Divine Wisdom
ईश्वर शरण बुद्धि
चरकसंहिता हा आयुर्वेदाचा संस्कृत भाषेतील एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. याचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक महर्षि चरक आहेत. एकदा महर्षि पुनर्वसु आपला हा अद्वितीय ग्रंथ निर्माण केल्यानंतर एका जंगलातून चालले होते. घनदाट जंगलातील पायवाटेवर, ते चालले होते आणि त्यांच्या मागे त्यांचा शिष्य अग्निवेश. चालता चालता एकदम पुनर्वसु थांबले. त्यांनी आकाशाकडे पाहिले, चारी दिशांना पाहिले, आणि एक सुस्कारा सोडून म्हणाले, “ महानाश होणार आहे.”
अग्निवेशांनी विचारले, “कसा महानाश, गुरुवर्य?”
पुनर्वसु म्हणाले, “ पृथ्वी दूषित होत आहे, पाणी दूषित होत आहे, वायु, तारे, आकाश, सूर्य, चंद्र, सगळे बिघडत आहेत. येणाऱ्या काळात, अन्नधान्य आपले गुण सोडून देईल, औषधी वनस्पति आपला प्रभाव सोडून देतील, पृथ्वीवर तुटणारे तारे येऊन आदळतील, विनाशकारी तूफान आणि भूकंप येईल, महानाशाचे तांडव होईल! मनुष्य वाचणार नाही!”
ही कथा चरक ‘विमान’ स्थानाच्या तिसऱ्या अध्यायात येते. त्यात पुढे असे सांगितले आहे, की अग्निवेशांनी जेंव्हा ही भयानक भविष्यवाणी ऐकली, तेंव्हा हात जोडून त्यांनी विचारले, “ गुरुदेव!, तुम्ही अशी भयभीत करणारी भविष्यवाणी का बरें करीत आहात? सगळ्या रोगांचे उपाय सांगणारा असा ग्रंथ आपण लिहिलात. तरी हा असा विनाश येईल असे आपण का म्हणतात?”
महर्षि पुनर्वसु म्हणाले, “ ते मी यामुळे म्हणतो कारण की येणाऱ्या काळात लोक धर्म सोडून अधर्माच्या रस्त्याला लागतील, सत्य सोडून असत्याच्या मार्गाला लागतील. सत्य आणि धर्म यांमध्ये त्यांची रुचि राहणार नाही.”
अग्निवेशांनी विचारले, “ सत्य आणि धर्म यांमध्ये लोकांची रुचि न राहण्यामागे काय कारण असेल गुरुदेव?”
गुरुदेव म्हणाले, “ बुद्धिचे बिघडणे हेच या महानाशाचे कारण असेल. जेंव्हा बुद्धि बिघडते, तेंव्हा ती सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर चालते, आणि तिची धर्मामध्ये रुचि राहत नाही.”
प्रज्ञापराधो मूलं सर्व रोगाणाम्|
बुद्धीच्या बिघडण्याने सर्व रोग होतात. पण बुद्धीच्या बिघडण्याने केवळ शारीरिक रोग निर्माण होत नाहीत, तर सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, आत्मिक रोगही निर्माण होतात. म्हणून असे म्हणतात की जेंव्हा विनाशाचा काळ जवळ येतो, तेंव्हा बुद्धि विपरीत होते, “विनाशकाले विपरीत बुद्धि”. देवता जेंव्हा कोणाचा नाश करायचा असतो, तेंव्हा दुसरे तिसरे काही करीत नाहीत, केवळ त्या माणसाची बुद्धि भ्रष्ट करतात. तसेच जेंव्हा कुणाचे रक्षण करायचे असते, तेंव्हा त्यांच्या बुद्धीत अशी प्रेरणा करतात की तो मनुष्य स्वतःच योग्य मार्गावर चालतो.
चाणक्याने म्हटले आहे, की “हे भगवान! जर माझ्या वाईट कर्मांमुळे माझे सर्व काही हरण होणार असेल, तर होऊ दे, पण केवळ माझी बुद्धि शाबूत माझ्याजवळ राहू दे.”
सामवेदात असेच वर्णन केले आहे. सामवेदाच्या 101 व्या मंत्रात भक्तीचे वर्णन केले आहे, आणि म्हटले आहे, की भक्ति सफल होईल, तेंव्हा भगवंतांकडे काय मागायचे? तर ‘मेधा’ मागा. मेधा म्हणजे अशी बुद्धि जी मर्यादेत राहायला शिकविते, स्थिर राहते, विसरत नाही.
जगप्रसिद्ध गायत्री मंत्र सर्वप्रथम ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलाच्या 7 व्या सूक्ताचा 10 वा मंत्र म्हणून आला आहे.(इतर वेदांतही तो आला आहे.)त्यात कुठलीही धन संपत्ति मागितली नाही, तर सविता देवतेला आवाहन केले आहे, प्रार्थना केली आहे , की माझ्या बुद्धीला तुझ्याकडे घेऊन चल.
ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒
भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि। धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥
बादशहा अकबराची गोष्ट
अकबर बिरबलाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या आहेत. बिरबल हा विद्वान ब्राह्मण होता. तो नेहमी ईश्वराचे स्मरण करीत असे. बादशहालाही सांगत असे- ईश्वराचे स्मरण करा. एके दिवशी बादशहा म्हणाला, “बिरबल, तू जो ईश्वर म्हणतोस तो कुठे राहतो? काय करतो? त्याचे दर्शन कसे होऊ शकते?”
बिरबल विचारात गढला. आता या बादशहाला समजेल आणि पटेल अशा भाषेत कसे सांगायचे? बिरबलाने बादशहाकडून 7 दिवसांचा वेळ मागून घेतला. म्हणाला, सातव्या दिवशी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन. सहा दिवस झाले, बिरबलाला काही उत्तर सुचले नाही. सातव्या दिवशी तो चिंतातुर बसला होता. बिरबलाचा ८ वर्षाचा मुलगा होता. तो बिरबलासारखाच चतुर तर होताच, पण इतक्या लहान वयातही अध्यात्माची त्याला खूप जाण होती, आणि आपले म्हणणे समोरच्याला पटवून देण्याची विलक्षण हातोटी त्याच्यात जन्मजात होती.. त्या त्याच्या मुलाने येऊन विचारले, “ पिताजी, का एवढे चिंतेत बसला आहात?”
बिरबल म्हणाला, “बादशहाने तीन प्रश्न विचारले आहेत. त्यांचे उत्तर काही अजून सापडत नाही.” असे म्हणून बिरबलाने मुलाला ते तीन प्रश्न कोणते तेही सांगितले.
तो छोटासा मुलगा म्हणाला, “इतक्याशा गोष्टीची चिंता करताय? याचे उत्तर तर मी सांगू शकतो”
बिरबल म्हणाला, “सांग बरे?”
मुलगा म्हणाला, “तुम्हाला नाही, बादशहाला सांगेल.”
शेवटी बिरबल मुलाला घेऊन बादशहाकडे गेला आणि म्हणाला, “महाराज, तुमच्या प्रश्नांची उत्तरें हा माझा मुलगा देईल.”
बादशहाने आश्चर्याने त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाला, “काय? हा तुझा छोटासा मुलगा माझ्या प्रश्नांचे उत्तर देईल?”
मग बादशहा त्या मुलाला म्हणाला, “सांग बरें, आमच्या प्रश्नांचे काय उत्तर आहे?”
मुलगा म्हणाला, “बादशहा, तुम्ही भारतात नवीन आले आहात. तुम्हाला भारताची संस्कृति अजून माहिती नाही. भारताची संस्कृति ही आहे की आपल्याकडे कोणी अतिथि आला, तर आधी त्याला खाऊपिऊ घाला, त्याचा सत्कार करा, मग त्याच्याशी बोला.”
बादशहा कौतुकाने म्हणाला, “बरे, अतिथि महाराज, तुम्ही काय घेणार?”
मुलगा म्हणाला, “महाराज, मी छोटा आहे, त्यामुळे मला दूध आवडते.”
बादशहाने एका चांदीच्या पात्रात दूध मागवले, आणि मुलाला म्हणाला, “घ्यावे महाराज!”
मुलाने ते चांदीचे पात्र हातात घेतले, त्यातील दुधाचे निरीक्षण केले, त्यात आपले बोट बुडवून इकडे तिकडे फिरविले.
बादशहा म्हणाला, “काय करतो आहेस बाळा? दूध पीत का नाहीस?”
बालक म्हणाला, “बादशहा मी ऐकले आहे की दुधात मक्खन (लोणी) असते, पण या दुधात तर लोणी दिसत नाहीये.”
बादशहा हंसून म्हणाला, “ तू अजून बालक आहेस, बाळा! अरे, या दुधात लोणी आहे. पण ते लोणी जर बघायचे असेल तर त्या दुधात दही घालून त्याला विरजण लावावे लागते, त्याचे दही झाल्यावर त्याला घुसळावे लागते, खूप जोर लावावा लागतो. तेंव्हा कुठे लोणी वर येते.”
मुलगा म्हणाला, “बादशहा! तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांचे हेच उत्तर आहे. ईश्वर सगळीकडे आहे. या जगाच्या कणाकणात आहे. पण त्याचे दर्शन तेंव्हा होते, जेंव्हा मनाला “ॐ” रूपी दही घालून विरजण लावले जाते, मग धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या रवीने घुसळले जाते, तेंव्हा भक्त आपल्या हृदयात ईश्वराला प्रत्यक्ष, स्पष्टपणे पाहू शकतो.”
बादशहा म्हणाला, “अरे वा! तू माझ्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरें अगदी समाधानकारक दिली आहेस. माझा याबाबतीतला संशय दूर झाला. आता मला सांग की ईश्वर काय करतो?”
मुलगा म्हणाला, “ ही तुम्ही गुरु बनून विचारता आहात, की शिष्य बनून?”
बादशहा म्हणाला, “गुरु म्हणून नाही, मी शिष्य म्हणून विचारतो आहे!”
मुलगा म्हणाला, “अजब शिष्य आहात तुम्ही, महाराज! गुरु खाली उभा आहे, आणि तुम्ही उंच आसनावर बसला आहात!”
वरमून बादशहा खाली उतरला आणि मुलाला सिंहासनावर बसवले. हात जोडून म्हणाला, “आता सांग, ईश्वर काय करतो?”
मुलगा हंसून म्हणाला, ‘ हेच करतो, महाराज, वरच्याला खाली करतो आणि खालच्याला वर करतो!”
आणि ही खरेच नाही काय? मोठ्या मोठ्या लोकांना धुळीला मिळतांना आपण पाहत नाही काय? आणि धुळीत असणाऱ्यांनाही सिंहासनावर बसलेले आपण पाहत नाही काय? सगळे सोडून जातात, सगळ्या आशा समाप्त होतात, तेंव्हा तोच एक ईश्वर मनुष्याच्या बरोबर राहतो. त्याचे रक्षण करतो.
वैदिक धर्माचे प्रचारक, सुप्रसिद्ध आर्यसमाजी महात्मा आनंद स्वामी नांवाचे सत्पुरुष होऊन गेले,(15 ऑक्टोबर 1882 – 24 ऑक्टोबर 1977)ते गायत्री मंत्राचे प्रचारक होते. त्यांनी ‘गायत्री मंत्राचे महत्त्व’ या विषयावर दिलेल्या प्रवचनांमधून वरील गोष्टी संकलित केलेल्या आहेत.
माधव भोपे