याला फक्त आईचा धावा करणे, आईच्या कुशीत लपणे, हेच माहिती असते.

अग्नीमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु

तैसा धांवें माझिया काजा | अंकिला मी दास तुझा

वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरिणी

नामा म्हणे मेघा जैसा | विनवितो चातक तैसा

तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजीं प्रेम पान्हा पांडुरंगे

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं | नको पान्हा चोरूं पांडुरंगे

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस | तोडी भवपाश पांडुरंगे

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज | चारा घालीं मज पांडुरंगे

नामा म्हणे होसी भक्‍तीचा वल्लभ | मागें पुढें उभा सांभाळिसी

वरील अभंगात ‘माऊली-तान्हा’, ‘गाऊली-वासरू’, ‘हरिणी-पाडस’, ‘पक्षिणी-अंडज’ अशा कितीतरी उपमा देऊन नामदेव महाराज आपले आणि पांडुरंगाचे बालक आणि मातेचे नाते वर्णन करतात.  

 ___________________________________

तसेच खालील अभंगातील शब्दरचना किती गोड आहे- ‘भुकाळु, कृपाळु, सांभाळु’ अशा शब्दांनी त्यातील कोमल भाव नेमका व्यक्त होतो.

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारीं भवव्यथे पांडुरंगे

मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु करी माझा सांभाळु पांडुरंगे

मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्त तूं अन्न | मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगे

मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर मी याचक तूं दातार पांडुरंगे

मी धनलोभी शुद्ध तूं पूर्ण कनककुंभ | मी मगर तूं अंभ पांडुरंगे

मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तू बोध मी शुष्क नदी तूं ओघ पांडुरंगे

मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक | मी प्रजा तूं पाळक पांडुरंगे

मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी मी अपत्य तूं जननी पांडुरंगे

मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय | मी आडळ तूं साह्य पांडुरंगे

शीघ्र येई वो श्रीरंगे भक्‍तमानसरंगे | प्रेमपान्हा दे गे नामदेवा

_____________________________________

 खालील गीत तर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण बऱ्याचदा ऐकतो.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Pakshini_Prabhati_Chariyasi

पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये | पिलू वाट पाहे उपवासी

तैसें माझें मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चिंतीतसे

तान्हें वत्स घरीं बांधलेसें देवा तया हृदयीं धांवा माउलीचा

नामा म्हणे केशवा तूं माझा सोइरा | झणीं मज अव्हेरा अनाथनाथा

 

_____________________________________

जे काही मागायचे ते केशवा जवळच मागायचे- आणि मागायचे ते काय- विषय भोग नाही, तर त्याचीच अनन्य भक्ति- खालील अभंगसुद्धा ‘मंगला नाथ’ यांच्या आवाजात आपण भक्ति गीतांच्या कार्यक्रमात बऱ्याचदा ऐकतो.

click here to listen the song

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

साधनेच्या उत्तरावस्थे मध्ये साधकाची देवाशी एवढी जवळीक होते, की मग तो म्हणतो, “आम्ही भक्तांनीच तुझा महिमा वाढविला आहे- नाही तर तुला कोण विचारतो!”

देवा आम्हीं तुज दिलें थोरपण | मानीं हें वचन सत्य माझें

पतित अमंगळ तुज झालों साह्य | विचारू पाहें खरेंखोटें

रोग व्याधि पीडा जनांसी नसतां | कोण पाचारितां वैद्यालागीं

कल्पनेचें भूत झडपी या संसारीं | माने पंचाक्षरी पाचारितां

 _____________________________

आम्हीं शरणागतीं केलासी सरता | येऱ्हवीं अनंता कोण जाणे

वेदशास्त्रपुराणीं उबगोनि सांडिलासी | तो आम्हीं धरिलासी हृदयकमळीं

चतुरां शिरोमणि अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्हीं

सहस्र नामीं झालासी संपन्न तरी हें हि भूषण आमुचें चि

येऱ्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा पाहें मेघश्‍यामा विचारोनि

होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी लक्ष्मी तेथें करी चरणसेवा

ते हि तंव जाण आमुची जननी तूं तियेवांचोनि शोभसी कैसा

तुज नाहीं नाम रूप जाति कुळ | अनादिचें मूळ म्हणती तूज

आम्ही भक्‍त तरी तूं भक्‍तवत्सल | ऐसा प्रगट बोठ जगामाजीं

ऐसे आमुचेनि भोगिसी थोरीव | आमुचा जीवभाव तुझे ठायीं

नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता | तरी या बोला उचिता प्रेम देई

 मी तुझा दास म्हणवतो आणि तरी जर माझ्यात प्रेमभाव नसेल तर त्यात तुलाच कमीपणा आहे असे देवाला बजावायला संत कमी करीत नाहीत!

तुझा विष्णुदास म्हणताती जगीं | नाहीं माझे अंगीं प्रेमभावो

तेणें थोर लाज वाटे पंढरीराया | ये माझ्या हृदया एक वेळां

द्वैताद्वैतभाव आहे माझे ठायीं | अनुभव नाहीं स्वरूपाचा

नामा म्हणे माझा उजळ करीं माथा | भेटी देउनी संतां निरवीं मज

आणि मग नामदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात-

घे रे घे रे नाम्या दिलें माझें प्रेम | घोकी माझें नाम सर्वकाळ

शिरावरी हात ठेवीतसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनी

भक्तिसुख देवें दिले नामयातें | नामा परमामृतें तृप्त झाला

नामा म्हणे देवा झालों मी पावन | माझें तुजविण कोण आहे

 आणि मग समर्थाच्या दासाला साक्षात काळाचीही भीती नाही-

आम्ही विठोबाचे दूत | यमा आणूं शरणागत

मुखीं नाम हातीं टाळी महापाप करूं होळी

एवढा प्रताप नामाचा | रीघ नव्हे कळिकाळाचा

ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत

आणि मग देहाची आठवण सुद्धा राहत नाही- फक्त मुखात केशवाचे मंगल नाम राहावे हीच इच्छा राहते.

देह जावो अथवा राहो- येथे ऐका

 देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो

चरण सोडीं सर्वथा आण तुझी पंढरीनाथा

वदनीं तुझें मंगळ नाम | हृदयीं अखंडित प्रेम

नामा म्हणे केशिराजा | केला नेम चालवी माझा

_____________________________________

साधनेच्या उच्च अवस्थेत, उन्मनी अवस्थेत आपल्या आराध्य दैवताचे चिंतन करता करता द्वैत मावळते- योग्यांना ध्यानाच्या अवस्थेत येणारा अनुभव- तो अनाहत ध्वनि- भक्तांना भक्तीच्या उच्च अवस्थेत अनायासेच अनुभवायला येतो. हे केवळ कवित्व नाही- हा साक्षात अनुभव शब्दरूपांनी प्रकटला आहे.

देहमंदिराभीतरीं शेजे सूतले श्रीहरि

निद्राउन्मनीचे भरीं तें म्यां स्वप्न देखिले

ध्यानीं पहुडला सांवळा | जवळीं नारी बारा सोळा

विंजणें वारिती सकळा | सोहंशब्द जागरणीं

धिं धिं तुरे वाजती | अनुहातध्वनि गर्जती

तेथें निद्रा ना सुषुप्ति | चंद्र सूर्य मावळले

मना पवना नाहीं भेद तया ठायीं हा गोविंद

तेथें खुंटला अनुवाद | वेदश्रुति आटल्या

म्हणे विष्णुदास नामा | जन्ममरण नाहीं आम्हां

कृपा केली मेघश्यामा | संतसंगें तारिलों

 खालील अभंगही अद्वैताच्या उच्च अनुभवाचे वर्णन करणारा आहे- “आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे”, “पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे| प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |”

चेईला म्हणजे ‘जागा झाला, भानावर आला’

चेइला तो जाण रे सद्गुरुवचनीं निर्धारे

विपरीत मानवा विसर पडला कंठीं जया परिहार रे |

आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे

चंद्रसूर्य जेणें प्रकाशे तो मी कैसा पाहूं रे |

अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे

चेइला तेणें ओळखिला येरांसी अगम्य भाई रे |

पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे

प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |

काष्ठी पावक उपजला तो हि तया सम रे

नामा म्हणे केशिराजा चेइल्या आम्हां तुम्ही रे |

संत नामदेव यांच्या विपुल अभंग भांडारातील काही मोजके अभंग आपण या १० भागांत पाहिले. संत मंडळी ही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रभूमी मध्ये जन्म मिळाला हे खरोखर आपले भाग्य आहे.

यापुढे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांच्या अभंगांबद्दल लिहिण्याचा विचार आहे.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-9 Sant Namdev Abhang-9

sant namdev

Sant Namdev Abhang-9

संत नामदेवांचे अभंग-9

 

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 8 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, भक्तिरस इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

विठू माऊली हे सर्व भक्तांचे विश्रांतिस्थान आहे, तर पंढरी नगरी ही विठोबाच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, म्हणून सर्व संतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी पंढरीचा महिमा अनेक प्रकारे वर्णन केला आहे.

पंढरीचा महिमा वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात-

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस | माझा स्वप्रकाश रत्न हरि

धन्य संतजन तेथींचे पारखी | ज्यां झाली ओळखी विठ्ठलनामीं

अनुभवूनि चित्तीं पाहिलें विवेकें | धरिले पुंडलीकें हृदयकमळीं

त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण | करूनि भूषण भोगितसे

युगें गेलीं परी पालट चि नाहीं| नित्य शुद्ध पाहीं तेज:पुंज

पाहतां नित्यनवें ध्यातां चित्त निवे | म्हणोनि नामा जीवें विसंबेना

 

मांदुस म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे संदूक किंवा पेटी. पंढरी हे सुखाचे मांदुस आहे, कारण तिथे स्वयं प्रकाश रत्न ‘हरि’ आहे.

____________________________________

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें | भावें अनुसरले विठ्ठलपायीं

काया वाचा मनें रंगले चरणीं धरियेला मनीं पांडुरंग

नामाचेनि बळें उडविलीं साधनें तोडिली बंधनें संसाराची

मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं | हिंडे वाळवंटीं दीनरूप

योगियांचे घरीं रिघे काकुळती अव्हेरिले संतीं म्हणोनियां

ऐसे भक्तराज देवा वंद्य झाले | तें एक राज्य केलें पुंडलीकें

हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी | कीर्ति चराचरी वर्णितसे

 पंढरीच्या सुखाचे वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात- पंढरीचे सुख ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी मुक्तिपद म्हणजे काहीच नाही. पंढरीचे सुख मिळालेले भक्त मुक्तिपद फुकटही घेत नाहीत. ते मुक्तिपद बिचारे पंढरीच्या वाळवंटात, संतांनी अव्हेरले म्हणून दीनवाणे फिरते आणि मग योगीजनांकडे जाते!

____________________________________

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी | अवघा घरोघरीं ब्रह्मानंद

अवघा हा विठ्ठल सुखाचा चि आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख

पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं | अवघा ध्यावा ध्यानीं अवघ्या मनें

अवघिये आवडी अवघा गावा गीतीं | अवघा सर्वांभूती तो चि आहे

अवघा हा जाणावा अवघा हा मानावा अवघा वाखाणावा अवघी वाचा

अवघा वोळखोनि अवघा गिळिजे मनें अवघा हा चि होणें म्हणे नामा

____________________________________

नामदेव महाराज म्हणतात, पंढरीस जाऊन जीवन्मुक्त व्हावे- आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करावे आणि विठ्ठलाचे प्रेमसुख घ्यावे.

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावें विठ्ठला भेटावे जिवलगा

काया वाचा मन चरणीं ठेवावें | प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ

सुखाचें साजिरे श्रीमुख पहावें जीवें उतरावें निंबलो

बाहेरी भीतरी कैवल्य आघवें वाचे बोलवे ब्रह्मानंदु

चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण | करी तुझें ध्यान रात्रंदिवस

 

___________________________________

आणि पंढरीच्या पांडुरंगाची नामदेव महाराजांनी रचलेली खालील आरती ही तर जगप्रसिद्ध आहे आणि घरोघरी आणि सगळ्या मंदिरांत विठ्ठलाची म्हटली जाणारी सगळ्यात लोकप्रिय आरती आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा

तुळसीमाळा गळां कर ठेवून कटीं | कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती | चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णू मी किती

आषाढी कार्तिकी भक्‍त जन येती | चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती

____________________________________

मागील एका अभंगात “वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना” असे म्हणून नामदेव महराजांनी “नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना” असे सांगून, वेगवेगळ्या ज्ञानशाखा, किंवा व्यवसाय या वैष्णव होण्याला उपयोगी नाहीत, पण केशवाचे नाम घेतले तर मात्र केशवरूप होशील असे सांगितले आहे, त्याच धर्तीवर, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचे ध्यान केले तर तद्रूप होशील पण केशवास ध्यायले तर केशवरूप होशील असे आपल्या मनाला बजावले आहे.

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वी चि होसी | परी केशव होसी अरे मना

आप ध्यासी तरी आप चि होसी | परी केशव होसी अरे मना

तेज ध्यासी तरी तेज चि होसी | परी केशव होसी अरे मना

वायु ध्यासी तरी वायु चि होसी | परी केशव होसी अरे मना

आकाश ध्यासी तरी आकाश चि होसी | परी केशव होसी अरे मना

नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी चि केशव होसी अरे मना

____________________________________

संसारात असतांना केशवाचे ध्यान कसे करायचे असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर दोन उदाहरणें देऊन नामदेव महाराजांनी खाली सांगितले आहे-

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं हातीं असे दोरी परी लक्ष तेथें

वावडी म्हणजे पतंग. पतंग आकाशात दूर उडतो, कुठे कुठे जातो, पण त्याचा दोर उडवणाऱ्याच्या हाती असतो. त्यामुळे अशी कल्पना केली आहे की  पतंगाचे लक्ष तो कितीही उंच गेला तरी आपल्याला धरणाऱ्या हाताकडे असते. तसे आपले लक्ष आपण संसारात कुठल्याही भलत्या कामात असले तरी लक्ष मात्र आपले आपण ज्याचे अंश आहोत, त्या देवाकडे असले पाहिजे.

वरील अर्थ हा मला ज्याप्रमाणे लावता आला तसा इथे सांगितला आहे. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें तियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

वरील पतंगाच्या उपमेलाच अजून स्पष्ट करणारा हा अभंग अगदी नितांतसुंदर आहे. जुन्या काळातील लोकांना हे चित्र सहज डोळ्यांसमोर येऊ शकेल. पूर्वीच्या काळी नदीवरून किंवा पाणवठ्यावरून लांबून पाणी आणावे लागायचे. तेंव्हा ते आणणाऱ्या स्त्रीचे कसब बघण्यासारखे असायाचे. एकावर एक अनेक हंडे घेऊन ती पाणी आणायला जायची. येतांना ते पाण्याचे सगळे हंडे एकावर एक ठेवून, दोन्ही हात मोकळे ठेवून, आपल्या सख्यांबरोबर ती गुजरी (खेड्यातील स्त्री) मस्त गप्पा मारीत येत असते. एकीकडे रस्त्यावरचे खड्डेही चुकवीत असते. पण तिचे मुख्य लक्ष हे आपल्या डोक्यांवरील हंड्यांकडे असते. आणि त्यांचा तोल सांभाळीत ती चालते आणि भांड्यातील पाणी अजिबात सांडू देत नाही. किंवा दुसरी उपमा एखादा धनलोभी असतो, तो बाहेरून त्याची सर्व कामें करीत असला तरी त्याचे लक्ष किती धन येते आहे याकडे असते.  तसेच संसारात, आपली रोजची कर्तव्यें तर चोख बजावायची पण चित्त मात्र श्रीहरीकडे ठेवायचे हे कसब सवयीने जमते.  

_____________________________________

खालील अभंग हा आमच्या शालेय शिक्षणात कुठल्या तरी वर्षाला मराठी विषयात होता असे आठवते. हृदयात श्री हरि असेल तर संसाराची अग्निबाधा होणार नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे.

अग्नि जाळी तरी जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळती गोपाळ | हृदयी देवकीबाळ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे हनुमंत | हृदयीं सीताकांत म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे पैं सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे प्रल्हाद  | हृदयी गोविंद म्हणोनियां

नामा म्हणे स्वामी स्मरावें गोविंदा | चुके अग्निबाधा संसाराची

पुढील भागात आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधकाची होणारी तळमळ व्यक्त करणारे नामदेवांचे अभंग आहेत, ते पाहणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-8 Sant Namdev Abhang-8

sant namdev

Sant Namdev Abhang-8

संत नामदेवांचे अभंग-8

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 7 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

या काळात, म्हणजे गेल्या ८-९  शतकांत भारताच्या विविध भागात होऊन गेलेल्या संतांपैकी प्रायः सगळे संत हे आपआपल्या इष्ट देवाच्या सगुणरूपाच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले दिसतात. संत नामदेव सुद्धा विठ्ठलाच्या भक्तिरसात आकंठ बुडालेले होते. आपली कनवाळू माऊली, सावळी विठाई हिचे वर्णन करतांना त्यांच्या वाणीला विशेष बहर येतो. सगुण भक्तीचे वर्णन करणारे काही अभंग हे खरोखर अनुभवायचे आहेत.

विटेवरी उभा दीनांचा कैवारी भेटावया उभारी दोन्ही बाह्या

गुणदोष त्यांचे पाहे चि डोळां भेटे वेळोवेळां केशिराज

ऐसा दयावंत घेत समाचार | लहान आणि थोर सांभाळितो

सर्वांलागी देतो समान दर्शन | उभा तो आपण सम पायीं

नामा म्हणे तया संतांची आवडी भेटावया कडाडीं उभा चि असे

दीनांचा कैवारी असा पंढरीनाथ हा दोन्ही हात उभारून भक्तांना कडकडून भेटायला उत्सुक असा उभा आहे.


वेदासी कानडा श्रुतीसी कानडा | विठ्ठल उघडा पंढरिये

नाम बरवें रूप बरवें दर्शन बरवें कानडियाचें

नामा म्हणे तुझें अवघें चि बरवें त्याहुनी बरवें प्रेम तुझें

 

भक्तवत्सल असा पंढरीनाथ, वेदांना आणि श्रुतीला अगम्य (कानडा) आहे, पण पंढरीमध्ये मात्र तो उघडा आहे. कोणालाही प्राप्य आहे. त्याचे नांव ही अत्यंत गोड आहे, आणि रूप तर त्याहूनही गोड आहे. देवाचे नाम आणि रूप तर गोड आहेच, पण त्याहूनही त्याचे प्रेम हे अत्यंत उत्कट आहे. (या प्रेमाची गोडी मात्र संतच जाणतात).

कृष्णाला विविध रूपांमध्ये पाहणारी खालील रचना ही ‘पाळणा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मुक्‍ताफळनथ नाकीं | चरणीं ल्याली वाळे वांकी

पीतांबरें अंग झांकी | कृष्णम्मा माझी

खांद्यावरी कांबळी | पायघोळ लांबली

पांघरली धाबळी | कृष्णम्मा माझी

गाईपाठीं लागली | पळतां नाहीं भागली

माय बहीण चांगली | कृष्णम्मा माझी

देहुडा पाउलीं उभी माझी माउली

विश्रांतीची साउली | कृष्णम्मा माझी

उभी नीट वीटेवरी शोभे भींवरेचे तीरी

नामयाची कैवारी | कृष्णम्मा माझी

खालील ‘गवळण’ ही सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण पूर्वी कित्येकदा ऐकली  असेल.  या रचनेचा अर्थ प्रथमदर्शनी समजण्यास अवघड असला, तरी ही  रेडिओवर लागल्यानंतर मन एका वेगळ्याच विश्वात जायचे हे मात्र खरे.

रात्र काळी घागर काळी | यमुनाजळें हीं काळीं वो माय

बुंथ काळी बिलवर काळी | गळां मोतीं एकावळी काळी वो माय

मी काळी कांचोळी काळी | कांस कांसली ते काळी वो माय

एकली पाण्याला नव जाय साजणी ।सवें पाठवा मूर्ति सांवळी गो माय

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी | कृष्णमूर्ति बहु काळी वो माय

ही गवळण येथे ऐकू शकता  

आठवणीतली गाणी या मराठी गीतांचे छान संकलन असलेल्या वेबसाइट वर हे उपलब्ध आहे.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ratra_Kali_Ghagar_Kali

 ही गवळण दत्ताराम गाडेकर यांनी संगीतबद्ध केली आहे. गायक गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर हे आहेत. पण यातील स्त्री गायिका कोण हे समजले नाही.

‘बुंथ’ या शब्दाचा अर्थ आहे आवरण किंवा ओढणी, डोक्यावरून सर्व शरीरावर आच्छादनार्थ घेतलेले वस्त्र. बिलवर म्हणजे बांगडी, एकावळी किंवा एकसर म्हणजे एकेरी मोत्यांची किंवा मण्यांची माळ. काचोळी म्हणजे चोळी. या शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळातील लोकांना माहित आहे.

काजळकाळ्या रात्री, काळी घागर घेऊन, काळ्याकभिन्न यमुनेचे काळेशार पाणी (रात्रीच्या अंधारात ते पाणीही काळेशार दिसते. आणि तशीही यमुना ही ‘काळी’ म्हणूनच प्रसिद्ध आहे.!) आणायला एक गोपी साजशृंगार करून कृष्णाच्या विचारात त्याला भेटायला निघालीय. काळ्या रंगाचे बिलवर, काळी ओढणी, काळ्या मोत्यांचा एकसर, काळी चोळी तसंच साडी पण काळी. पण एकटीनं अपरात्री जायची भीती वाटते. पण सावळी कृष्णमूर्ती सोबत असल्यावर मग मात्र कशाचे भय उरत नाही अशा अर्थाची ही रचना आहे. थोडक्यात, कृष्णाच्या काळ्या रंगात रंगून निघाल्यानंतर, म्हणजेच द्वैत संपून अद्वैतात स्थिति झाल्यानंतर कशाचे भय उरत नाही असा या गवळणीचा अर्थ असावा असे मला वाटते.

काही इतिहासकारांच्या मते ‘विष्णुदास नामा’ हे एक वेगळे संतकवि सोळाव्या शतकात पंढरपुरात होऊन गेले, त्यांची ही रचना आहे. रचना कोणाची का असेना, पण अत्यंत गूढ अर्थ असलेली अशी ही  रचना आहे.

 खालील एका अभंगात योगी, ज्ञानी यांच्याही पेक्षा भक्तांचे परब्रह्म कसे प्रिय आहे त्याचे खूप छान वर्णन केले आहे.

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार | आमुचें साकार विटेवरी

दाटुगें नागर कटीं ठेवूनि कर | सर्वस्वें उदार भक्‍तांलागीं

ज्ञानिया सिद्धांतीं लक्षा परी ये। आमुची वाट पाहे अनाथांची

जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय आमुचें भकितप्रिय सांसारिका

नामा म्हणे जीवें करीन ओंवाळणी | झणीं चक्रपाणि दिठावसी

सत्य नित्य युक्‍त शुद्ध बुद्ध मुक्‍त | कारणरहित निरंजन

तें आम्हीं देखिले चर्मचक्षु-दृष्टी | उभा वाळवंटी पंढरीये

वेदां अगोचर तया सहस्रमुखा | तें झालें पुंडलीका लोभापर

परतलिया श्रुति म्हणती नेति नेति । आम्हां गातां गीतीं सांपडलें

स्वरूपाचा निर्धार बोलती पुराणें । शिणलीं दर्शनें विवादती

नामा म्हणे यासी भाव चि कारण | पावावया चरण केशवाचे

ब्रह्म अविनाश आनंदघन । त्याहुनी चरण गोड तुझे

ते जीवें न सोडी अगा पंढरीनाथा । जाणसी तत्त्वतां हृदय माझें

परात्पर वस्तु जे कां अपरंपार | तियेचा साक्षात्कार पाय तुझे

सच्विदानंदघन जेथें हारपठें मन । त्याहुनी चरण गोड तुझे

नामा म्हणे तुझीं पाउठें सुकुमार | तें माझें माहेर विटेवरी

माझिया रे मनें मज उपदेश केला | तो मज बिंबला हृदयकमळीं

निर्वाणींची एक सांगितली खूण | कैवल्य चरण केशवाचे

वेदशास्त्रे स्मृति आणिक पुराणें | पढोनि जाणणें हें चि सत्य

तप अनुष्ठान करोनि साधन | प्रत्यक्ष विधान चरण हे चि

नामा म्हणे मज कळलें अनुभवें । न विसंबें जीवें चरण तुझे

पंढरीचा देव बहुत कोंवळा सगुण सांवळा सारथि हा

सारथि सर्वांचा साक्षिभूत असे | संकटीं सायासे गजेंद्रासी

गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्ठीणीचे करीं फळें भक्षी

भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी नामा म्हणे हरि गोड मानी

पाला खाऊनियां धाला बहिणीघरीं | भक्‍तालागीं हरि वेडा झाला

सुदाम्याचे पोहे कोरडे चि खाय मटमटा पाहे चहूंकडे

विदुराच्या कण्या खाय धणीवरी झाला बळीचे द्वारीं द्वारपाळ

नामा म्हणे हरीचे कळती पवाडे | नेणों भक्‍तांपुढें वेडा झाला

वरील सर्व अभंग हे भक्तीच्या अत्यंत उन्नत अवस्थेत नामदेवांना झालेल्या अनुभवाचे बोल आहेत एवढे नक्की. आपल्यासारख्यांना हे अभंग वाचून, त्या भक्तिसुखाचा किंचित आभास जरी झाला, तरी धन्य म्हणावे अशी स्थिती आहे.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-7 Sant Namdev Abhang-7

sant namdev

Sant Namdev Abhang-7

संत नामदेवांचे अभंग-7

यापूर्वीच्या सहाव्या भागात संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांतून सांगितलेली संताची महति आपण पाहिली.

संत हे सर्वसामान्य जनांसाठी, अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगत असतात. जशी माऊली आपल्या लेकरांना जेवू घालतांना त्यांच्या तोंडात मावतील असेच छोटे छोटे, चिमणे घास करून भरवते, आणि जे काही दूध भाकरी किंवा भात वगैरे असेल, ते अगदी बारीक कुस्करून त्या मुलाला सुपाच्य करून देते, तद्वतच संत हे सर्वसामान्य जनांना वेदांतातील अवघड ज्ञान, सोपे करून सांगत असतात.

खालील अभंग हा ‘खेळिया’ म्हणून ओळखला जातो. त्याच्यात उपनिषदांतील ‘एकोहं बहुस्यामि’ असे परब्रह्माच्या ठिकाणी झालेले स्फुरण, आणि त्यासाठी ‘अरुप’ असलेले ते, नांव रूपाला आले, आणि कसा खेळ करू लागले, याचे मनोरंजक वर्णन आहे. ‘स्वतःच स्वतःला व्यायले’ ही कल्पना किती सार्थ आहे!

आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते बारा वर्ष लपाले रे.. यातून शुकदेवांची गोष्ट सांगितली आहे. शुकदेव हे पोपटाच्या स्वरूपात भगवान शिवांच्या कोपापासून वाचण्यासाठी त्रिभुवनात फिरत शेवटी महर्षि व्यासांच्या आश्रमात आले आणि त्यांच्या पत्नीच्या मुखात प्रवेश करून लपून बसले. महर्षि व्यासांनी त्यांना शिवाच्या कोपापासून वाचविले, आणि शुकदेव व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शिरले. बाहेरच्या जगात मायेचा संपर्क येईल म्हणून ते १२ वर्ष बाहेरच आले नाही. शेवटी महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून ते बारा वर्षांनी भीत भीत बाहेर आले, तेंव्हा त्यांची अवस्था बारा वर्षाची बालकाची होती. जन्मल्याबरोबर ते नग्न अवस्थेतच, जंगलाच्या दिशेने पळाले, अशी कथा आहे.

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण- चार मुखें असलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांच्याबद्दलही विनोदाने ‘ कुचाळी करुनी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे’ असे वर्णन केले आहे! अशाच मिस्किल शैलीत हनुमानाचे आणि श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. आणि शेवटी हा सर्व एक खेळ आहे हे सत्य सांगितले आहे.

नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें जीवशिव नांव पावलें रे

आपली चि आवडी रुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें | जाणूनि खेळ खेळें रे

ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले | ते बारा वर्षे लपालें रे

कांपत कांपत बाहेरी आलें | तें नागवें चि पळुनी गेलें रे

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण | तो खेळियांमाजीं आगळा रे

कुचाली करूने पोरें भांडवी | आपण राहे वेगळा रे

खेळ खेळे परी डायीं सांपडे तो एक खेळिया शाहणा रे

खेळियांमाजीं हनुम्या शाहणा | पडे कामव्यसनीं रे

काम चि नाहीं तेथें क्रोध चि कैंचा | तेथें कैचे भांडण रे

रामा गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणें रे

यादवांचा पोर एक गोप्या भला | तो बहुत चि खेळ खेळला रे

लहान थोर अवघीं मारिलीं | खेळ चि मोडूनि गेला रे

ऐसे खेळिये कोट्यानुकोटी | गणित नाहीं त्यासी रे

विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देहीं शोधूनि रे

खालील अभंगात, अद्वैत अनुभव आल्यानंतर सुख दुःखाची कोण पर्वा करते, सापाने त्वचा (कात) टाकली आणि बिळात गेला की मग बाहेर राहिलेल्या त्या निर्जीव त्वचेला कोण सांभाळते, अशी अनेक उदाहरणें देऊन, अद्वैत अनुभव सोपा करून सांगितला आहे.

सुखदुःखें दोन्ही आम्हांसी सारिखीं | प्रतीति पारखी मना आली

अंतर्बाह्य एक ब्रह्म चि कोंदलें | दुजेपण गेलें निपटूनि

त्वचा टाकूनियां सर्प गेला बिळीं | मग ते सांभाळी कोण सांगा

ओघ सांडूनिया गंगा सिंधू ठाये | विसरली धाये खळाळाची

नामा म्हणे रात्र जैसी कां पाहिठी | धारणा ते झाली तैसें आम्हां

ब्रम्हानंदाची प्राप्ती झाल्यानंतर इतर गोष्टींची कोण पर्वा करते- याची अजून काही उदाहरणे देतात

निद्रिस्ताचे सेजे साप कां उर्वशी पाहों विषयासी तैसे आम्ही

ऐसी कृपा केली माझ्या केशिराजें प्रतीतीचें भोजें एकसरा

शेण आणि सोनें भासतें समान | रत्न का पाषाण एकरूप

पाया लागो स्वर्ग वरी पडों वाघ | आत्मस्थितीभंग कदा नोहे

नामा म्हणे कोणी निंदा अथवा वंदा झालों ब्रह्मानंदाकार आम्ही

संत मंडळींचे उपकार मानतांना, आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा असे म्हणून पुढील अभंगात संतांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां माझिया सकळां हरीच्या दासा

कल्पनेची बाधा हो कोणे काळीं | ही संतमंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी

नामा म्हणे तयां असावें कल्याण | ज्यां मुखीं निधान पांडुरंग

नंतर महाभारतातील एक कथा सांगून, ब्रह्मनिष्ठ वैराग्यशील पुरुषाचे महत्त्व सांगतात.

पत्रावळी काढी वैकुंठनायक | धांवूनियां शुक आला तेथें

दाटी पाहुनी द्वारीं मानसीं विचारी | जावया भीतरी काय काज

वाहे हा प्रसाद स्वहस्तें अनंत | वेंचोनियां शीत घाली मुखीं

घंटानाद वाजे लक्षद्विजपंकिति | अक्षयीं वाजती वेळोवेळां

ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव पुसे धर्मराव देवाजीसी

सांगतसे खूण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला येथें

तेथूनि उठले धर्म नारायण | बाहेरी येऊन पाहताती

शुकाचिये मिषें व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश

धरूनियां करीं नेला तो भीतरीं | नामा म्हणे करी पूजा त्याची

खालील एका अभंगात ज्ञानेश्वरीबद्दल सुप्रसिद्ध ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हा चरण आला आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे समकालीन होते. पण त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच संजीवन समाधी घेतली. त्यांचे वर्णन करतांना ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली’ असे म्हणून, ज्ञानेश्वरीचे महत्त्व वर्णन करतांना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी असे सांगतात. आणि हे अगदी खरेच आहे. ज्ञानेश्वरी हा युगानुयुगांत एखादाच होणारा असा ग्रंथ आहे. आणि तो नुसताच ‘वाचण्याचा’ नाही, तर ‘अनुभवण्याचा’ आहे, हे ज्ञानेश्वरीचे जाणकार चांगलेच जाणतात.

त्यापुढे जाऊन, नामदेव महाराज आपल्या गुरूंचे-विसोबा खेचरांचे ऋण व्यक्त करतांना म्हणतात- डोळियाचा डोळा उघडला ज्याने- अशा सद्गुरूंचे पाय मी विसंबणार नाही.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्ली प्रगट केली

अध्यात्मविद्येचें दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला

छप्पन्नभाषेचा केलासे गौरव | भवार्णवीं नाव उभारली

श्रवणाचे मिषें बैसावें येऊनि | साम्राज्यभुवनीं सुखी नांदे

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओंवी अनुभवावी

सद्गुरूसारिखा सोइरा जिवलग | तोडिला उद्वे संसारींचा

काय उतराई होऊं कवण्या गुणें जन्मा नाहीं येणें ऐसें केलें

माझें सुख मज दाखविले डोळां | दिधली प्रेमकळा नाममुद्रा

डोळियाचा डोळा उघडिला जेणें लेवविले लेणें आनंदाचे

नामा म्हणे निकी सांपडली सोय | विसंबे पाय खेचराचे

 

पुढील भागात संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहूयात.

माधव भोपे

GoodLifeHub.in

A place for all good things in Life.

Skip to content ↓